Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 15 November, 2008

पाण्यासाठी वणवण


लोक खवळले; पणजीत अभूतपूर्व पाणीटंचाई
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - गेल्या कित्येक दिवसांपासून पणजी व परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे लोक कमालीचे खवळले आहेत. राज्यात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आता शक्य तेवढ्या लवकर जर या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर लोकांच्या संतापाचा उद्रेक कधीही होऊ शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे.
लोकांना त्यामुळे विहिरी, टॅंकर अशा साधनांचा आसरा घ्यावा लागत आहे. सांत इनेज, ताळगाव, दोना पावल आदी भागात तर अनेक इमारतींमध्ये वरच्या मजल्यावर पाणी चढणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांना अंघोळीलादेखील रजा द्यावी लागली. मुळातच पिण्यासाठी चार घोट पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. मिळेल तेथून पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात अनेकांचे कार्यालयीन वेळापत्रकही कोलमडून पडले. वणवण भटकून स्वयंपाकासाठी पाणी मिळाले तर भांडी व कपडे कसे धुवायचे, असा प्रश्न गृहिणींपुढे निर्माण झाला आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून संबंधित सरकारी यंत्रणेकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे सगळीकडे "लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार' असे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा खात्याने आमचा अंत पाहू नये, अन्यथा आता उग्र आंदोलनाला पर्याय नाही, असा सणसणीत इशारा लोकांनी दिला आहे. पाणीपुरवठ्याच्या बाबतीत सुरू असलेल्या या सावळ्यागोंधळामुळे लोकांतून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, चौपदरी महामार्गाच्या आड येणारी जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे हा पाण्याचा बट्ट्याबोळ निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. आज (शुक्रवारी) दुपारी १ वाजता ही वाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाले असून रात्रीपासून शहरात आणि आसपासच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पाणी पुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत यांनी सांगितले.
जुने गोवे येथे कदंब पठारावर ८५० मीटर लांब ७ एमएमची जलवाहिनी बदलण्यात आली आहे. त्यामुळेच पणजीत पाणीपुरवठा खंडित झाल्याचे ते म्हणाले.
जुने गोवे दुपदरी बगल महामार्गाला जोडूनच ओपा खांडेपार येथून पणजीला येणारी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तथापि, आता हा महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने तेथील जलवाहिनी बाजूला टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी हे काम हाती घेण्यात आले होते. हे काम लांबल्याने कालचा संपूर्ण दिवस पणजीला पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे सांत इनेज, आल्तिनो, बोक द व्हाक, मेरशी, ताळगाव, सांताक्रुझ तसेच शहराच्या आसपास पाण्यामुळे लोकांना वणवण करावी लागली. अचानक नळाचे पाणी गायबच झाल्याने सकाळी उठल्यावर अनेकांना सार्वजनिक शौचालय गाठावे लागले.
पणजी शहराला एका दिवसासाठी १५ एमएलडी पाणी लागते. काही ठिकाणी पाण्याचे टॅंकर पाठवून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, टॅंकरची संख्या कमी असल्याने अनेकांना पाणी उपलब्ध झाले नाही. आज दुपारी जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाल्याने दुपारपासून पाणी टाकीत पडण्यास सुरुवात झाल्याचे श्री. श्रीकांत यांनी सांगितले. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

आचारसंहिता भंगप्रकरणी चौघा नेत्यांना नोटिसा

पणजी,दि.१४ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून त्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा व खासदार शांताराम नाईक यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधातही एक तक्रार आजच दाखल झाल्याने त्याबाबतचा अभ्यास सुरू आहे,अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी के.बी.सुरजुसे यांनी दिली.
आचारसंहिता लागू झाल्याने सरकारी प्रशासन ठप्प झाले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंत्र्यांनी केलेल्या विविध घोषणा व आपल्या पदाचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापर करण्याचे प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आहे. सध्या अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारींपैकी दोन तक्रारी भाजपकडून दाखल करण्यात आल्या आहेत. वास्कोचे माजी नगराध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी महसूलमंत्री जुझे फिलिप, तर पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांचे समर्थक ऍड.कृष्णा नाईक यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आचारसंहिता काळात गोव्यातील मुस्लिम बांधवांसाठी हाज यात्रेसाठी खास थेट विमानसेवा पुरवण्याची घोषणा केली होती. कामत सरकारला पाचशे दिवस पूर्ण झाल्याने त्यानिमित्ताने वृत्तपत्रांतून विविध योजना व घोषणांची जाहिरातबाजी करण्यात आल्याचा आक्षेपही भाजपने घेतला. याच काळात आरोग्य खात्यातर्फे प्राध्यापक व साहाय्यक प्राध्यापकाच्या नेमणुकीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तक्रारही भाजपने केली आहे. दरम्यान, याप्रकरणी सदर तक्रारीची दखल घेत संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्याचे श्री.सुरजुसे म्हणाले. याप्रकरणी संबंधितांचा खुलासा आल्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरेल,असेही ते म्हणाले.
वास्कोचे माजी नगराध्यक्ष आल्मेदा यांनी, महसूलमंत्री डिसोझा यांच्याकडून आचारसंहिता काळात बायणा वास्को येथे रवींद्र भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमात विविध घोषणा झाल्याचा ठपका ठेवून तक्रार दाखल केली आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी आपली अधिकृत मंत्रिपदाच्या वाहनाचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मंत्री आजगावकर यांचे समर्थक ऍड.कृष्णा नाईक यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.पेडणे तालुक्यातील एका धार्मिक ठिकाणी कार्यक्रमाला आपले अधिकृत वाहन वापरल्याचा तसेच या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मडगावच्या नगराध्यक्षपदी सॅव्हियो कुतिन्हो अविरोध

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी) - मडगावच्या नगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक सॅव्हियो कुतिन्हो यांची अपेक्षेप्रमाणे अविरोध निवड झाली. सकाळी ११ वाजता या निवडीसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीस निर्वाचन अधिकारी म्हणून दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी काल उमेदवारी दाखल केलेल्या जॉन्सन फर्नांडिस व श्रीमती पिएदाद नोरोन्हा या दोघा माजी नगराध्यक्षांनी आज बैठक सुरू होताच आपले उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे व मडगाव शहराच्या विकासासाठी कुतिन्हो यांना संधी देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर निर्वाचन अधिकाऱ्यांनी कुतिन्हो यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
गेल्या तीन वर्षांत कुतिन्हो हे मडगावचे पाचवे नगराध्यक्ष झाले आहेत. पालिका निवडणुकीनंतर प्रथम श्रीमती नोरोन्हा नगराध्यक्ष बनल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना खाली उतरवून घनःश्याम शिरोडकर नगराध्यक्ष झाले. कॉंग्रेसप्रणीत नगरसेवकांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना पाडले व भाजपच्या मदतीने राजेंद्र आजगावकरांना नगराध्यक्ष केले. त्यावेळी भाजपाचे आठ नगरसेवक होते. नंतर राजू नाईक, रामदास हजारे व राजेंद्र आजगावकर यांनी भाजपची फारकत घेतल्याने भाजपप्रणीत नगरसेवकांचे संख्याबळ पाचच राहिले. मध्यंतरी पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचा परिणाम राजेंद्र आजगावकर यांना भोगावा लागला. त्यांना नगराध्यक्षपदावरून बाजूला काढले गेले व त्याजागी भाजपच्या मदतीने जॉन्सन आले. मागील चारही नगराध्यक्ष बनवण्यात भाजपाचा मोठा वाटा होता. चारही वेळी कुतिन्होंनी नगराध्यक्ष होण्याचा प्रयत्न केला; पण पुरेशी संख्या नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र आता पाचव्यांदा त्यांना यश प्राप्त झाले आहे.
नगराध्यक्षपदी निवडीनंतर कुतिन्हो यांनी सर्वांचे आभार मानले व मडगाव शहराच्या विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यांनी आपण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन विकासकामांसाठी जादा निधी आणण्याचे आश्र्वासन दिले. मडगाव पालिकेत सत्तेच्या या संगीतखुर्चीत नगराध्यक्षपद नेहमीच अस्थिर राहिले व त्याचा फटका विकासकामांना बसला.

नेव्ही हाऊस परिसरात आग

कसलीही हानी नाही
वास्को, दि.१४ (प्रतिनिधी) - आज बालदिनानिमित्ताने नौदलातर्फे आयोजित कार्यक्रमात आतषबाजीत एक ठिणगी गवताळ भागात पडल्याने तेथे मोठी आग भडकली. त्यामुळे नेव्ही हाऊसभोवतीच्या गवताने पेट घेतल्याने चार अग्निशामक बंबांना घटनास्थळी बोलावून नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.
काही क्षणांत आग वेगाने अन्यत्र फैलावली. त्यामुळे तेथे उपस्थित नौदल अधिकाऱ्यांनी पाण्याने भरलेल्या बादल्या ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे आगीला थोपवता न आल्याने नौदलाच्या दोन व गोवा अग्निशामक दलाच्या दोन बंबांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यानंतर सुमारे ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली. यावेळी तेथे सुमारे पाचशे लोकांचा जमाव होता. त्यात सुमारे २४० बालके होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा अर्धवट राहिलेला बालदिन कार्यक्रम पुढे सुरू करण्यात आला.
यावेळी बोलताना गोवा नौदलीय विभागाचे ध्वजाधिकारी संजय वडगावकर यांनी सांगितले की, बालकेही देशाची संपत्ती असून त्यांना चांगली शिकवण देणे आवश्यक आहे.
नेव्ही हाऊसमध्ये बालदिनानिमित्त विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ध्वजाधिकारी वडगावकर, श्रीमती विजयादेवी राणे, नौदलाचे इतर अधिकारी, उपस्थित होते.
याप्रसंगी थरारक हवाई कसरती, वाद्यपथकातर्फे खास कार्यक्रम, जादूचे प्रयोग असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. नौदलाच्या विद्यार्थ्यांनीही संगीतमय कार्यक्रम सादर केला. ध्वजाधिकारी वडगावकर यांनी उपस्थित बालकांना खाऊची पाकिटे वाटली.

Friday 14 November, 2008

"मेडिक्लेम'चा गैरवापर

कोट्यवधींचा सरकारी निधी खाजगी इस्पितळांच्या घशात!
पणजी, दि.१३ (प्रतिनिधी) - राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा होत असलेल्या "मेडिक्लेम' योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू असून या योजनेवरील कोट्यवधींचा खर्च खाजगी इस्पितळांच्या घशात जात असल्याचे उघड झाले आहे. या योजनेसाठी सरकारने घालून दिलेले नियम व अटी पायदळी तुडवून अपात्र लोकांकडूनही या योजनेचा लाभ उठवला जात आहे. २००८-०९ या वर्षासाठी या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली सुमारे १० कोटी रुपयांची रक्कम केवळ सहा महिन्यातच फस्त झाली असून २ कोटी अतिरिक्त रक्कमही साफ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
गोवा सरकारने मध्यम वर्ग व खास करून आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना गोवा आरोग्य महाविद्यालयात उपलब्ध नसलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी १९८९ साली आरोग्य उपचार अर्थसहाय्यतेची ही "मेडिक्लेम' योजना कार्यन्वित केली होती. ही योजना राबवण्याचा सरकारचा हेतू जरी चांगला असला तरी या योजनेची कार्यवाही करणाऱ्या लोकांनी मात्र या योजनेचा उपयोग व्यवसायासाठी केल्याने या योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याने गरजू लोक या योजनेपासून वंचित राहात आहेत.
दरम्यान,पुढील चार महिन्यांसाठी या योजनेवर खर्च करण्यासाठी आरोग्य खात्याकडे निधी नसल्याने आता खासगी इस्पितळांनी रुग्णांना रोख रक्कम देण्याची सक्ती केल्याची चर्चा आहे. यापूर्वी उपचारासाठीचे पैसे थेट राज्य सरकारकडून मिळवले जात होते. आरोग्य खात्याची तिजोरी रिकामी झाल्याने आता खरोखरच या अर्थसाहाय्याची गरज असलेल्या लोकांना उपचारासाठी रोख रक्कम देणे भाग पडणार आहे. दरम्यान, वित्त खात्याकडे सहा कोटी अतिरिक्त निधी मागितल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली असली तरी सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आधीच पेचात सापडलेल्या वित्त खात्याने हा प्रस्ताव तसाच प्रलंबित ठेवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या योजनेवरील आत्तापर्यंत झालेल्या खर्चाचा आकडा पाहिल्यास गेल्या साडे पाच वर्षात सुमारे ७४.६ कोटी रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहितीही उघड झाली आहे. मुळात गोवा आरोग्य महाविद्यालयात उपलब्ध नसलेल्या उपचारांसाठीच ही खास योजना तयार करण्यात आली आहे तरीही तेथे उपचार उपलब्ध असताना खाजगी इस्पितळांत उपचार करून घेत कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. या योजनेअंतर्गत "न्यूरोलोजिकल डिस्ऑर्डर',"कार्डीयो-थॉरेसिक़ सर्जरी,'मूत्रपिंड रोपण, प्लॅस्टिक सर्जरी, रेडियोथेरपी,सांधेरोपण, डायलिसीस व इतर कर्करोग व तत्सबंधीत असाध्य रोगांच्या उपचारांचा त्यात समावेश आहे.
गोव्यात मूत्रपिंडविषयक प्रकरणे वाढल्याने गोवा आरोग्य महाविद्यालयात डायलिसीसची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, डायलिसीसवर खर्च जादा होत असल्याने राज्य सरकारने या उपचाराचाही "मेडिक्लेम' योजनेत समावेश केला. या उपचारासाठी रुग्णाला महिन्याला १५ हजार रुपयांपर्यंत खर्च मिळतो. आता ही सुविधा "गोमेकॉ'त उपलब्ध असतानाही खासगी इस्पितळात उपचार करून मेडिक्लेम योजनेचा लाभ घेण्याचे प्रकारही सर्रास सुरू असल्याची माहितीही खास सूत्रांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात १३७ प्रकरणांची नोंद "गोमेकॉ'कडे असून यावर्षी केवळ ५९ प्रकरणे नोंद झाली आहेत. दरम्यान, हा उपचार नियमित असल्याने व गोमेकॉकडून सर्वांची सोय करणे शक्य नसल्यानेच या योजनेचा लाभ खाजगी इस्पितळात उपचार घेतलेल्या रुग्णांना देण्यात येतो,अशी माहिती अधीक्षक डॉ.राजन कुकंळ्ळीकर यांनी दिली. दरम्यान, गोवा आरोग्य महाविद्यालयाच्या सुपरस्पेशलिटी विभागाचे काम सुरू असून हा विभाग कार्यन्वित झाल्यानंतर हा खर्च करावा लागणार नाही,असा खुलासाही त्यांनी यावेळी दिला.
अशा प्रकारची योजना राबवणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असल्याने व योजनेवर कोट्यवधींचा खर्च होत असल्याने अनेक प्रसिद्ध खाजगी इस्पितळांची नजर गोव्याकडे लागली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांचा समावेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलालीचा वापर केला जातो तसेच अनेकांना त्याचे हप्ते पोहोचतात,अशी माहितीही आरोग्य खात्यातील खास सूत्रांकडून मिळाली आहे.
मेडिक्लेम योजनेवर आतापर्यंत झालेला खर्च व प्रकरणे अशी
२००३-०४ (१०७८ प्रकरणे-८.८६ कोटी खर्च)
,२००५-०६(१३९९ प्रकरणे-१२ कोटी खर्च),२००५-०६(१५६४ प्रकरणे-१३.९७),२००६-०७(१४७५ प्रकरणे-१५.६३ कोटी),२००८-०९(१८९५ प्रकरणे-१२.१४ कोटी)

दोन हजार रुपये लाच घेताना उपनिरीक्षक व हवालदारास अटक

वाळपई पोलिस स्थानकात "एसीबी'ची कारवाई
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - वाळपई पोलिस स्थानकात भ्रष्टाचारविरोधी पथकाने ("एसीबी') सापळा रचून उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर व हवालदार श्याम गावस यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
आज दुपारी ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आकाश कदम या तरुणाने आज सकाळी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. उद्या (शुक्रवारी) सकाळी या घटनेचा संपूर्ण अहवाल पोलिस महासंचालक बिजेंदर ब्रार यांच्याकडे सोपवला जाणार असून दुपारपर्यंत या दोन्ही पोलिस बडतर्फ केले जाण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तक्रारदार कदम व पोलिस उपनिरीक्षक दुर्भाटकर यांच्यात या दोन हजारांसाठी वाटाघाटी सुरू होत्या, अशी माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाचे निरीक्षक राजेश कुमार यांनी दिली. अमलीपदार्थ विरोधी पथकाची महिला उपनिरीक्षक संध्या गुप्ता हिच्यानंतर दुर्भाटकर हा अशा प्रकराची कारवाई होणारा दुसरा उपनिरीक्षक ठरला आहे.
प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तक्रारदार आकाश कदम हा आपल्या मैत्रिणीसोबत एका वाहनात वाळपई या भागात गेला होता. हे दोघे एका ठिकाणी आपले वाहन उभे करून थांबले असता तेथे गस्तीवरील उपनिरीक्षक दुर्भाटकर व हवालदार गावस यांनी त्यांना हटकले. यावेळी त्यांनी कदम याच्याकडून त्याचा वाहन परवाना, पॅन कार्ड व त्या युवतीचे ओळखपत्र घेतले. त्यानंतर, घरी जायचे असल्यास दोन हजार रुपये द्या आणि तुमची कागदपत्रे घेऊन जा, अशी अट त्यांना घालण्यात आली. दोन दिवसांत पैसे देतो असे सांगून कदम यांनी तेव्हा आपली तात्पुरती सुटका करून घेतली. मात्र त्यानंतर दोन हजार रुपयांसाठी तक्रारदाराला सतत फोन येत होते, अशी माहिती निरीक्षक कुमार यांनी दिली. अखेर तक्रारदाराने याची माहिती भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिल्यानंतर हा सापळा रचण्यात आला.
त्यानुसार आज दुपारी ३.३० वाजता वाळपई पोलिस स्थानकावर दोन हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले. सापळ्याच्या आराखड्यानुसार पोलिसांना देण्यात येणारे त्या दोन हजार रुपयांच्या नोटांवर खास खूण करण्यात आली होती. ते पैसे कदम यांनी उपनिरीक्षक दुर्भाटकर याच्या हातात दिले असता त्याचवेळी भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्याला पौशांसह ताब्यात घेतले. याप्रकरणी उपनिरीक्षक दुर्भाटकर व पोलिस हवालदार गावस यांची जबानी नोंदवून घेण्यात आली आहे. पोलिस खात्यात शिपाई म्हणून भरती झालेला विलेश दुर्भाटकर हा हल्लीच भरती झालेल्या उपनिरीक्षक तुकडीतील अधिकारी आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याला वाळपई पोलिस स्थानकावर रुजू करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

अपात्रता अटळ, पण निर्णयाचा सर्वाअधिकार सभापतींनाच

ज्येष्ठ घटनातज्ज्ञ ऍड.अमृत कासार यांची प्रतिक्रिया
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - "सेव्ह गोवा फ्रंट' हा प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून अजूनही अस्तित्वात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाळी निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात त्याबाबत शिक्कामोर्तब केल्यानेच पाळी पोटनिवडणुकीत या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला. सेव्ह गोवा पक्षाचे विधानसभेतील दोन आमदार चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन झाल्याचा केलेला दावा खोटा ठरल्याने घटनेनुसार व सभापतींनी निःपक्षपातीपणे निर्णय दिल्यास त्यांची अपात्रता निश्चित असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ घटनातज्ज्ञ तथा माजी खासदार ऍड.अमृत कासार यांनी नोंदवले आहे.
सेव्ह गोवा फ्रंट पक्षाबाबत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत कायद्याची बाजू सुस्पष्ट केली. चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांच्याविरोधात पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी दाखल केलेल्या याचिकेला निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अधिक बळकटी मिळाली आहे.अखेर या याचिकेबाबत निकाल देण्याचा अधिकार हा सभापतींना असल्याने तो ठरावीक काळात द्यावा,असे बंधनकारक नाही, त्यामुळे हा निकाल कधी द्यावा याचा हक्क सभापतींना आहे. सभापतीकडून जर सत्ताधारी गटाच्या सोयीप्रमाणे निकाल देण्याचे ठरवण्यात आले तर हा निकाल देण्यास विलंब लागण्याची जास्त शक्यता आहे परंतु जर घटनेप्रमाणे व निःपक्षपातीपणे निकाल देण्याचे सभापतींनी ठरवले तर हे दोन्ही आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरू शकतात,असेही ऍड.कासार म्हणाले.
विलीनीकरणाबाबत घटनेच्या दहाव्या परिशिष्टात म्हटल्याप्रमाणे एखादा राजकीय पक्ष अन्य राजकीय पक्षात विलीन करायचे झाल्यास त्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी या निर्णयास मान्यता देण्याची गरज आहे. पक्षाच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत हा ठराव संमत झाल्यानंतर त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्याची गरज आहे. याबाबत सर्व प्रक्रियेची पडताळणी केल्यानंतर विलीनीकरणाबाबत शिक्कामोर्तब करून विलीनीकरणाची तारीख निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात येते. राजकीय पक्ष विलीन झाल्यानंतर दुसरी गोष्ट राहते ती पक्षाच्या विधिमंडळ गटाची. राजकीय पक्षाचे अधिकृत विलीनीकरण झाल्यानंतर विधिमंडळ गटाच्या दोन तृतीयांश सदस्यांनी या निर्णयाला मान्यता देण्याची गरज असते,त्याप्रमाणे तशी माहिती सभापतींना देऊन आपला राजकीय पक्ष अन्य पक्षात विलीन झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. राजकीय पक्षाचा निर्णय विधिमंडळ गटाला मान्य नसल्यास तेव्हा विधानसभेत या सदस्यांना स्वतंत्र गट म्हणून जागा मान्यता देण्याची विनंती ते सभापतींकडे करू शकतात,असेही कायद्यात म्हटले आहे.
सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे ज्या राजकीय परिस्थितीत विलीनीकरण करण्यात आले ते पाहता ही प्रक्रिया कितपत कायदेशीर झाली याबाबत शंकाच आहे. पाळी पोटनिवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रादेशिक पक्षाच्या उमेदवाराला मान्यता देताना केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला मागवलाच असेल तेव्हा ही मान्यता मिळाली याचा अर्थ या पक्षाचे राजकीय विलीनीकरण झाले नाही हे स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षाचे विलीनीकरण होण्यापूर्वी विधिमंडळ गटाचे विलीनीकरण शक्य नाही. चर्चिल आलेमाव यांच्याकडून दोन तृतीयांश सदस्यांच्या मान्यतेने पक्ष विलीन केल्याचा दावा करतात. आता हा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाला पटवून देणे ही बरीच मोठी कसरत करावी लागणार आहे.आंतोन गावकर यांच्या नावाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पाळी पोटनिवडणुकीबाबतचे पत्र पक्षाच्या नावे पाठवले याचा अर्थ गावकर हे पक्षाचे पदाधिकारी आहेत असे आयोगाकडे असलेल्या पक्षाच्या दस्तऐवजाप्रमाणे सिद्ध होते. घटनेप्रमाणे या एकूण प्रकरणी चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांच्यावरील अपात्रता अटळ असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले असले तरी तो निर्णय घेण्याचा अधिकार सभापतींना आहे व त्यांचा निर्णयच अंतिम असेल.

सभापती राणेंची चर्चिलकडून स्तूती
सभापती प्रतापसिंग राणे हे ज्येष्ट राजकीय नेते आहेत, तसेच राजकारणात त्यांनी विविध पदे भूषवली आहेत.सभापती या नात्याने त्यांनी बजावलेल्या निपक्षपाती भूमिकेचे अजूनही कौतुक केले जाते.अनेक पेचप्रसंगात त्यांनी दिलेल्या निकालांची स्तूती करून मिकी पाशेको यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरही ते योग्य तो निर्णय घेतील,असे चर्चिल म्हणाले. आपण पूर्ण कायदेशीररित्या पक्ष विलीन केला असून त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विधानसभेतील आसन व्यवस्थेत बदल केले होते,असेही चर्चिल म्हणाले.

योगेंद्र मकवाना यांची हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. १३ - राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून मार्गारेट अल्वा यांना अर्धचंद्र देण्यात आल्याचे उदाहण ताजे असतानाच आता पक्षाची धोरणे व कार्यपद्धती यावर जाहीर टीका केल्याबद्दल अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री योगेंद्र मकवाना यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. मकावाना यांनी केलेल्या विधानांची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्ष प्रवक्ते शकील अहमद यांनी आज येथे पत्रकारांना दिली. मकवाना हे स्वतःचा नवा पक्ष काढण्याच्या तयारीत असून त्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच असेल अशी माहितीही कॉंग्रेसला मिळाल्याचे अहमद म्हणाले. कॉंग्रेसमध्ये पैसे घेऊन तिकीटे विकली जातात, असा जाहीर आरोप श्रीमती अल्वा यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्याकडील सर्व पदे यापूर्वीच काढून घेण्यात आली आहेत.

Thursday 13 November, 2008

पाळीत तिरंगी लढत

डॉ. प्रमोद सावंत यांना अनुकूल वातावरण
पणजी,डिचोली, दि. १२ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत संपल्यानंतर आता एकूण पाच उमेदवार रिंगणात उरले आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्याने बंडाचा पवित्रा घेतलेले माजी आरोग्यमंत्री डॉ.सुरेश आमोणकर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला आपला अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतल्याने आता डॉ.आमोणकर, कॉंग्रेसचे प्रताप गावस व भाजपचे डॉ.प्रमोद सावंत यांच्यातच ही तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सातू माईणकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने अखेर एकूण पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सेव्ह गोवा फं्रटतर्फे जुझे लोबो तर राजेंद्र नरसिंह राणे हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरले आहेत. दरम्यान,विद्यमान परिस्थितीत कॉंग्रेस आघाडी सरकारने चालवलेल्या कारभारामुळे राज्याचे वाटोळे होण्याची जास्त शक्यता असल्याने निदान या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपला या सरकारच्या भानगडी जनतेपर्यंत नेण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. डॉ.आमोणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अनेक भाजप नेत्यांनी शेवटपर्यंत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अखेर फोल ठरला. डॉ.आमोणकर यांच्या उमेदवारीमुळे त्याचा मोठा परिणाम भाजपवर होण्याची अजिबात शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली. कॉंग्रेसला धडा शिकवण्यासाठी या संधीचा योग्य वापर या पोटनिवडणुकीद्वारे करून घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय बनले आहेत. भाजप पक्ष हा महत्त्वाचा असून व्यक्तिपूजेला स्थानच नाही. त्यामुळे भाजपचे मतदार कमळावरच शिक्का मारतील,असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी ही खिचडी बनली आहे. दिगंबर कामत सरकारवर एकामागोमाग एक संकटे ओढवत असताना केवळ केंद्र सरकारच्या आशीर्वादाने हे सरकार टिकून आहे. याची पूर्ण जाणीव राज्य सरकारलाही आहे,असेही यावेळी सांगण्यात आले. केंद्रात लोकसभा निवडणूक जाहीर झाली की गोव्यातील सरकार गडगडेल याची पूर्ण जाणीव लोकांना असल्याने पाळीमध्ये भाजपचे उमेदवार डॉ.प्रमोद सावंत यांना विजयी करणेच योग्य ठरेल,असा सार्वत्रिक सूर दिसून येतो. पाळी मतदारसंघाचे माजी आमदार स्व. गुरूदास गावस यांची झालेली उपेक्षा व या सरकारकडून ठप्प झालेला विकास यामुळे लोक कॉंग्रेसला विटले आहेत.
दरम्यान, पाळीमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारसभेत भाषण ठोकण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना विद्यमान प्रकरणांबाबत थेट जाब विचारण्याची तयारीही काही युवकांनी ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे.

महापौरांच्या आसनावर विद्यार्थ्यांनी ओतला कचरा

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) -मळा परिसरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालल्याने या परिसरातील पाच विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी आज सकाळी पणजी महापालिकेवर धडक मोर्चा काढून महापौराच्या टेबलवर आणि खुर्चीवर कचरा ओतला. या घटनेने हादरलेल्या महापौरांनी दुपारी २.३० वाजता विद्यालयाच्या शिक्षकांची आणि कचरा प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या समितीची खास बैठक बोलावली. या बैठकीत शिक्षक आणि महापालिका यांच्यात एकमत झाल्याने २२ नोव्हेंबरपर्यंत सरकारला या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. यात सरकार अयशस्वी ठरल्यास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटना दिवशी विद्यार्थ्यांसह महापालिकेनेही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पाटो कॉम्प्लेक्स याठिकाणी असलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पात बेकायदा कचरा टाकला जात असल्याने पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच महापालिकेच्या विरोधी गटातील नगरसेवकांच्या सहीनिशी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकल्पात कचरा न टाकण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश देऊनही त्याठिकाणी कचरा टाकला जात असल्याने त्याची त्वरित चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी महापालिकेने आपण कचरा टाकला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मळा परिसरात असलेल्या विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या तसेच येथील स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
महापालिकेच्या सभागृहात दुपारी शिक्षकांना बैठकीसाठी बोलावून अर्धा तास सभागृहात बसवून ठेवले. यावेळी या शिक्षकांना कोणतीही माहिती न देताच महापौरांच्या दालनात बैठक सुरू करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी तेथील एका कारकुनाला बैठकीविषयी विचारले असता बैठक महापौरांच्या दालनात सुरू झाल्याचे सांगण्यात आले. बैठकीत शिक्षकांना सहभागी करून घ्यायचे नव्हेत तर, का बोलावण्यात आले असा प्रश्न केल्यानंतर या शिक्षकाना बैठकीत घेण्यात आले. या घटनेमुळे शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला तर, यापुढे महापालिकेकडून असा प्रकार घडल्यास या प्रश्नावर पालिकेला सहकार्य करणार नसल्याचे मुख्याध्यापक विलास सतरकर यांनी सांगितले.
मळा परिसरात पाच विद्यालयात ६ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या एका वर्षापासून या विद्यार्थ्यांना कचऱ्याच्या या दुर्गंधीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच या दुर्गंधीमुळे जेवण जेवायला होत नाही, अशीही तक्रारी या विद्यार्थ्यांच्या पालकांची आहे. अखेर एका वर्षांनी आज विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आज काढलेल्या या मोर्चांत पीपल्स विद्यालय, मुष्टीफंड विद्यालय, मेरी एमेक्युलेट, डॉ. हेडगेवार व सेव्हन व्हेंचर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुरवातील विद्यार्थ्यांनी महालक्ष्मी मंदिरासमोर नाळर फोडला तसेच जामा मशीद व चर्चच्या ठिकाणी उदबत्ती व मेणबत्ती लावण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कचरा प्रश्न मिटवण्यासाठी महापालिकेला सद्बुद्धी द्यावी, अशी मागणी केली.
कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. सरकार ही जागा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरवा आहे, अशी अडचण यावेळी झालेल्या बैठकीत महापालिकेने शिक्षकांसमोर मांडली. या मुद्यावर शिक्षक आणि महापालिका याचे एकमत झाल्याने दोघांनी या विषयावर संघटितपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
काही विद्यार्थ्यांनी महापौराच्या कार्यालयात घुसून कचरा टाकल्याने महापौर टॉनी रोड्रीगीज यांनी खंत व्यक्त कली तर, विरोधी गटातील रुद्रेश चोडणकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

दगडाने ठेचून महिलेचा खून

शिगाव कुळे येथे खळबळ
फोंडा, दि. १२ (प्रतिनिधी) - शिगाव वाकीकुयण (कुळे) येथील सरकारी विद्यालयाजवळ अंतर्गत रस्त्याच्या बाजूस एका महिलेचा सडलेला मृतदेह आज (दि.१२) दुपारी कुळे पोलिसांना सापडला. त्यामुळे खळबळ माजली आहे. मृत महिलेचा चेहरा दगडाने ठेचण्यात आल्यामुळे विद्रुप बनला असून हा खुनाचा प्रकार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची माहिती माजी सरपंच जयदेव वेळीप यांनी कुळे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी बांबोळी येथील सरकारी इस्पितळात पाठवला आहे. खून झालेल्या आलेल्या महिलेचे वय अंदाजे तीस ते पस्तीसदरम्यान आहे. वाकीकुयण शिगाव येथे झाडा झुडपांनी वेढलेल्या भागात हा मृतदेह टाकण्यात आला आहे. दुर्गंधी आल्याने काही स्थानिकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता मृतदेह असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली.
सदर अज्ञात महिलेचा चार - पाच दिवसांपूर्वी खून करून मृतदेह त्याठिकाणी टाकण्यात आल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाच्या साह्याने ठेचण्यात आला आहे. त्यामुळे सदर महिलेची ओळख पटवणे कठीण बनले आहे. खून झालेल्या महिलेच्या अंगावर एकही वस्त्र ठेवण्यात आलेले नाही.
यापूर्वी नंद्रण मोले येथे दोघांना जिवंत जाळण्याची घटना घडलेली आहे. त्या प्रकरणाचा छडा लावण्यात कुळे पोलिसांना यश आलेले नाही. आता अज्ञात महिलेच्या खुनाचा प्रकार उघडकीस आल्याने लोकांत खळबळ माजली आहे. या खून प्रकरणाचा छडा लावणे हे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.
फोंडा उपविभागीय पोलिस अधिकारी महेश गावकर, निरीक्षक मंजुनाथ देसाई, कुळ्याचे निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे.

शाबा फळदेसाई अनंतात विलीन


कुडचडे, दि.१२ (प्रतिनिधी) - केप्याचे सुपुत्र, माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक तसेच विधानसभेचे माजी उपसभापती शाबा कृष्णा फळदेसाई (७८) यांचे काल ११ रोजी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, पुत्र संजय, कन्या डॉ. प्रसन्ना उर्फ गायत्री, सौ. मुग्धा असा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात शाबा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
केप्यात गावात १० डिसेंबर १९३१ रोजी जन्मलेले फळदेसाई हे गोव्याच्या मुक्तीलढ्यात सहभागी झाले. त्यात अनेकवेळा त्यांनी तुरुंगवास भोगला. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी म.गो. पक्षातून १९६७ साली केपे मतदारसंघातून आमदारकीची सूत्रे सांभाळली. केपे भागातील ग्रामीण परिसराचा त्यांच्या कारकिर्दीत झपाट्याने विकास झाला. याच काळात त्यांनी केप्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते व मराठी शाळा सुरू करून साक्षरतेस सुरुवात केली. यावेळी केपे भागातील जनतेला राज्याच्या इतर भागाशी संपर्क साधणे सुलभ झाले.
शाबा दुसऱ्या विधानसभेच्या उपसभापतिपदाची सूत्रे सांभाळली. त्याशिवाय त्यांनी शेती व्यवसाय करून त्यामध्ये नवीन प्रयोग केले. मडगाव येथील लॉयला व हायस्कूलात व बाणावलीतील होली ट्रिनीटी हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. शाबा फळदेसाई यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत संपूर्ण केपे भागातील विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या व हा मतदारसंघ गोव्यातील आदर्श बनवला.
आज दुपारी कुसमण केपे येथे त्यांच्या फार्म हाऊसच्या जागेत त्यांचे ज्येष्ठ पुत्र अजय फळदेसाई (सागरी अभियंता) यांनी त्यांच्या चितेला मंत्राग्नी दिला. यावेळी स्थानिक आमदार बाबू कवळेकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य सुभाष फळदेसाई, शासनाच्या वतीने मामलेदार सुदिन नातू , नगराध्यक्षा श्रीमती लीडिया डीकॉस्टा, उपनगराध्यक्ष दयेश नाईक, माजी नगराध्यक्ष नाना गावकर, राहुल परेरा, ज्येष्ठ नागरिक पंढरी भिसो नाईक, ऍड. वल्लभ देसाई, ऍड. यतीन हेगडे देसाई, ऍड. पुरुषोत्तम फळदेसाई, व इतर मान्यवर उपस्थित होते.
केप्याला नवी दिशा दाखविणाऱ्या शाबा कृष्णा फळदेसाई हे केपे भागात त्यांनी राबवलेल्या विकासकामांमुळे सदैव स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

कोळंब रिवण खाणीविरुद्ध तीव्र आंदोलन; ८७ अटकेत

रात्री उशिरा सुटका
कुडचडे, दि. १२ (प्रतिनिधी) -कोळंब रिवण येथे हिरालाल कोडिदास खाण कंपनीतर्फे गेला एक महिना जोरात सुरु असलेल्या खनिज उत्खननाच्या विरोधात आज तेथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. शंभराहून अधिक जणांनी कंपनी बंद करण्याची मागणी करीत मोर्चा काढल्यानंतर खाजगी जागेत बेकायदा प्रवेश केल्याचा आरोप ठेवून केपे पोलिसांनी ८७ जणांना अटक केली, त्यांची रात्री उशिरा जामिनावर सुटका करण्यात आली. खाण बंद होईपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तिंबलो कंपनीकडून लीजवर घेऊन चालविण्यात येणाऱ्या या खाणीला गेली तीन वर्षे येथील ग्रामस्थ विरोध करीत आहेत. डोंगरावरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे, शिवाय अनेकांची शेती व बागायती आणि कुळागरे या खाणीमुळे धोक्यात आली असली तरी राजकीय वरदहस्त असल्याने बिनभोबाटपणे खाण सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही जणांना रोजगार देऊन, काही जणांच्या मालकीचे ट्रक कामावर ठेवून ग्रामस्थांना आपल्याकडे वळविण्याचे कंपनीचे धोरण आहे, असे असले तरी आज १२० जणांनी काही बिगरसरकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांसमवेत आज रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी केपेचे पोलिस अधीक्षक रोहिदास पत्रे, निरीक्षक संतोष देसाई, निलेश राणे, मामलेदार सुदिन नातू, संयुक्त मामलेदार अमोल गावकर उपस्थित होते.मामलेदारांनी जागा सोडून बाहेर जाण्याचा आदेश दिला, तथापि ग्रामस्थांनी आपले धरणे कायम ठेवल्याने त्यापैकी ८७ जणांना पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. ही खाण कायदेशीर असून संबंधित कंपनीकडे सर्व प्रकारचे आवश्यक दाखले असल्याचे पोलिस निरीक्षक पत्रे यांनी सांगितले. पुन्हा ग्रामस्थांनी अशा प्रकारे निषेध केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रामा वेळीप, डॉ.अवधूत प्रभुदेसाई, फादर मॅथ्यु , ३५ महिलांसह ८७ लोकांचा समावेश होता. त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

मार्गारेट अल्वा यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. १२ - महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रभारी, महासचिव मार्गारेट अल्वा यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांना कॉंग्रेस कार्यकारिणीतील सर्व पदांवरून काढण्यात आले आहे. अल्वा या महाराष्ट्राच्याही प्रभारी होत्या. आता त्यांच्या जागी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून ए.के.ऍण्टोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अल्वा यांच्याकडे कॉंग्रेसच्या महासचिव पदासोबतच महाराष्ट्रासह सात राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. मात्र, कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने पैसे घेऊन तिकीट विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार होती. त्यांचे प्रकरण पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानुसार सोमवारी अल्वा यांची पेशीही झाली. समितीतर्फे अल्वा यांच्यावर कारवाई होणारच, हे निश्चित मानले जात होते. पण, त्या कारवाईपूर्वीच त्यांनी महासचिव पदाचा राजीनामा दिला.
अल्वा यांनी राजीनामा दिला असला तरी त्या सामान्य कार्यकर्त्या म्हणून कार्यरत राहणार असल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्रासह ज्या राज्यांचे प्रभारीपद अल्वा यांच्याकडे होते त्या जागी पक्षाने तातडीने नव्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यानुसार, आता महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून ए.के.ऍण्टोनी, हरियाणाचे मोतीलाल व्होरा, पंजाब आणि चंदीगडच्या मोहसीना किडवई, मेघालय, मिझोरम आणि नागालॅण्डचे काम ऑस्कर फर्नांडीस पाहणार आहेत.

Wednesday 12 November, 2008

चर्चिल, रेजिनाल्डभोवतीचे संकट गहिरे

"सेव्ह गोवा फ्रंट'च्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब
जुझे लोबो यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य
दिगंबर कामत सरकारपुढे नव्याने पेच

पणजी, डिचोली, दि. ११ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीसाठी सेव्ह गोवा फं्रट पक्षातर्फे जुझे लोबो यांनी सादर केलेला उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकारी तथा डिचोलीचे उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांनी ग्राह्य धरल्याने हा प्रादेशिक पक्ष अजूनही अस्तित्वात आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पक्षाचे दोन आमदार सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांनी दिगंबर कामत सरकारला पाठिंबा देताना हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन केल्याचा दावा त्यामुळे फोल ठरल्यात जमा आहे. पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी याच बेकायदेशीर विलीनीकरणावरून सभापती प्रतापसिंग राणे यांच्यासमोर दाखल केलेल्या अपात्रता याचिकेला बळकटी मिळाली असून पाळी पोटनिवडणुकीच्या तोंडावर कामत सरकारसमोर हा एक नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. दोन वेळा कामत सरकारला जीवदान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सभापती राणे यांच्याकडे आता तिसऱ्यांदा या सरकारच्या अस्तित्वाचा निकाल देण्याची सूत्रे हाती आल्याने सर्वांची नजर त्यांच्यावर खिळली आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या तांत्रिक पेचप्रसंगावर "गोवादूत'नेच सर्वप्रथम प्रकाश टाकला होता.
पाळी पोटनिवडणुकीसाठी काल अर्जांची छाननी सुरू केली असता सेव्ह गोवा फ्रंट पक्षाचे उमेदवार जुझे लोबो यांच्या अर्जाला कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस व पक्षाचे सरचिटणीस सुरेश पिळर्णकर यांनी हरकत घेतली होती. या हरकतीच्या मुद्यावर काल निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांच्यासमोर बराच युक्तिवाद झाला. श्री. गावस व पिळर्णकर यांच्यावतीन चर्चिल यांचे राजकीय सल्लागार ऍड.माईक रॉड्रिगीस ऊर्फ माईक मेहता यांनी युक्तिवाद केला तर सेव्ह गोवाच्या वतीने ऍड. लवंदे यांनी काम पाहिले. जुझे लोबो यांच्या फॉर्म "ए' व "बी'वर पक्षाचे अध्यक्ष या नात्याने आंतोन गावकर यांनी केलेली सही बेकायदेशीर असून ते पक्षाचे अध्यक्ष नाही,अशी भूमिका ऍड.मेहता यांनी घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने सादर केलेल्या अहवालावरून पक्षाचे अध्यक्ष म्हणून सिद्धनाथ बुयांव यांच्या नावाची नोंद आहे. दरम्यान, ऍड.लवंदे यांनी आपल्या युक्तिवादात हा दावा फेटाळून लावला. मुख्य निवडणूक अधिकारी तथा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पाळी पोटनिवडणुकीबाबत पाठवलेल्या पत्रांत आंतोन गावकर यांचा अध्यक्ष म्हणून केलेला उल्लेख त्यांचे पद सिद्ध करण्यास पुरेसे आहे असे सांगून विरोधकांनी केलेल्या दाव्यातील हवाच काढून घेतली. मुळातच या संपूर्ण सुनावणीतील महत्त्वाचा भाग म्हणजे पक्षाच्या अस्तित्वाबाबत युक्तिवाद न करता केवळ अध्यक्षपदावरून युक्तिवाद करीत आंतोन गावकर यांनी पक्षातर्फे पुढे केलेला उमेदवार ग्राह्य धरू नये,असाच पाठपुरावा प्रतिवादीतर्फे करण्यात आला होता. या युक्तीवादावेळी सुरेश पिळर्णकर यांनी स्वतः पक्षाचे अस्तित्व असल्याचे मान्य केल्याने "सेव्ह गोवा' उमेदवाराचे फावले. दरम्यान, याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पक्षाच्या अस्तित्वाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली होती. यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक पक्ष म्हणून या राजकीय पक्षाची नोंदणी असल्याने या पक्षातर्फे सादर झालेला अर्ज ग्राह्य धरणे क्रमप्राप्त ठरते,असे म्हणून त्यांनी श्री.जुझे लोबो यांचा अर्ज मान्य केला आहे.

हा लोकांचा विजय ः आंतोन गावकर
मडगाव ः सेव्ह गोवा फ्रंटच्या उमेदवारांनी पाळी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्याची निवडणूक अधिकाऱ्यांची कृती म्हणजे सेव्ह गोवा फ्रंट अजून अस्तित्वात असल्याचे सिद्ध करणारा निर्णय आहे व हा लोकांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया फ्रंटचे अध्यक्ष आंतोन गावकर यांनी व्यक्त केली आहे.
या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता पक्षाच्या अस्तित्वाबाबत आजवर घेतलेल्या परिश्रमाचे फळ देवाने आपणाला दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. एका विशिष्ट ध्येयवादी दृष्टीने स्थापन केलेल्या या पक्षाला आपल्या इच्छेनुसार नाचवण्याची कृती उघड झाली असून पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भावार्थ या निकालामुळे खरा ठरल्याचेही ते म्हणाले.श्री. पिळर्णकर व राऊल परेरा यांनी याप्रकरणी स्वतःचेच हसे करून घेतल्याचा टोला त्यांनी हाणला.
चर्चिल बुचकळ्यात
दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण केलेले पक्षाचे विलीनीकरण हे कायदेशीर होते व त्याला कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सेव्हा गोवा फ्रंट पक्ष अजूनही अस्तित्वात आहे व मिकी पाशेको यांच्या याचिकेला त्यामुळे बळकटी मिळाली आहे याबाबत विचारले असता त्यांनी आपण याप्रकरणी आणखी बोलू इच्छित नाही,असे सांगितले.
आता सभापतींनी वेळ काढू नयेः मिकी
मंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी सेव्ह गोवा फ्रंट कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करून सरकारात सहभागी होण्याचा केलेला प्रकार हा पूर्णपणे बेकायदा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. हा पक्ष विलीन न होता अजूनही अस्तित्वात आहे हे पाळी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालावरून स्पष्ट झाल्याने सभापती प्रतापसिंग राणे यांनी आता अधिक वेळ न दवडता आपल्या याचिकेप्रकरणी तात्काळ निकाल द्यावा,असे पर्यटनमंत्री मिकी पाशेको म्हणाले. सध्या लंडनमध्ये असलेल्या मिकी यांनी सांगितले की, उभयतांनी केलेले विलीनीकरण नव्हे तर ते पक्षांतर आहे व सभापतींना त्याची दखल घेण्याची गरज आहे.

"कॉंग्रेसला समूळ उखडून भाजपलाच विजयी करा'

डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
पाळी, दि.११ (वार्ताहर) - कॉंग्रेस सरकारने सामान्यांना जगणे असहाय्य करून ठेवले आहे. महागाईचा भस्मासुर येथील जनतेला कवेत घेऊन बसला आहे. अत्याचार, बलात्कार, खून, दरोडे तर रोजच होताहेत. हे कमी म्हणून आता हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा चालू आहे. हल्लेखोरांना पकडण्याची सरकारदरबारी योग्य ती कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वत्र बजबजपुरी माजली आहे. हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार येण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या २६ तारीखला आपली मते भाजपला देऊन डॉ. प्रमोद सावंत यांना भरघोस मतांनी निवडून आणा, अशी हाक भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली. भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, डॉ. प्रमोद सावंत, दयानंद सोपटे, प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद मांद्रेकर, फ्रान्सिस डिसोझा, महादेव नाईक, राजेश पाटणेकर, दामू नाईक, अनंत शेट, दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य शुभदा सावईकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पर्रीकर म्हणाले, कॉंग्रेस सरकारमधील मंत्री, आमदारांत एकवाक्यता नाही. कोणीही कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही. एकेक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या भानगडी उकरून काढून त्याला अपात्र करण्यासाठी सभापतींकडे लेखी तक्रारी करीत आहे. याचाच अर्थ सरकारात सावळागोंधळ आहे. त्यामुळे सामान्यांच्या नशिबी समस्यांविना काहीही नाही.
भाजप कार्यकर्ते संघटित झाले असून पक्षाच्या विजयासाठी ते कंबर कसून कार्यरत आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असा दावा भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. यावेळी सौ. सावईकर यांनीही आपले विचार मांडले. सुभाष मळीक यांनी स्वागत केले.यशवंत माडकर यांनी आभार मानले.अनिल परब यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रचंड संख्येने भाजपसमर्थक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोवा शिपयार्डचा गौरव

"सर्वोत्कृष्ट शिपयार्ड' पुरस्कार दिल्लीत प्रदान
पणजी, दि. ११ - गोवा शिपयार्ड लिमिटेडला २००६-०७ वर्षासाठी प्रतिष्ठेचा "सर्वोत्कृष्ट शिपयार्ड' हा पुरस्कार प्राप्त झाला असून ७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील "डीआरडीओ' भवनात शानदार सोहळ्यात संरक्षणमंत्री ए. के.अँटनी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००५ -०६ सालापासून हा पुरस्कार देण्यात येत असून पहिल्या वर्षीही तो गोवा शिपयार्डलाच मिळाला होता. सलग दोन वर्षे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करणारे गोवा शिपयार्ड हे देशातील पहिलेच शिपयार्ड होय.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री अँटनी होते. तसेच संरक्षण उत्पादन सचिव प्रदीप कुमार, संरक्षण मंत्रालय, लष्कर व विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. गोवा शिपयार्डने झपाट्याने केलेली प्रगती, उत्पादकता वाढवून ग्राहकांना पूर्ण समाधानी केल्याबद्दल, कामगारांचा जास्तीत जास्त सहभाग, योग्य गतीने संशोधन व विकास, खर्चात कपात, मनुष्यबळ विकासाला प्राधान्य व दर्जात्मक दृष्टिकोन यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रिअर ऍडमिरल ए. के. हंडा (एव्हीएसएम, व्हीएसएम) यांनी सलग दुसऱ्या वर्षीही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा पुरस्कार म्हणजे शिपयार्डच्या कार्यातील मैलाचा दगड ठरला असून त्याचे सारे श्रेय ठरवलेल्या किमतीत व आंतरराष्ट्रीय दर्जाची जहाजे निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या शिपयार्डच्या सर्व मंडळींना द्यावे लागेल, असे श्री. हंडा यांनी म्हटले आहे.

मंदिर तोडफोड प्रकरणी सरकार उदासीन - पर्रीकर

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) - गोव्यात हिंदूंच्या मंदिरांवरील आघात व मूर्ती तोडफोडीचे वाढते प्रकार अत्यंत चिंताजनक आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला सहकार्यासाठी भाजपची तयारी आहे. मात्र विद्यमान कॉंग्रेस सरकारने अजूनही त्यादृष्टीने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे या प्रश्र्नावर सरकारच्या हेतूबद्दलच शंका येते, अशी खंत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे व्यक्त केली.
फातोर्डा महिला मंडळाच्या उद्घाटनासाठी आल्याप्रसंगी येथील "कदम प्लाझा'मध्ये त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप केला. सरकारच जर पुढाकार घेणार नसेल तर आम्ही तरी काय करणार असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पारोडा येथील मूर्तिभंजन प्रकारानंतर येथे सरस प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची जी घोषणा केली होती त्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आपल्या पक्षाकडे अजून तरी तसा कोणताच प्रस्ताव आलेला नाही. वास्तविक अशा संवेदनशील प्रश्र्नांकडे पक्षीय दृष्टिकोन बाजूस ठेवून लक्ष द्यायला हवे.
आपण अशा बाबतीत खुला व्यवहार ठेवला आहे. असे सांगून आपल्या आक्षेपानंतरच ब्रॉडब्रॅण्ड सेवेबाबत संबंधित कंपनीने आपला प्रस्ताव कमी केला व त्यामुळे सरकारचे किमान ४५ कोटी वाचले, ते म्हणाले.
कचराप्रश्नी आपल्याकडे संपूर्ण राज्यास पूरक ठरेल असाच तोडगा आहे. पण सरकारची अनास्था आड येते. कचराविषयक समितीच्या आजवर फक्त दोनच बैठका झालेल्या आहेत. सरकारला त्यावरून विरोधी पक्षाची मदतच नको आहे असे दिसते पण यात जनतेचा बळी जात आहे.
आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणे हे आमचे कामच आहे. राज्यकत्यार्ंना जर सरकार चालविता येत नसेल तर त्यांनी मुकाट घरी बसावे,असेही ते म्हणाले.

"त्या' जर्मन महिलेची तक्रार मागे घेणे अशक्य

पोलिस यंत्रणा प्रचंड दबावाखाली
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- त्या जर्मन महिलेने रोहित मोन्सेरातविरोधात सादर केलेली बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांना पत्र पाठवले असले तरी, आम्ही ती तक्रार मागे घेणार नाही, आणि ती मागे घेऊही शकतही नाही. तक्रार मागे घेण्यासाठी तिने पाठवलेले पत्र आता पोलिसांसाठी नगण्य आहे,' असे आज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झाले असून पोलिसांची त्यामुळे विलक्षण कोंडी झाली आहे. या स्थितीत पोलिस महानिरीक्षकांनी गोव्याबाहेरच राहणे पसंत केले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणी कोणीच पोलिस अधिकारी स्पष्टपणे बोलायलाही तयार नाही. त्यामुळे राजकीय नेत्याच्या दबावाखाली पोलिस अधिकारी कसे वावरत आहेत, याचे मासलेवाईक उदाहरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, त्या जर्मन महिलेने पोलिस तपासाला सहकार्य करणे बंद केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठीच अडचण निर्माण झाली आहे. तिने अद्याप त्या पीडित मुलीच्या संगणकाचे हार्डडिस्क दिले नसल्याने तपासात अडचण येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अश्लील छायाचित्र आणि "एसएमएस' यांची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सध्या पोलिस ते अश्लील छायाचित्र, एसएमएस व मोबाईल संचासंदर्भातील अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.

Monday 10 November, 2008

चर्चिल, रेजिनाल्डपुढे संकट

पाळी पोटनिवडणुकीत राजकीय पेच
पणजी,दि. १० (प्रतिनिधी)-पाळी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली असताना एक वेगळाच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पाळीवर पुन्हा एकदा आपल्या वर्चस्वाची भाषा करणाऱ्या कॉंग्रेससमोर या निवडणुकीपूर्वी सरकारवरच संक्रांत ओढवू शकते. पाळी पोटनिवडणुकीसाठी उद्या ११ रोजी सेव्ह गोवा फ्रंट पक्षाच्या उमेदवारी अर्जाच्या ग्राह्यतेवर निर्णय होणार असून या पक्षातर्फे सादर झालेला अर्ज ग्राह्य धरण्यात आल्यास सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्याविरोधातील अपात्रता याचिकेला बळकटी मिळणार आहे व त्यांच्या अपात्रतेचा मार्ग जवळपास निश्चित होण्याची नवी डोकेदुखी सध्या सरकारसमोर उभी ठाकली आहे.
पाळी पोटनिवडणुकीसाठी "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षातर्फे दोन उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. सध्या या पक्षात संघटनात्मक वाद निर्माण झाला आहे. दोन गटांकडून पक्षावर आपले वर्चस्व सांगितले जात आहे. या दोन्ही उमेदवारांच्या अर्जांवर पाळी पोटनिवडणुकीसाठी नियुक्त झालेले निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे उद्या यासंदर्भात निर्णय देणार आहेत. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गटाच्या उमेदवाराविरोधात हरकत नोंदवल्याने ही सुनावणी होणार आहे. उद्या कोणत्याही एका गटाच्या उमेदवाराचा अर्ज जरी ग्राह्य धरला तरी त्यामुळे या पक्षाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होणार असून हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण केल्याचा चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांचा दावा फोल ठरणार आहे. पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी यापूर्वीच सभापती प्रतापसिंग राणे यांच्यासमोर चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. सेव्ह गोवा फ्रंट हा पक्ष विलीनीकरण झाला नसताना या दोघांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात यावे,अशी मागणी सदर याचिकेत केली आहे. सभापती राणे यांनी याप्रकरणी त्यांना नोटीसही बजावली आहे.
पाळी पोटनिवडणुकीचे वारे घोंगावत असताना आता हा एक नवा वाद निर्माण झाल्याने त्यामुळे राज्यात राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेव्ह गोवा फ्रंटाचे विलीनीकरण कॉंग्रेसमध्ये करून सरकारात सामील झालेल्या पक्षाच्या दोन्ही आमदारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पक्ष विलीन केला असला तरी त्याबाबत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना काढण्यात येते. तीदेखील अद्याप काढण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक आयोगाचे म्हणणे महत्त्वाचे ः ऍड, कासार
सेव्ह गोवा फं्रट पक्षाबाबत निर्माण झालेला हा पेच अभूतपूर्व असल्याचे मत ऍड. अमृत कासार यांनी व्यक्त केले. पक्षात संघटनात्मक वाद निर्माण झाल्याने व अर्जांबाबत हरकती दाखल झाल्याने उद्या निवडणूक अधिकारी सुनावणी घेणार आहेत खरे; परंतु याबाबतीत ते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा सल्ला घेणार असून त्यानुसारच ते निर्णय घेतील. सेव्ह गोवा पक्ष जर खरोखरच कॉंग्रेसमध्ये विलीन झाला असेल तर त्यासंबंधीची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढणे आवश्यक आहे. ही अधिसूचना काढण्यात आली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या या पक्षाच्या दोन अर्जांपैकी एखाद देखील अर्ज ग्राह्य झाला तर त्याचा अर्थ हा पक्ष अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होणार आहे त्यामुळे चर्चिल व आलेक्स रेजिनाल्ड यांचा पक्ष विलीनीकरणाचा दावा कात्रीत सापडणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अर्थात, अपात्रता याचिकेबाबत निर्णय घेणे हे पूर्णपणे सभापती राणे यांच्यावरच निर्भर असेल,असे त्यांनी सांगितले.
सात अर्ज ग्राह्य
आमच्या डिचोली प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार पाळी पोटनिवडणुकीसाठी सादर झालेल्या अर्जांच्या छाननी आज सुरू झाली असता एकूण सात अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. "सेव्ह गोवा फ्रंट' पक्षात सध्या वाद निर्माण झाल्याने तसेच सध्याच्या परिस्थितीत दोन व्यक्तींकडून पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा होत असल्याने या अर्जाबाबत हरकत घेण्यात आल्याने निर्वाचन अधिकारी अरविंद बुगडे यांनी उद्या ११ रोजी यासंबंधी सुनावणी ठेवली आहे.
आज सकाळी श्री.बुगडे यांच्यासमोर अर्जांची छाननी झाल्यानंतर एकूण सात अर्ज ग्राह्य धरण्यात आले. सेव्ह गोवातर्फे दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात जोझ लोबो व बाबुसो गावडे यांचा समावेश आहे. या दोन्ही अर्जांवर हरकत घेण्यात आल्याने त्यांच्या ग्राह्यतेबाबत उद्या ११ रोजी सुनावणी होणार आहे. आज ग्राह्य ठरलेल्या अर्जांत डॉ.सुरेश आमोणकर(अपक्ष), डॉ.प्रमोद सावंत(भाजप),प्रताप गावस(कॉंग्रेस),गीता प्रताप गांवस(कॉंग्रेस),राजेंद्र नरसिंह राणे(अपक्ष)सातू मुकुंद माइणकर(अपक्ष) आदींचा समावेश आहे.

मडगावात तिघांना अटक

वाटमारी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय
मडगाव, दि.१० (प्रतिनिधी) - मडगावात काल रात्री उशीरा झालेल्या वाटमारीप्रकरणी पोलिसांनी तिघा परप्रांतियांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. मडगावात अलीकडेच घडलेल्या अशा स्वरूपाच्या घटनांमागे याच टोळीचा हात असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
काल रात्री श्रीपाद साखरे हे आपले दुकान बंद करून मुलासमवेत दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना वाटेत पाजिफोंडला अडवून त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकण्यात आली. नंतर त्यांच्याकडील पैशांची बॅग पळवण्यात आली. तथापि, साखरे व त्यांच्या मुलाने केलेल्या ओरड्यामुळे तेथील लोकांनी एकत्र येऊन पळणाऱ्या शरीफ इस्माईल मुंडा (कंकवारी-मंगळूर) नामक आरोपीला पकडून यथेच्छ चोप दिला व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नौशाद अब्दुल हमीद (२४) व सलीम आदम (क ासरकोड) यांना काल रात्रीच छापा टाकून अटक करण्यात आली. त्यांचा एक साथीदार फरारी झाला असून त्याचे वर्णन सर्व सीमा नाक्यांवर पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संशयितांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरीफ याने हा कट रचला होता. ते तिघे कोकण रेल्वे स्टेशनावर एकत्र आले होते व तेथेच हा कट शिजला. काल सकाळी पाजिफोंड भागात पोलिस असल्याची बतावणी करून एका महिलेची सोनसाखळी पळवण्याची जी घटना घडली होती त्यातही याच चौकडीचा हात आहे काय याचा शोध घेतला जात आहे. कारण महिलेने केलेल्या वर्णनाशी ही मंडळी मिळती जुळती आहेत. त्या प्रकरणाचा उलगडा झाल्यास राय येथे तसेच पालिका इमारतीमागे शेल्डेकर यांना अशाच प्रकारे गंडवले जाण्याच्या प्रकारांवरही प्रकाशझोत पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल उत्तररात्री पूर्व बगलरस्त्यावरील "सुप्रीम पार्क'मधील अँड्रयू सांतान सिकेरा यांच्या मालकीच्या बार व रेस्टॉरंटमध्ये चोरी होऊन चोरट्यांनी ७०० रु. ची रोकड पळविळी. त्यालगत असलेला एक टाईल्स शोरूम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला; पण त्याच्या मालकाने पोलिस तक्रार करण्यास नकार दर्शवला.
फातोर्डा येथेही असाच एक प्रकार घडला. तथापि, तेथे एमएच ०१ ए १२२२ क्रमांकाची एक मोटरसायकल सापडली व ती चोरीस गेल्याची तक्रार आज पोलिसांत नोंदवली गेली. सदर वाहनाचा उपयोग चोरीसाठी केला जात असावा असा पोलिसांचा कयास आहे.

"आमचे जीवन नरक बनले आहे'

"त्या' जर्मन महिलेची कैफियत
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - गोवा हा सुंदर प्रदेश आहे. मात्र आता येथे जगणे आमच्यासाठी नरक बनले आहे. आमचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या मुलीला वाईट संगत लागली. त्यामुळे आम्ही याठिकाणी अजून जास्त काळ थांबू शकत नाही. या स्थितीत माझ्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी लढा देणे मला शक्य नसून ते फाईलबंद केले जावे, असे पत्र त्या पीडित जर्मन मुलीच्या आईने पोलिसांना लिहिले आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पत्रातील तपशीलात म्हटले आहे की, तक्रार दाखल केल्यापासून आमचे जगणेच मुश्कील झाले आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहेच. त्यामुळे दुसरी "ब्रिटिश तरुणीचा मृत्यू भाग-२' होण्याची आम्हाला भीती सतावत आहे. आमची रात्रीची झोप उडाली आहे. आमच्या वकिलावर झालेला प्राणघातक हल्ल्यामुळे आम्हीही भीतीच्या छायेत वावरत आहोत.
त्यामुळे पुन्हा राज्य प्रशासनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रेमोचा गोव्याला रामराम!

आज (सोमवारी) रात्री एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गोव्याचे प्रसिद्ध पॉप गायक रेमो फर्नांडिस यांनी गोव्यात चाललेल्या या घटनांना कंटाळून आपण दीड वर्षासाठी गोवा सोडत असल्याचे जाहीर केले. आधीचा शांत गोवा कधीच नष्ट झाला. गोव्याची अशी अधोगती होईल हे आपण १९८३ मध्ये लिहिलेल्या एका कवितेत मांडले होते. आता तेच वास्तवात उतरले आहे,' असे रेमो म्हणाला.

रोहितला सशर्त जामीन

तपासकामी सहकार्य करण्याचे आदेश
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - अल्पवयीन जर्मन मुलीवरील बलात्कार व तिला अश्लील "एसएमएस' पाठवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केलेला मुख्य संशयित रोहित मोन्सेरात याला बाल न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला.
एक हमीदार व दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रोहित याची पोलिस कोठडीतून सुटका करण्यात आली. पोलिस तपासासाठी सहकार्याकरता रोहित याला तीन दिवस कळंगुट पोलिस स्थानकात प्रत्यक्ष हजर राहण्याचे तसेच सात दिवसांत पासपोर्ट न्यायालयात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच सदर पीडित मुलीच्या घराच्या परिसरातही जाऊ नये, असे आदेशात म्हटले आहे.
न्यायाधीशांनी आपल्या आदेशाचे वाचन केले तेव्हा रोहितचे वडील तथा राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा चेहरा आनंदाने फुलला होता. आपल्या समर्थकांसह बाबूश मोन्सेरात बाल न्यायालयाच्या आवारात दुसऱ्या रांगेत बसले होते. न्यायालयाच्या आवारात आणि न्यायालयाबाहेर बाबूश समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र, जेनिफर मोन्सेरात यांची गैरहजेरी जाणवत होती.
"माझा मुलगा निरपराध असून आगामी काळात मी ते सिद्ध करेन', असे बाबूश यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या जर्मन महिलेने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेतल्याप्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता, "आपल्याला त्यावर काहीही बोलायचे नाही, असे बाबूश उत्तरले. "माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, असेही सांगण्यास ते विसरेल नाही. आज सकाळी कळंगुट पोलिस ९.४५ च्या सुमारास रोहितला घेऊन पाटो पणजी येथे "श्रमशक्ती भवना'च्या पहिल्या मजल्यावरील बाल न्यायालयात हजर झाले. त्यापूर्वीच बाबूश समर्थकांची गर्दी न्यायालयाबाहेर जमली होती.
दहा वाजता सदर जामीन अर्ज सुनावणीसाठी घेण्यात आला. त्यानंतर ठीक १० वाजून १५ मिनिटांनी न्यायाधीशांनी आपल्या आदेशाचे वाचन पूर्ण केले. त्यानंतर सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून रोहितला न्यायालयातून बाहेर जाण्याची अनुमती देण्यात आली. रोहित बाहेर येताच बाबूश यांनी त्याला जवळ घेतले आणि थेट आपल्या अलिशान वाहनात बसवून घर गाठले. याप्रसंगी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, उपमहापौर यतीन पारेख, नगरसेवक उदय मडकईकर, नागेश करिशेट्टी, कॅरोलिना पो न्यायालयात हजर होते. दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून आपला मुलगा पोलिस कोठडीत असल्याने व्यथित झालेल्या जेनिफर मोन्सेरात यांचा रक्तदाब काल रात्री उतरल्याने त्यांना कांपाल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज सकाळी रोहित याचा जामीन अर्ज सुनावणीसाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, काल रात्री तक्रारदार जर्मन महिलेने आपण आपली तक्रार मागे घेत असल्याचे पत्र कळंगुट पोलिस स्थानकात पाठवले होते. यात तिने पोलिस चौकशी योग्य दिशेने केली जात नसल्याचा आरोप केला होता.तिचे वकील आयरिश रॉड्रिगीस यांनीही पोलिसांकडून पीडित मुलीला आरोपीसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे.

कोलवा समुद्रात एक बुडाला

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - कोलवा समुद्रात हैद्राबाद येथील एकटा बुडाल्याची पोलिस तक्रार दाखल झाली असून अद्याप त्याचा शोध लागलेला नसल्याने पोलिसांनी बेपत्ता म्हणून तक्रार दाखल करून घेतली आहे. आज (दि.१०) दुपारी ४.३० वाजता नवारे भिमराव अंबादास (३४) हा बुडाल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी १२ च्या दरम्यान चार मित्रांचा गट कोलवा येथे एका मित्राकडे आला होता. त्यानंतर दुपारी जेवण उरकून लगेच हे चौघे समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी नवारे समुुद्रात खोल गेल्याने गटांगळ्या घ्यायला लागला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता अशी माहिती कोलवा पोलिस स्थानकाची उपनिरीक्षक मिरा डिसिल्वा यांनी दिली. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक डिसिल्वा करीत आहेत.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन

पणजी, दि.१० - भाजपचे पाळी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या मंगळवार ११ रोजी संध्याकाळी ४ वा. शेट्ये प्लाझा, सिंडिकेट बॅंकेजवळ साखळी येथे होणार आहे. उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, उमेदवार डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पाळी मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे सरचिटणीस तथा प्रवक्ते गोविंद पर्वतकर यांनी केले आहे.

म्हापसा भागात जोडप्याची गळफास लावून आत्महत्या

म्हापसा दि. १० (प्रतिनिधी) - पावलोवाडो चिखली येथे वेणू गोपाळ (३०) व पत्नी श्रीमती वेणू गोपाळ या दोघांनी गळफास लावून काल रात्री आत्महत्या केली. त्यांना ५ व ४ वर्षांची दोन मुले आहेत. त्यापैकी एकाचे नाव वासू असून दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. त्या दिशेने तपास सुरू आहे.
हैदराबाद येथील अपर्णा कर्वे या महिलेने चिखली कामुर्ली येथे एक घर विकत घेऊन ते दुरुस्त केले होते. कर्वे यांनी या घराच्या देखरेखीसाठी वेणू गोपाळ याला दरमहा सात हजार रुपये वेतनावर ठेवण्यात आले होते. काल रात्री एका खोलीत वेणू गोपाळ याने चादरीचे टोक घराच्या वाशाला बांधून आत्महत्या केली; तर त्याच्या पत्नीने घराबाहेरील खोलीत ओढणी वाशाला बांधून आपली जीवनयात्रा संपवली. आज सकाळी दोन्ही मुलांनी आपले आई वडील घरात लटकत असल्याचे पाहून टाहो फोडला. घरात रडारड चालल्याचे पाहून एका पंच सदस्याने तेथे नजर टाकली आणि या घटनेची माहिती तातडीने म्हापसा पोलिसांना दिली.
पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक ब्रन्डटन व केसरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिले. या जोडप्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. सोन्यासारखी मुले आता पोरकी झाल्याने गावातील लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.

भारताचा दिग्विजय...

कांगारूंचा धुव्वा; गांगुलीला विजयी निरोप
नागपूर, दि. १० - महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय संपादून मोठ्या जोशात मालिका २-० अशा फरकाने खिशात टाकली. त्याचबरोबर यजमानांनी झळाळत्या बॉर्डर-गावस्कर करंडकावर आपले नाव कोरले आहे. या यशामुळे भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी जाऊन पोचला आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुलीची निवृत्तीही भारताने विजयी वातावरणात साजरी केली! "सामनावीर' पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा नवोदित गोलंदाज जेसन क्रेझा याने, तर मालिकावीर पुरस्कार उंचपुऱ्या ईशांत शर्माने पटकावला. त्यामुळे आजचा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वार्थाने ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरला.
विजयी करंडक कर्णधार धोनीने माजी कर्णधार अनिल कुंबळेसह उंचावला. नागपूर येथे झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. भारताने हा सामना २७२ धावांनी जिंकला. भारताने पाहुण्यांना जिंकण्यासाठी ३८२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान कठीण असल्याने पाहुणे सामना वाचविण्याचाच प्रयत्न करतील असे वाटत होते. तथापि, आज सकाळी खेळ सुरू झाला तेव्हा कांगारूंची पळापळच सुरू झाली. पहिल्या सत्रात तीन महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर बाकीच्यांनीही नंतर तोच मार्ग अनुसरला. जगज्जेत्यांची बलवंत फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. उपाहारानंतर सुरू झालेल्या दुस-या सत्रात हरभजन आणि नवोदित अमित मिश्राने ऑस्ट्रेलियन खेळा़डूंना पळता भुई थोडी केली. मिश्राने याही सामन्यात चमक दाखवत पाच गडी बाद करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उर्वरित फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावण्याचेे इतिकर्तव्य पार पाडले आणि भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
गेल्या सामन्यातील शतकवीर आज सकाळी कॅटिच फक्त १६ धावांवर ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देऊन बाद झाला. कर्णधार रिकी पॉंटींगही मिश्राच्या फेकीवर धावचीत झाला. मायकल क्लार्क २२ धावांवर ईशांतचाच बळी ठरला. त्याचा झेल धोनीने घेतला. मग पाहुण्यांच्या उर्वरित फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठविण्याची जबाबदारी मिश्रा व हरभजनने लीलया पेलली. मॅथ्यू हेडनला (७७) भज्जीनेे पायचीत पकडले. हेडनने ९३ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि एक षटकारच्या मदतीने ७७ धावा केल्या. माइक हसी वैयक्तिक १९ धावसंख्येवर बाद झाला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने १११ धावा जमवून तीन गडी गमावले होते. ब्रॅड हॅडिन ४ धावांवर बाद झाला. शेन वॉटसनला (९) हरभजनने धोनीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. अमित मिश्राने जेसन क्रेजाला (४) बाद करीत आठवा गडी तंबूत पाठवला. नंतर ब्रेट ली आणि मिशेल जॉन्सन यांना बाद करून हरभजनने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद ४४१
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद ३५५
भारत दुसरा डाव ः सर्वबाद २९५
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव
मॅथ्यू हेडन पायचीत गो. हरभजन सिंग ७७ (९३ चेंडू, ८ चौकार, १ षटकार)
सायमन कॅटीच झे. महेंद्रसिंग धोनी गो. ईशांत शर्मा १६ (१६चेंडू, ३ चौकार)
रिकी पॉंटिंग धावबाद ८ ( ६चेंडू, २ चौकार), मायकेल क्लार्क झे. महेंद्रसिंग धोनी गो. ईशांत शर्मा २२ (३० चेंडू, ३ चौकार), मायकेल हसी झे. राहुल द्रविड़ गो. अमित मिश्रा १९ (३०चेंडू, २ चौकार) शेन वॉटसन झे. महेंद्रसिंग धोनी गो. हरभजन सिंग ९ (३४चेंडू), ब्रॅड हॅडिन झे. सचिन तेंडुलकर गो. अमित मिश्रा ४ (१०चेंडू), कॅमरुन व्हाईट नाबाद २६ (४९चेंडू, ३ चौकार), जेसन क्रेज्झा झे. महेंद्रसिंग धोनी गो. अमित मिश्रा ४ (१७ चेंडू), ब्रेट ली झे. मुरली विजय गो. हरभजन सिंग ० (३ चेंडू), मिचेल जॉन्सन पायचीत गो. हरभजन सिंग ११ १६चेंडू, १चौकार)
एकूण: २०९/१० (५०.२) धावगती : ४.१५
अवांतर : १३ (बाइज - ६, वाईड - ४, नोबॉल - २, लेग बाईज - १, दंड - ०)
गडी बाद होण्याचा क्रमः १-२९(५.४), २-३७(७.०), ३-८२(१५.५), ४-१५०(२८.४), ५-१५४(२९.२), ६-१६१(३२.४), ७-१७८(३८.४), ८-१९०(४३.५), ९-१९१(४४.४), १०-२०९(५०.२)
गोलंदाजी ः झहीर खान ८-०- ५७- ०, ईशांत शर्मा ९-०- ३१- २, हरभजन सिंग १८.२-२- ६४- ४, वीरेंद्र सेहवाग ४-०- २३- ०, अमित मिश्रा ११-२- २७- ३

रोहितविरोधी पोलिस तक्रार जर्मन महिलेकडून मागे?

विविध तर्कवितर्कांना उधाण
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - आपल्या अल्पवयीन मुलीवर मंत्र्याच्या पुत्राने बलात्कार केल्याचा आणि अश्लील एसएमएस पाठवत असल्याचा आरोप करून दोन मंत्र्यांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कात्रीत पकडलेल्या त्या जर्मन महिलेने आपली तक्रार मागे घेण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक तसेच कळंगुट पोलिस स्थानकात एक पत्र पाठवल्याने खळबळ माजली आहे. "पोलिस व्यवस्थेवरून माझा विश्वास उडालेला आहे, मला न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे रोहित याच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे' असे तिने तक्रार मागे घेण्यासाठी केलेल्या पत्रात म्हटले आहे, अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. याविषयी पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना विचारले असता, "आपण रजेवर असून आपल्याला अशा प्रकरणाचे एक पत्र आल्याची कार्यालयातून माहिती मिळाली आहे. परंतु, त्या पत्रात नेमके काय म्हटले आहे, हे अद्याप उघड करणे योग्य होणार नाही' असे ते म्हणाले. या पत्रामुळे आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन "सुमोटो' याचिका दाखल करून घेतली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात संशयिताला अटकही झालेली असून उद्या त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पिडीत मुलीच्या आईने तक्रार मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे, असे कायदे तज्ज्ञाचे मत आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांचे सुपुत्र व नातेवाईक गुंतल्याचे आणि मंत्रीच सहआरोपी असल्याने गेल्या काही दिवसापूर्वी या महिलेवर प्रचंड राजकीय दबाव येत असल्याचे तिचे वकील आयरिश रॉड्रिगीस यांनी जाहीर केले होते. त्याचप्रमाणे यापूर्वी खुद्द शिक्षणमंत्र्याची पत्नी व मुख्य संशयित रोहित मोन्सेरात याची आई जेनिफर मोन्सेरात हिने तिच्या घरी जाऊन तिला धमकावल्याची तक्रार यापूर्वी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.
परंतु, अद्याप त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
दि. २ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा या महिलेने कळंगुट पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दि. १४ ऑक्टोबर रोजी ती महिला आणि तिचे वकील रोड्रिगीस पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी जाणार होते. त्याच्या आदल्या रात्री दि. १३ ऑक्टो. रोजी ऍड. रोड्रिगीस यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याही परिस्थितीत दि. १४ रोजी इस्पितळात त्या महिलेसह सदर पोलिस तक्रार नोंदविण्यात आली होती.
दरम्यान, आज घडलेल्या या घडामोडीत त्या जर्मन महिलेने पोलिस अधीक्षकांना लिहिलेल्या त्या पत्रात नेमके काय म्हटले आहे, कोणत्या कारणासाठी ती गंभीर स्वरूपाची तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर कोणी दबाव टाकला आहे का, हे प्रश्न सध्या सर्वांना सतावत आहे. येत्या काही दिवसांत या पत्रामागचे रहस्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आज तुलसीविवाह

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी) - देव्हाऱ्यांतील श्रीकृष्णाचा दारी उभ्या असलेल्या तुलसीशी विवाह लावणारा पवित्र असा तुलसीविवाह उद्या सोमवारी साजरा होत असून मडगाव बाजारात आज रविवार असूनही त्यासाठींचे सामान खरिदण्यास लोकांची झुंबड उडालेली जाणवली.तुलसी विवाहानंतर मंगल कार्यांची वाट मोकळी होत असल्यानेही तुलसीविवाहाची सारेच आतुरतेने वाट पहात असतात.
या पारंपरिक विवाहासाठी लागणारा ऊस, आवळे-चिंचा,पोहे,चुरमुरे,कागदी फुले, जिन्याच्या काठ्या यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालेली असून येथील पिंपळकट्ट्या जवळच्या मोकळ्या जागेत त्या वस्तू घेऊन बसलेले विक्रेते पाहावयास मिळाले. आज रविवारची सुट्टी साधून लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली . या विवाहासाठी मोठ्या प्रमाणात ऊस बाजारात येतो . पिंपळ कट्ट्याजवळ त्याच्या राशी दिसून आल्या.
आवाळे-चिंचा यांची आवक खेडेगावातून होते व गेल्या काही वर्षांपासून खेड्यातील महिला त्यांची विक्री करताना दिसतात, मडगावात बोरी-शिरोडा तसेच रिवण ,बेंदोडे-पाडी या भागातून या वस्तू विक्रीस येतात. यंदाही तशाच त्या आलेल्या आहेत. वाढत्या महागाईनुसार त्यांचे दरही वाढल्याचे काहीनी सांगितले. पण हा उत्सव समाजाच्या सर्व थरात उत्साहाने साजरा केला जात असल्याने त्या दरांची पर्वा न करता लोकांनी त्या वस्तू खरेदी केल्या.

बदनामी थांबवा! लष्कराने अखेर एटीएसला खडसावले

रवींद्र दाणी
नवी दिल्ली, दि.९ - संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या साऊथ ब्लॉकने काल बेलगाम "एटीएस'वर "ब्रेक" लावला. महाराष्ट्राचे "एटीएस' परवापर्यंत आणखी दोन कर्नल व एका मेजरच्या चौकशीची भाषा बोलत होते. पण, काल एटीएस प्रमुखांनी मुंबईत एक पत्रपरिषद घेऊन लेफ्ट. कर्नल पुरोहित यांच्याव्यतिरिक्त लष्करातील आणखी कोणत्याही अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येणार नाही असे घोषित केले. राजधानीत घडलेल्या घडामोडींनी हादरलेल्या एटीएसला काल पत्रपरिषद घेऊन ही घोषणा करावी लागली .
मिलिटरी इंटेलिजन्स
मिलिटरी इंटेलिजन्सने आपला अहवाल लष्करप्रमुखांना दिल्यानंतर लष्कराने याबाबतीत अतिशय आक्रमक भूमिका घेतली असे समजते. लष्करप्रमुख प्रथम चिंताग्रस्त होते, पण मालेगाव स्फोटामागे पुरोहित नाहीत हे मिलिटरी इंटेलिजन्सने स्पष्ट केल्यानंतर या चिंतेची जागा संतापाने घेतली. लष्कराच्या बदनामीने संतप्त झालेल्या जनरल दीपक कपूर यांनी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी चालविलेली लष्कराची बदनामीची मोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला. जनरल कपूर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी यांच्याशी चर्चा केली. संरक्षणमंत्र्यांनी नंतर गृहमंंत्री शिवराज पाटील यांना सारी कल्पना दिली. शिवराज पाटील यांनी गृहसचिव मधुकर गुप्ता यांना पुढील कारवाई करण्यास सांगितले.
तीव्र नाराजी
महाराष्ट्र एटीएसजवळ पुरोहित यांच्याविरुध्द कोणताही पुरावा नाही. आता आणखी सेवारत अधिकाऱ्यांना अटक करुन परिस्थिती चिघळवू नका असा स्पष्ट निर्देश महाराष्ट्र पोलिसांना देण्यात आला. एवढेच नाही तर याची जाहीर घोषणा करा असेही सांगण्यात आले. त्यानंतरच करकरे यांनी काल मुंबईत पत्रपरिषद घेऊन यात लष्कर गुंतलेले नाही अशी घोषणा केली.
आश्रम-साधू-संत
लष्कराने सज्जड दम दिल्यानंतर एटीएसने आता आश्रम-साधू-संत यांना टारगेट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. वेगवेगळ्या राज्यातील आश्रमांवर धाडी घालणे, नवनवी माहिती लिक करणे हे नवे धोरण एटीएसतर्फे राबविले जाणार असल्याचे कळते.

बॉंब धमकीमुळे रेलगाड्यांची कडक तपासणी

कोकण रेल्वेने सुरक्षा व्यवस्था वाढविली
मडगाव,दि.९ (प्रतिनिधी)- तीन रेल्वेगाड्यांत बॉंब ठेवण्यात आल्याबाबत दहशतवाद्यांकडून काल देण्यात आलेली धमकी ही संबंधित रेलगाड्यांची कसून तपासणी केल्यानंतर अफवाच असल्याचे आज आढळून आले, मात्र या धमकीमुळे मध्यंतरी कोकण रेल्वे सुरक्षा व्यवस्थेत आलेले शैथिल्य दूर होऊन परत एकदा ती व्यवस्था कडक करण्यात आल्याचे जाणवले.
मंगला, नेत्रावती व बिकानेर या तिन्ही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये बॉंब ठेवल्याची धमकी निनावी फोनवरून आल्यानंतर रेल्वेच्या बेलापूर येथील नियंत्रण कक्षाने गोवा पोलिसांना सतर्क केले होते, त्यानंतर रेल्वे पोलिस यंत्रणा सतर्क झाली व त्यांनी या गाड्यांची जाताना तसेच परततानाही तपासणी सुरु केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाकुलम अर्नाकुलम पहाटे ३ वाजता, नेत्रावती पहाटे ५ वाजता, तर बिकानेर सकाळी १०-५० वाजता मडगाव स्टेशनात दाखल झाल्या असता बॉंबशोधपथकाने श्र्वानपथकाच्या मदतीने त्यांची कसून तपासणी केली.अशीच तपासणी काणकोण व थिवी स्टेशनांवरही केली गेली पण काहीच आक्षेपार्ह सापडले नाही.
कालच्या फोननंतर दिल्लीहून आलेल्या या गाड्या अशाच तपासण्यात आल्या होत्या. मात्र या तपासणीतून जरी काहीच निष्पन्न झालेले नसले तरी गोव्यातील कोकण रेल्वेच्या सर्वस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था पुन्हा कडक केली गेली आहे. मडगाव स्थानकावर आज सकाळपासूनच पोलिसांची लगबग जाणवत होती. अर्नाकुलम व नेत्रावती जरी कोणत्याही अडथळ्याविना पुढील प्रवासाला रवाना झालेल्या असल्यातरी सकाळी पावणेअकराच्या सुमारास येणारी बिकतानेर दाखल होऊन पुढील प्रवासास निघेपर्यंत सुरक्षा यंत्रणेवरील तणाव कायम राहिला, मात्र ती रवाना झाल्यावर सर्वांनाच हायसे वाटले.

मुख्यमंत्र्यांना सहआरोपी करा

हल्लाप्रकरणी आज आयरिशची राज्यपालांकडे मागणी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - प्राणघातक हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ""ग्रीन सिग्नल'' दिल्याचा आरोप करणारे"ऊठ गोयकारा' संघटनेचे पदाधिकारी उद्या सकाळी राज्यपाल एस.एस.सिद्धू यांची भेट घेणार आहेत. यावेळी श्री. कामत यांना त्वरित मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची तसेच या हल्ला प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्याची मागणी करणार आहेत. दि. १३ ऑक्टोबर रोजी ऊठ गोयकारा संघटनेचे प्रवक्ते ऍड.आयरिश रॉड्रिगीस आणि प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे महासुत्रधार मुख्यमंत्री दिगंबर कामत असल्याचा आरोप ऍड. रॉड्रीगीज यांनी केला आहे.
हल्ला होण्याच्या तीन दिवसांअगोदर मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी हल्ल्याच्या सूत्रधारांची गुप्त बैठक झाली होती,असा दावा ऍड. रॉड्रिगीस यांनी यापूर्वी केला आहे. या बैठकीत शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार आग्नेल फर्नांडिस, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते, असा दावाही त्यांनी त्यांनी केला आहे.
आमच्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार संदीप वायगणकर असला तरी, मुख्यसुत्रधार बाबूश मोन्सेरात आणि महासुत्रधार मुख्यमंत्री दिगंबर कामत असल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे.

कोठडी संपल्याने रोहित आज बाल न्यायालयात

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - रोहित मोन्सेरात याची सहा दिवसांची पोलिस कोठडी उद्या संपत असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेल्या शुक्रवारी तात्पुरता बाल न्यायालयाचा ताबा असलेले न्यायाधीश प्रमोद कामत यांनी रोहित याचा जामीन अर्ज फेटाळून लावून हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने त्याला नियमित न्यायालयासमोर हजर केले जावे, असे म्हटले होते तसेच त्याच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीतही वाढ करण्यात आली होती.
रोहित मोन्सेरात याला अटक केल्यानंतर त्याचे वडील शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपण जामीन अर्जासाठी अर्ज दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, त्यानंतर रोहित याला म्हापसा प्रथम वर्ग न्यादंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोन्सेरात यांचे वकील हरुण ब्राझ डिसा यांनी रोहित याच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
ते अश्लील एसएमएस आणि अश्लील छायाचित्रांचे अद्याप चाचणी करण्यात आलेली नाही. सदर फोटो आणि एसएमएस न्यायालयात सादर करण्यापूर्वी पोलिसांना या एसएमएस व छायाचित्राची सत्यता पडताळून त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. सदर "एसएमएस' कोणत्या मोबाईलवरून आले, तसेच त्या "एसएमएस' व अश्लील छायाचित्रात फेरफार करण्यात आलेली नाही ना, हे पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. संशयिताच्या वकिलाने रोहित याच्या विरोधात कोणतेच वैद्यकीय पुरावे नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिस आता कोणत्या पद्धतीने आपली बाजू न्यायालयात मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

संगीत रंगभूमीवरील विख्यात अभिनेत्री किशोरी हळदणकर निवर्तल्या

माशेल, दि. ९ (प्रतिनिधी) - लोकनाट्यापासून संगीत व सामाजिक नाटकापर्यंत नाट्यप्रवास केलेल्या गोव्याच्या संगीत रंगभूमीवरील एक विख्यात अभिनेत्री किशोरी हळदणकर यांचे अल्प आजाराने, खांडोळा येथील त्यांच्या राहत्या घरी आज (रविवार दि. ९) पहाटे निधन झाले. त्या ७० वर्षाच्या होत्या.
बालपणापासून संगीताची हौस असल्याकारणाने गावातील गवळणकाला व जत्रेतील संगीत नाटकांत किशोरी हळदणकर यांनी भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर संगीत रंगभूमीवरील त्याच्या वावर कायम होत असतानाच वसंत आमोणकर, सखाराम बर्वे, मनोहरबुवा शिरगांवकर, तुकाराम फोंडेकर, तुळशीदास बोरकर, बाबी बोरकर आदी अनेक बुजुर्ग जाणकारांकडून त्यांना संगीतविषयक मार्गदर्शन लाभले,
"सैतानी पाश' या नाटकांत वसंत आमोणकर यांच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. सखाराम बर्वे यांच्या दिग्दर्शनाखाली "संशयकल्लोळ' मधील खेती व "स्वयंसेवक'मधील चिमणा या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी केल्या. कै. बर्वे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली येथेही त्यांना नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्र राज्य नाट्यमहोत्सवात "आरण्यक' या नाटकांतील त्यांनी सादर केलेल्या गांधीरीच्या भूमिकेसाठी आणि "शांतादुर्गा नाट्यमंडळ' डिचोली या संस्थेमार्फत सादर केलेल्या "जीवा शिवाची भेट' मधील रेणुका या भूमिकांसाठी त्यांना अभिनयाचे रौप्यपदक देऊन गौरविण्यात आले होते. तातोबा वेलिंगकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक नाटकांतून पुरुष व स्त्री भूमिका साकार केल्या.
त्यांच्या रंगभूमीच्या दीर्घ सेवेबद्दल त्यांना गोवा सरकारचा "राज्य सांस्कृतिक पारितोषिक पुरस्कार' ( १९८२-८३), त्याचप्रमाणे "रंगदेवता रघुवीर सावकार पुरस्कार (१९९५)' प्रदान करून गौरविण्यात आले होते. गेल्या २७ मे २००८ रोजी माशेल येथील महाशाला कला संगम संस्थेतर्फे आयोजित संगीत संमेलनात त्यांना यंदाचा कला अकादमीचा "रंगसन्मान पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते.
संशय कल्लोळ, सौभद्र विद्याहरण, मृच्छकटिक, एकच प्याला, स्वयंवर, ययाती आणि देवयानी, करीन ती पूर्व, मत्स्यगंधा, मानापमान, जग काय म्हणेल, पंडितराज जगन्नाथ मेेनका, सत्तेचे गुलाम, अशा नाटकांतून त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. या नाटकांतून मा. दत्ताराम, सुर्या वाघ, वसंत सावकारा विश्वनाथ नाईक, जयकृष्ण भाटिकर, डॉ. सावळो केणी, कृष्णा मोये, कीर्ती शिलेदार, नारायण बोडस, विश्वनाथ बागूल, जयश्री शेजवाडकर, शंकर घाणेकर, चित्तरंजन कोल्हटकर, मालती पेंढारकर, नयना आपटे आदी मातब्बर कलाकारांच्या बरोबरीने त्यांनी भूमिका केल्या होत्या.

Sunday 9 November, 2008

मेरठ येथील स्फोटात पाच ठार, तीन जखमी

दहशतवादी घटना नाही
मेरठ, दि. ८ - मेरठ शहरातील बंगाली बस्ती या भागातील कचराघरात मॉर्टर शेलचा(उखळी तोफेत वापरण्यात येणारा गोळा) स्फोट होऊन त्यात पाच जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत असे सांगून पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे दहशतवादी कृत्य नाही.
कचरा गोळा करणाऱ्यांना लष्करातील मॉर्टर शेल सापडला. त्याची ठोकपीट करीत त्यातून धातू काढत असताना त्याचा स्फोट झाला, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुवीर लाल यांनी सांगितले. स्फोटात ठार झालेल्यांची ओळख पटली असून या सर्वांचे वय १० ते १७ वर्षे आहे. जखमी झालेल्या तिघांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
बहुतांश बांगलादेशी लोकांची वस्ती असलेल्या ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागाची पोलिसांनी झडती घेतली असता अशाचप्रकारचा आणखी एक मॉर्टर शेल पोलिसांना आढळून आला आहे. हा स्फोट म्हणजे केवळ एक अपघात आहे, अतिरेक्यांनी घडवून आणलेला स्फोट नाही. असे असले तरी या भागातील कचराघरात हे तोफगोळे कसे आले याचा शोध आम्ही घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

सांधेरोपणात "वोखार्ट' अग्रेसर

पणजी,दि. ८ (प्रतिनिधी) - बंगळूर येथील "वोखार्ट' इस्पितळात सांधेदुखी व सांंधारोपणावर विशेष उपचारामुळे या दुखण्यामुळे त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती या इस्पितळाचे अस्थिशल्य विशारद डॉ.संजय पै यांनी दिली.सांधेदुखी किंवा सांधारोपणाबाबत उपचार करणारे देशातील एक अग्रेसर इस्पितळ म्हणून वॉखार्टने आपली ओळख बनवली असून या त्रासामुळे त्रस्त लोकांनी या इस्पितळाशी संपर्क साधावा,असे आवाहनही डॉ.पै यांनी केले.
आज येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना डॉ.पै यांनी ही माहिती दिली.गोव्यात सांधेदुखी व सांधारोपणाबाबत उपचाराची सोय नसल्याने लोक विविध इतर राज्यांत जातात. इतर राज्यांच्या तुलनेत खर्च व उपचाराची पद्धत यात वोखार्ट इस्पितळात विशेष सोय असल्याने या उपचारासाठी इथे येणेच लोक पसंत करतात,असेही त्यांनी सांगितले. या वर्षी सुमारे ५५० सांधारोपणाची प्रकरणे हाताळली जाणार असल्याची माहिती देत या दुखण्यावर उपचार उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्याने आता कुठे लोकांत जागृती निर्माण होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. वोखार्ट इस्पितळाचा समावेश गोवा सरकारने मेडिक्लेम योजनेअंतर्गत केल्याने या विमा योजनेचा लाभही या उपचारासाठी मिळू शकतो. या शस्त्रक्रियेसाठी ८० हजारापासून ते चार ते पाच लाख रूपये खर्च येतो. सध्या विविध कंपन्यांकडून आलेल्या आरोग्य विमा योजनांकडे अजूनही दुर्लक्ष करण्याची मानसिकता बदलावी लागेल,असा सल्ला देत या परिस्थितीत आरोग्य विमा उतरवणे ही गरज असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. १९९१ साली सांधारोपणाचे पहिले ऑपरेशन केलेल्या डॉ.पै यांनी आत्तापर्यंत सुमारे तीन हजारांवर ऑपरेशन केल्याची माहितीही यावेळी दिली. बंगळूर बनरगट्टा येथे असलेले वोखार्ट इस्पितळ गोव्यातील लोकांना जवळचे आहेच परंतु येथील डॉक्टर किंवा इतर कर्मचारी वर्ग यांना मराठी व कोकणी भाषा अवगत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोणतीही संपर्काची किंवा आपल्या दुखण्याबाबत विस्तृतपणे सांगण्याची अडचण निर्माण होत नाही,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
दरम्यान,सांधारोपणाबाबत लवकरच बांबोळी येथील गोवा आरोग्य महाविद्यालयात लवकरच येथील डॉक्टरांसाठी खास ऑपरेशन कार्यशाळा घेण्याचाही विचार असल्याची माहिती त्यांनी दिली.

"कॉंग्रेसने केलेल्या उपेक्षेचा पाळीवासीय वचपा काढणार'

भाजपतर्फे डॉ.प्रमोद सावंत यांची उमेदवारी सादर
डिचोली, दि. ८ (प्रतिनिधी) - पाळी मतदारसंघाची कॉंग्रेसकडून आजपर्यंत सातत्याने फक्त उपेक्षाच करण्यात आली. मगोनंतर कॉंग्रेसनेच सर्वाधिक काळ सत्ता कॉंग्रेसने उपभोगली आहे, त्यामुळे या मतदारसंघाला नेहमी सापत्नभावाची वागणूक देऊन येथील लोकांची फसवणूक केलेल्या कॉंग्रेसच्या भूलथापांना पाळीची जनता मुळीच बळी पडणार नाही. विद्यमान कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत गोव्याची सुरू असलेली मानहानी पाहता भाजपचे उमेदवार डॉ.प्रमोद सावंत यांना निवडून आणून जनता कॉंग्रेस विरोधातील आपला रोष जाहीरपणे व्यक्त करेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाळी पोटनिवडणुकीसाठी आज भाजपातर्फे डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, म्हापशाचे आमदार, फ्रान्सिस डिसेझा, डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर, मयेचे आमदार अनंत शेट, भाजप मंडळ समितीचे पदाधिकारी, महिला, मोर्चाच्या पदाधिकारी व असंख्य भाजप कार्यकर्ते हजर होते
डॉ.प्रमोद सावंत यांच्या रूपाने तरुण व तडफदार उमेदवार रिंगणात उतरवण्यात आल्याने या परिसरातील भाजप कार्यकर्त्यांत चैतन्यदायी वातावरणांत पसरले आहे. डॉ. सावंत यांनी आपला अर्ज उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे यांच्याकडे सादर केला. डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला अर्ज सादर करताना मराठी भाषेतून घेतलेली शपथही आजचे वैशिष्ट्य ठरले. भाजप मराठी भाषेप्रती संवेदनशील असून कोकणी बरोबर मराठीलाही समान न्याय मिळावा यासाठी गेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधेयकही आणले होते,याचीही आठवण यावेळी करून देण्यात आली.
श्रीपाद नाईक म्हणाले, पाळी मतदारसंघात विकासकामे केल्याचे सांगून कॉंग्रेस मतदारांची दिशाभूल करीत आहे. केवळ खर्चाची आकडेवारी लोकांच्या माथी मारून त्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न लोक हाणून पाडतील,असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. डॉ. आमोणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असला तरी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत व त्यात निश्चितच यश येईल. डॉ. सुरेश आमोणकर भाजपच्या विजयासाठी हातभार लावतील, असेही श्री. नाईक म्हणाले.
पाळी मतदारसंघातील बेरोजगारी दूर करणे, हा परिसर प्रदूषणमुक्त ठेवणे व येथील पायाभूत सुविधा निर्माण करणे हे आपले प्राधान्य असेल असे सांगून आपल्या विजयासाठी भाजपचे शिस्तबद्ध आणि समर्पीत कार्यकर्ते महत्त्वाचे योगदान देत असल्याने १०० टक्के विजयाची खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर म्हणाले, डॉ. आमोणकर यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या १२ तारखेनंतरच एकंदर चित्र स्पष्ट होणार आहे. डॉ. प्रमोद सावंत यांना उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे त्यामुळे त्यांच्या विजयासाठी सारेजण संघटितपणे काम करतील व पाळीत प्रचंड बहुमताने कमळ फुलेल असा विश्वास आपणाला वाटतो.
एकूण १५ अर्ज सादर
पाळी पोटनिवडणुकीसाठी आज (शनिवारी) शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारी अर्ज सादर झाले असून एकूण १५ उमेदवारी अर्जांची नोंद झाली आहे. या उमेदवारांत डॉ. प्रमोद सावंत (भाजप), डॉ.सुरेश आमोणकर (अपक्ष), प्रताप गावस (कॉंग्रेस), गीता प्रताप गावस(कॉंग्रेस), राजेंद्र नरसिंह राणे(अपक्ष), जोस लोबो(सेव्ह गोवा फ्रंट), बाबुसो गावडे(सेव्ह गोवा फ्रंट), सातू मुकुंद माईणकर(अपक्ष), सुभाष मळिक (भाजप) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

एकरकमी कर्जफेड प्रकरणी चौकशी सुरू

गोवा राज्य सहकारी बॅंक
रिझर्व्ह बॅंकेचे पथक गोव्यात
१४ कोटी ४९ लाख रुपयांचा
घोटाळा झाल्याची तक्रार



पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - गोवा राज्य सहकारी बॅंकेत एकरकमी कर्ज फेड योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीत सुमारे १४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर वार्षिक निरीक्षणासाठी आलेल्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) पथकाने या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ११ ऑक्टोबर २००५ ते ३१ मार्च २००६ या काळात एकरकमी कर्जफेड योजनेअंतर्गत कुणाकुणाला सवलत देण्यात आली याची सखोल माहिती बॅंकेच्या सर्व शाखांतून या पथकाने मागवल्याने संचालक मंडळ तथा अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार या बॅंकेत एकरकमी कर्ज फेड योजनेखाली सुमारे १४ कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार सदानंद वायंगणकर या भागधारकाने १६ ऑक्टोबर २००८ रोजी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रती आर्थिक विभाग,गुन्हा अन्वेषण विभाग आदींना पाठवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आपल्या नियमित सवयीप्रमाणे ही तक्रार आपल्याकडे ठेवून घेतली असून ती नोंद करण्यासाठी काहीही हालचाली सुरू नाहीत, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती केंद्रीय सहकार निबंधकांनाही देण्यात आली आहे. एकीकडे या तक्रारीमुळे गोंधळ उडाला असता अचानक वार्षिक पाहणी व निरीक्षण करण्यासाठी आलेल्या "आरबीआय' पथकाला या तक्रारीची माहिती मिळाल्याने त्यांनी आता या दृष्टीने चौकशीवर लक्ष केंद्रित केले आहे. तक्रारीत नोंद केलेल्या ठरावीक मुदतीत विविध शाखांतून कुणाकुणाला या योजनेचा लाभ देण्यात आला याची सखोल माहिती मागवण्यात आली आहे.
श्री.वायंगणकर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वरील काळात एकूण १३० जणांना आवश्यक कायदेशीर सोपस्कार न पार पाडता व एकरकमी कर्जफेड योजनेसाठीच्या नियमांची पूर्तता न करता कोट्यवधींची सवलत दिली आहे. या एकूण प्रकरणी सुमारे १४ कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. मुळातच "आरबीआय' ने थकीत व प्रलंबित कर्जांच्या वसुलीसाठी ही योजना तयार करून नाबार्डकडे पाठवली होती व नाबार्डने ती तयार करून सर्व बॅंकांना पाठवली होती. वास्तविक या योजनेला केंद्रीय सहकार निबंधक व संचालक मंडळाची मान्यता घेणे आवश्यक होते. राज्य सहकारी बॅंकेच्या तत्कालीन मंडळाने तसे न करताच १३० जणांची यादी तयार करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
एकरकमी कर्जफेड योजनेअंतर्गत संगनमताने व्यवहार व कागदपत्रे तयार केल्याचे ठपका तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या घोटाळ्यास त्यांनी संचालक मंडळाला जबाबदार धरले असून त्यात अध्यक्षांसह इतर कार्यकारी समितीच्या सात सदस्यांवर ठपका ठेवला आहे. दरम्यान,याप्रकरणी प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार या गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय सहकार निबंधक एस.डी.इंदोरिया यांच्या नजरेस हा प्रकार आणून दिला होता व त्यांनी तात्काळ बॅंकेला जून २००६ मध्ये पत्र पाठवून या योजनेबाबतची माहिती बॅंकेकडे मागवली होती. श्री.वायंगणकर यांनी आता पुन्हा एकदा ही तक्रार केंद्रीय सहकार निबंधकांना पाठवणार असल्याचे सांगून भारतीय रिझर्व बॅंकेलाही हा प्रकार सादर केला जाईल, अशी माहिती दिली.
तक्रारीत तथ्य नाही ः मुळे
रिझर्व बॅंकेतर्फे वार्षिक व्यवहार तपासणी तथा निरीक्षणासाठी पथक राज्य सहकारी बॅंकेत येते. यावेळीही हे पथक आपल्या नियमित कार्यक्रमासाठीच आले असून एकरकमी कर्जफेड गैरव्यवहाराच्या चौकशीबाबतचे वृत्त खोटे असल्याचा दावा बॅंकेचे अध्यक्ष रामचंद्र मुळे यांनी केला. मुळात असा गैरव्यवहार झाल्याचा आरोपच त्यांनी फेटाळून लावला. एकरकमी कर्ज फेड योजनेचा लाभ "आरबीआयने' घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देण्यात आला आहे. अशाप्रकारे या व्यवहारात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप खोटा असून यामागे संचालक मंडळ तथा बॅंकेला बदनाम करण्याचा हेतू असल्याचेही ते म्हणाले.

गर्दीच्या महासागरात "संभवामि'चा शुभारंभ


फोंडा, दि.८ (प्रतिनिधी) - "संभवामि युगे युगे..' या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याची पताका जागतिक पातळीवर नेऊन फडकवा, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज संध्याकाळी फर्मागुडी येथे केले.
केरी फोंडा येथील श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाने निर्मित संभवामि युगे युगे या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याच्या शुभारंभी प्रयोगाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केल्यानंतर शिवशाहीर बोलत होते. यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, आमदार महादेव नाईक, आमदार दीपक ढवळीकर, मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवशाहीरांनी सर्वांत प्रथम श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य निर्माण केल्याबद्दल कलाकार, तंत्रज्ञ आणि विजयादुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
शिवशाहीर म्हणाले की, भगवद्गीता चिरंजीव असून त्यात विलक्षण तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. प्रत्येक मनुष्याने श्रीकृष्ण जीवन आणि भगवद्गीता यांचा अभ्यास करून त्या पासून प्रेरणा घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या अंगात कर्मयोग भिनवावा.
श्रीकृष्ण जीवनावर नाट्य उभे राहावे म्हणून आपण गेली दहा वर्षे प्रयत्नशीर होतो. मात्र, हे नाट्य साकार होऊ शकले नाही. विजयादुर्गा मंडळाने श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याची निर्मिती करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले आणि साकार केले. या महानाट्याचे संयोजन आणि प्रयोग उत्कृष्ट करा. त्याला जाणता राजा चे कलाकारांचे आणि इतरांचे सहकार्य गरज भासल्यास उपलब्ध केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सामाजिक आणि राजकीय पातळीवरील चारित्र्यवान व्यक्ती कशी असावी यासाठी श्रीकृष्ण जीवनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. श्रीकृष्णा सारख्या व्यक्ती निर्माण होण्याची नितांत गरज आहे, असे सांगून विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर म्हणाले की, श्रीकृष्ण जीवनावरील हे महानाट्य तयार करण्यासाठी कलाकार, तंत्रज्ञ आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे महानाट्य पाहून परत जात असताना ह्या स्फूर्ती घेऊन आदर्श विचाराचे आचरण करण्याचा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे.
श्रीकृष्ण जीवनावरील भव्य अशा महानाट्याच्या शुभारंभामुळे आजचा दिवस हा गोवा आणि भारत देशासाठी एैतिहासातील दिवस आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महानाट्य निर्मितीमागची भूमिका श्री. देसाई यांनी विशद केली. ह्या महानाट्याचे प्रयोग गोवा, भारतातील विविध भागात तसेच परदेशात सुध्दा सादर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे श्री. देसाई यांनी सांगितले. सूत्रधार आणि नटीच्या संवादाच्या माध्यमातून प्रा. भूषण भावे आणि संगीता अभ्यंकर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सूत्रसंचालन केले. या नाटकाचे लेखक नारायण देसाई, दिग्दर्शक दिलीप देसाई, संगीत दिग्दर्शक अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य, नेपथ्यकार दयानंद भगत प्रकाश योजनाकार सतीश गवस, वेषभूषाकार दिगंबर सिंगबाळ, रंगभूषाकार दास कवळेकर, राजू देसाई यांची ओळख नाट्य रसिकांना करून देण्यात आली. या महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.