Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 April, 2011

बंद...बंद...बंद

बस आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

• सरकारची पर्यायी व्यवस्था नाही
• ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल
• अनेक विद्यार्थ्यांची ससेहोलपट

पणजी, दि.१५ (प्रतिनिधी)
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकार चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ आज पुकारलेल्या बस बंद आंदोलनाला संपूर्ण गोव्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरी भागात काही बसेस चालू होत्या तर ग्रामीण भागातील बस सेवा बंद राहिल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अनेकांनी भाड्याच्या वाहनांनी घर गाठले मात्र विद्यार्थ्यांची बरीच ससेहोलपट झाली. संध्याकाळी मात्र बंद मागे घेण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. यावेळी प्रतिक्रिया देताना बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी बंद पूर्णपणे यशस्वी झाला मात्र काही फुटीर बसमालकांनी बसेस चालू ठेवल्याचे सांगितले. तर वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी बंद पूर्णपणे फसल्याचे सांगून गोव्यात सर्वत्र बसेस चालू होत्या व त्या चालू राहाव्यात यासाठी वाहतूक खात्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन केल्याचे सांगितले.

शहरी बसेस चालू, ग्रामीण बंद
बसेस बंद ठेवल्यास एस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू करण्याची व तात्पुरता परवाना घेतलेल्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा सरकारने दिल्याने शहरी भागातील काही बसेस चालू होत्या. यात तात्पुरता परवाना घेतलेल्या बसेसची संख्या जास्त होती. या बसेस चालू राहिल्याने पणजी, म्हापसा आदी शहरी बस स्थानकावर खाजगी व कदंब बसेस दिसत होत्या. मात्र एस्माचा परिणाम ग्रामीण भागातील बसेसवर दिसला नाही. ग्रामीण भागातील बहुतेक बसेस बंद होत्या. ज्या चालू होत्या त्या अर्ध्यावरून परतून गेल्या. वाळपईच्या बसेस साखळीपर्यत, कुंभारजुवेच्या माशेलपर्यंत येऊन पहिली फेरी मारून गेल्या. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांचे दिवसभर अतोनात हाल झाले.

पर्यायी व्यवस्थेबाबत सरकार अपयशी
खाजगी बसेस बंद राहिल्यास पर्यायी व्यवस्था सरकार करेल. तसेच परराज्यातून बसेस आणू, अशी घोषणा वाहतूक खात्याने केली होती. मात्र या बंदला पर्यायी व्यवस्था सरकारकडून झालीच नसल्याने राज्यातील अनेक बस स्थानकावर प्रवासी अडकून पडले. दरम्यान, साखळी येथून माशेल बाणस्तारी येथे जाण्यासाठी जवळजवळ दीड तास बस नसल्याने साखळी आरोग्य केंद्राजवळ उभे राहून कंटाळलेल्या प्रवाशांनी या मार्गावरून पणजीला परतणार्‍या एका शववाहिकेतून प्रवास करत बाणस्तारी, पणजी गाठली.तर काही लोकांनी या मार्गावरून जाणार्‍या रेती ट्रकांच्या आधारे आमोणा माशेल भागात जाणे पसंत केले.

ठोस आश्‍वासन नसूनही बंद मागे
गेले चार दिवस वाहतूक खात्याच्या जुन्ता हाउस येथील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांवर सरकारने गंभीरपणे विचार करावा म्हणून बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर उपोषणाला बसले होते. त्यांना सदस्यांनी साखळी उपोषण करून साथ दिली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज बस बंद आंदोलन पुकारण्यात आहे. त्यामुळे जागे झालेल्या वाहतूक खात्याने बसमालकांना आज दुपारी चर्चेला बोलावले व चर्चा केली. या चर्चेत वाहतूक संचालक अरुण देसाई, उपसंचालक प्रल्हाद देसाई, पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, बस संघटनेचे सल्लागार ऍड. सुभाष सावंत, अध्यक्ष विशाल देसाई, श्री. ताम्हणकर, उत्तर गोवा प्रमुख सुदेश कलंगुटकर आदींनी भाग घेतला. या वेळी बस मालकांच्या सर्व पंधराही मागण्यावर चर्चा करण्यात आली. यातील प्रवासी कर, बसेसवर जाहिराती आदी काही मागण्यांवर वाहतूक संचालकांनी विचार करण्याचे आश्‍वासन दिले. तर बस स्थानकावर जागा, ‘आरटीए’त संघटनेच्या सदस्यांची नेमणूक आदी काही मागण्या फेटाळून लावल्या. बसमालकांनी ‘सोसायटी’ करून मागण्या पुढे केल्यास त्या लवकर मान्य होतील अशी सूचना श्री. देसाई यांनी केली असता सोसायटी स्थापन करण्यात अडचण ठरणार्‍या गोष्टींची जाणीव श्री. ताम्हणकर यांनी संचालकांना करून दिली. या वेळी श्री. देसाई यांनी आपण बसमालकांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आश्‍वासन दिले.
या प्रसंगी मेरशी मार्गावरील तसेच फोंडा मार्गावरील काही मोजक्याच बसेसना वाहतूक खाते सांभाळून घेत संघटनेच्या सदस्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप बसमालकांनी केला. यावेळी वातावरण बरेच तापले. मात्र श्री. देसाई यांनी काही बाबतीत तसे घडल्याचे कबूल केले. मात्र संघटनेच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून चर्चा संपवली. या चर्चेनंतर बाहेर येऊन श्री. ताम्हणकर यांनी उपोषण मागे घेतल्याचे व उद्यापासून बसेस चालू होणार असल्याची घोषणा केली. या प्रसंगी सुमारे २०० च्या आसपास बसमालक उपस्थित होते.

कुंकळ्ळीत दोघांना अटक
मडगाव, (प्रतिनिधी)
खासगी बसमालकांनी पुकारलेल्या बस बंद आंदोलनाच्या दिवशी बसवाहतूक चालू ठेवलेल्या बसेस अडविल्याबद्दल कुंकळ्ळी पोलिसांनी आज भिवसा-कुंकळ्ळी येथे दोघांना अटक केली. त्यांची नावे नीलेश बाबुसो देसाई व हलेश पुरसो देसाई अशी आहेत. त्यांनी मडगावहून काब द राम येथेे निघालेली बस भिवसा येथे अडविली होती. त्यांच्याविरुद्ध भा.दं.स. कलम ३१ खाली गुन्हा नोंदविलेला आहे.

पेपर लांबणीवर
बस बंदमुळे पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा दि. १५ एप्रिलचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. हा पेपर कधी घेतला जाईल याची माहिती येत्या काही दिवसांत संबंधित सर्व महाविद्यालयांना कळवली जाईल अशी माहिती आज गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. व्ही. पी. कामत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच, उद्या दि. १६ पासून असलेले सर्व पेपर ठरलेल्या दिवशी घेतले जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बस मालकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर झालेल्या परिणामाचा एनएसयुआचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी निषेध केला.

सुनावणीच्या अर्जावरून बाबूश यांना नोटीस?

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी गोव्यात न घेता महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायालयात घेण्यासाठी केलेल्या अर्जावरून शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना नोटीस बजावल्याची जोरदार चर्चा आज सुरू होती. मात्र, याविषयीची माहिती मिळवण्यासाठी ‘सीबीआय’शी संपर्क साधला त्याला अधिकृतपणे दुजोरा मिळू शकला नाही. गेल्या आठवड्यात ‘सीबीआय’ने पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी मुंबई घेतली जावी, अशी विनंती करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित तथा राज्याचे शिक्षणमंत्री असलेले बाबूश मोन्सेरात हे वजनदार व्यक्ती असल्याने ते साक्षीदारावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी गोव्यात न घेता मुंबईत घेतली जावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाकडे केली आहे.

आरियालवासीयांच्या संतापाचा उद्रेक

पंचायत मंडळालाच सभागृहात कोंडले
मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी)
सां जुझे आरियालमधील ‘त्या’ वादग्रस्त मेगा प्रकल्पप्रकरणी तेथील रहिवाशांच्या सहनशक्तीचा आज अंत झाला. त्यांनी साळावलीच्या ओलितक्षेत्रात उभ्या राहिलेल्या त्या प्रकल्पाला दिलेला परवाना विनाविलंब मागे घ्यावा, अशी मागणी करून पंचायत बैठकीसाठी जमलेल्या संपूर्ण पंचायत मंडळालाच पंचायत घरात कोंडले. रात्री उशिरापर्यंत ही स्थिती तशीच होती.
गेल्या काही महिन्यांपासून या गृहप्रकल्पाविरुद्ध आरियालमध्ये असंतोष खदखदत आहे. कायद्यानुसार ओलितक्षेत्रात घरांच्या बांधकामांना परवाना देता येत नाही; पण आरियालमध्ये मेगा प्रकल्पाला परवाना देण्यात आला. त्यात पंचायतीपासून सर्व सरकारी खाती त्यात सामील झाल्याचा आरोप गावकरी करत आहेत. याच मुद्याला अनुसरून आधीच्या दोन तीन ग्रामसभा तंग वातावरणात तहकूब झाल्या आहेत.
आपला या प्रकल्पाच्या परवान्याशी संबंध नाही. आधीच्या मंडळाने तो दिला होता आणि तोही नगर नियोजन खात्याच्या शिफारशीवरून अशी भूमिका सध्याच्या पंचायत मंडळाने घेतली आहे. त्यामुळेे विचित्र कोंडी झालेली आहे. गावकर्‍यांनी त्यानंतर साळावली ओलितक्षेत्र प्राधिकरण, नगरनियोजन खाते याकडे संपर्क साधून परवाना मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आपला सगळा रोख पंचायतीपुरता मर्यादित ठेवला.
आज पंचायत मंडळाच्या बैठकीची संधी साधून नागरिक जमले. त्यांनी पंचायत घराजवळ येऊन सदर मेगा प्रकल्पाचा परवाना मागे घेण्याची मागणी केली. प्रभारी सरपंच व्हिन्सी मास्कारेन्हस त्यांना ठोस आश्वासन देऊ न शकल्याने पंचायत मंडळालाच कोंडून परवाना मागे घेईपर्यंत बाहेर सोडणार नाही, असा इशारा दिला. दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ माजली. मायणा कुडतरीचा पोलिस फौजफाटा तेथे धावून गेला; पण सरपंचांनी त्यांना कोणतीच कृती करू नये असे सांगितल्याने ते गप्प राहिले. रात्री उशिरापर्यंत तशीच स्थिती होती.

अखेर गवाणे खाण बंद

• खाण संचालकांना स्थानिकांचा घेराव
• कोणतेही परवाने नसल्याचे सिद्ध


पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
गवाणे सत्तरी येथील चौगुले खाणीला राज्य प्रदूषण मंडळाचे कोणतेही परवाने नसल्याचे आज जनसेवा प्रतिष्ठानने खाण संचालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच, चौगुले खाण व्यवस्थापनाकडे राज्य नियंत्रण मंडळाचे परवाने असल्यास ते सादर करावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
आज सायंकाळी डॉ. क्लॉड आल्वारीस आणि डॉ. दत्ताराम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खाण संचालक अरविंद लोलयेकर यांना घेराव घालण्यात आला. यावेळी येथील स्थानिकांनी संचालक लोलयेकर यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. बेकायदा खाणीला खाण संचालनालय संरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी संचालकांवर करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून सदर खाण बेकायदा खनिज उत्खनन करीत आहे. त्यांनी परवान्यासाठी अर्ज केला असला तरी त्यांच्याकडे अद्याप कोणतेही परवाने नाहीत. ५४ हजार चौरस मीटर सरकारी जमीनही त्यांनी बळकावली असून तेथेही खनिज उत्खनन केले जात असल्याचा दावा यावेळी डॉ. आल्वारीस यांनी केला. त्यामुळे या खाणीवर त्वरित बंदी घातली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, जोवर खाण बंदचा आदेश काढला जात नाही तोवर येथून हालणार नाही, अशी भूमिका खाणविरोधी कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर अखेर ही बेकायदा खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आले.
तीन वर्षांपासून ही खाण सुरू आहे तर, अजून काही दिवस तुम्ही कळ सोसा, असा सल्ला यावेळी खाण संचालकांनी या लोकांना दिला. तसेच, ती खाण बेकायदा असल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसून त्याबद्दल आपल्याला अभ्यास करावा लागेल, असा युक्तिवाद श्री. लोलयेकर यांनी करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना बरेच फैलावर घेतले. तीन वषार्ंपासून बेकायदा सुरू असलेल्या खाणीबाबत तुम्ही अजूनही कसला अभ्यास करता, असा प्रश्‍न यावेळी डॉ. देसाई यांनी केला.
या खाणीला स्थानिक आमदारांचे संरक्षण मिळते. त्यामुळे पोलिस स्थानकात तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी विश्‍वेश परब यांनी केला. दरम्यान, खाण संचालनालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञान साहाय्यक अधिकारी डॉ. फर्नांडिस यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना मोबाईलवर संपर्क साधला असता या खाणीकडे परवाने नसल्याचे उघड झाले.
दरम्यान, गवाणे खाण बंद करण्याचे आदेश काढण्यात आल्याचे वृत्त पसरताच गवाणेवासीयांनी विजय मिरवणूक काढली. यात वाळपईवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खारीवाड्यात मासेमारी ठप्प

• जलवाहतूक रोखली
• आज वास्को बंदचे आवाहन

वास्को, दि. १५ (प्रतिनिधी)
पंधरा दिवसांपूर्वी खारीवाडा येथील ६६ घरे बुलडोझरच्या साहाय्याने पाडल्यानंतर उर्वरित घरे वाचवण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीने काल (दि.१४) मध्यरात्री सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनाला मच्छीमारांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर येथील सुमारे ३०० मासेमारी ट्रॉलर्स व २५० मासेमारी नौका येथील समुद्रात नांगरून मुरगाव बंदराचा (एम.पी.टी) पाण्यातील पूर्ण व्यवसाय पूर्ण ठप्प केला. जोपर्यंत सरकार आमच्या पाच मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून उद्या (दि.१६) वास्को बंदचे आवाहन खारीवाडावासीयांनी केले आहे.
‘एम.पी.टी’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर बंदराच्या विस्तारीकरणासाठी व अन्य कारणांसाठी खारीवाडा येथील जागा रिकामी करून देण्याबाबत याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने पालिकेला याबाबत आदेश जारी केले होते. यानंतरच्या सुनावणीत ज्या घरांनी स्थगिती मिळवलेली नाही त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई का केली नाही असा सवाल करत पालिकेला येथील ६६ घरे पाडण्याचे आदेश दिले होते. सदर ६६ घरे पाडल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला. यातूनच ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीने गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सदर मुद्यावर तोडगा काढण्याची विनंती काही दिवसांपूर्वी केली असता त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली, मात्र दहा दिवसांहून अधिक वेळ उलटूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे समितीने आजपासून हे आंदोलन छेडले आहे.
या बंदमुळे आज ‘एम.पी.टी’चा पाण्यातील सर्व व्यवसाय ठप्प झाला असून त्यामुळे सुमारे तीन ते चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची हानी झाल्याचाअंदाज आहे. तसेच ‘एम.पी.टी’ ची पाण्यातील वाट बंद केल्याने गोव्यातील बार्ज मालकांना सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी दिली. खारीवाडा प्रश्‍नांवर आम्ही सरकारशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान सदर आंदोलनामुळे वास्कोतील मासळी मार्केट तसेच फळबाजारही आज बंद ठेवण्यात आला. खारीवाडा येथील शेकडो महिलांनी पालिकेच्या बाहेर धरणे धरले होते. आज सकाळी ६ वा. आंदोलन करणार्‍यांनी ‘एम.पी.टी’ च्या गेट क्रमांक ९ बाहेर आपले टेंपो तसेच इतर वाहने उभी करून येथील वाहतूकही ठप्प केली, मात्र १० च्या सुमारास वाहतूक पोलिसांनी सदर मार्ग मोकळा करून दिला. आंदोलनाच्या दरम्यान एम.पी.टी तसेच आंदोलकांत समुद्रात दगडफेक झाल्याची माहिती उघड झालेली असून यात नुकसान झालेले नाही असे सूत्रांनी सांगितले. अनुचित घटना उद्भवू नये म्हणून खारीवाडा मासेमारी जेटीवर कडक पोलिस सुरक्षा तसेच एम.पी.टी च्या धक्क्यावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’ समितीचे फादर बिर्स्माक डायस यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे आंदोलन मागे घेण्णार नसल्याचे स्पष्ट केले. गोव्यातील सर्व मासेमारी गावे पारंपरिक मासेमारी गावे म्हणून जाहीर करा,एमपीटीचे कार्य सध्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित ठेवा, तात्पुरती स्थगिती मिळालेल्या घरांना कायम करा, गोव्याच्या किनारपट्टीवर असलेली मच्छीमारांची घरे वैध करा, जमीनदोस्त केलेली ६६ घरे बांधून द्या व येथे ठेवण्यात आलेले सर्व राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाचे जवान हटवा अशा ह्या पाच मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतसरकार कोणतीच मदत करत नसल्याने सदर आंदोलन छेडण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान आज संध्याकाळी समितीच्या सदस्यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांच्याशी सदर पाच मागण्या ठेवल्या असता मुख्यमंत्री गोव्यात नसून ते आल्यानंतर सदर मागण्या त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार असे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज पासून बोलावण्यात आलेले आंदोलन येणार्‍या काही दिवसात आणखीन आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळालेले असूनउद्या सदर आंदोलनात भाजी मार्केटातील व्यावसायिक तसेच इतर काही जण भाग घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, आज संध्याकाळी मुरगाव उपजिल्हाधिकार्‍यांनी वास्को पोलिसांसोबत खारीवाडा इफेक्टेड पीपल्सची बैठक बोलावली होती. यावेळी हे आंदोलन मागे घ्या असे पोलिसांनी समितीला सांगितले मात्र मुख्यमंत्रीच याबाबत काहीसांगत नसल्याने हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे समितीने सांगितले.
‘एम.पी.टी’कडून अनेक वेळा येथील जनतेला सतावण्यात आलेले असून येत्या काळात त्यांच्या अनेक कृत्यांबद्दल जनता रस्त्यावर येणार आहे. ‘एम.पी.टी’ आपल्या कायदेशीर कामकाजाचा ढोल वाजवत असते, मात्र त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या बेकायदा कृत्यांची कोण दखल घेणार असा प्रश्‍न मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी केला. खारीवाडाप्रकरणी सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन येथील जनतेच्या हिताचा विचार करणे एकदम गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार श्री. नाईक यांनी व्यक्त केली.

नार्वेकर जन्मतारीख फेरफारीची तक्रार सीबीआयकडे द्या

• शेखर साळकर यांची मागणी

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
माजी मंत्री तथा आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आपल्या मुलाच्या जन्मतारखेत फेरफार करून फसवणूक केल्याच्या तक्रारीवर तपास करण्यास म्हापसा पोलिसांना अपयश आल्याने सदर तक्रार येत्या ४८ तासात गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवावी, अशी मागणी आज (दि.१५) तक्रारदार डॉ. शेखर साळकर यांनी केली. या मुदतीत मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि गृहमंत्री रवी नाईक यांनी हे प्रकरण ‘सीआयडी’कडे न सोपवल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही डॉ. साळकर यांनी आज दिला. ते पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ऍड. नार्वेकर यांच्यावर त्यांनी आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ऍड. नार्वेकर यांचा मुलगा गणेशराज याची जन्म तारीख २८ फेब्रुवारी १९९२ अशी आहे. के. जीमध्येही त्याच्या दाखल्यावर ही जन्मतारीख आहे, असा दावा यावेळी डॉ. साळकर यांनी केला. परंतु, या प्रकरणाची चौकशी करणारे म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेशकुमार हे ‘तो दाखला ऍड. नार्वेकर यांच्या पत्नीनेच शाळेत दिल्याचा काय पुरावा आहे’ असा प्रश्‍न केल्याची माहिती डॉ. साळकर यांनी दिली. हा दाखला त्यांच्या पत्नीने शाळेत दिला नसल्यास त्या तारखेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी बदल केला आहे का, असा सवाल करत तसे असल्यास पोलिसांनी त्या मुख्याध्यापकाची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. साळकर यांनी केली.
आपण ऍड. नार्वेकर यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्याने आपल्याला तसेच डिचोली क्रिकेट क्लबला लक्ष केले जात असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. त्यामुळे आपण गेल्या २८ ऑक्टोबर रोजी या क्लबच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, येत्या सोमवारी ऍड. नार्वेकर यांनी विशेष कार्यकारिणी बैठक बोलावली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर कारवाई करूनच दाखवावी, असे जाहीर आवाहन डॉ. साळकर यांनी दिले आहे. आपण आजीवन गोवा क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असून त्यावरून आपल्याला कोणीच हटवू शकत नाही. गेल्या दहा वर्षात ‘बीसीसीआय’कडून गोवा क्रिकेट असोसिएशनला सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी आला आहे. ते शंभर कोटी रुपये ऍड. नार्वेकर यांनी कुठे खर्च केले, याची माहिती त्यांनी उघड करावी. ‘जीसीए’ची वाहने ते आपल्या कुटुंबीयांसाठी वापरत आहेत. प्रत्येक क्लबला लागणारी बॅट आणि बॉल हे त्यांच्या पत्नीकडूनच घ्यावे लागतात. तसेच, नार्वेकर यांचा पर्वरी येथे एक फ्लॅट असून त्याचा ‘जीसीए’साठी गेस्ट हाउस म्हणून वापर करून त्याचेही पैसे कमावले जात असल्याचा आरोप यावेळी डॉ. साळकर यांनी केला. त्याचप्रमाणे एक बस असून ती निवडणुकीच्या काळात शिर्डीला जाण्यासाठी वापरली जाते, असेही ते शेवटी म्हणाले.

Friday 15 April, 2011

फातोर्डा भंगारअड्ड्यावर स्फोटात १ कामगार ठार

दोघे जखमी - टँकर कापताना घडलेली दुर्घटना
मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी)
चंद्रावाडो - आर्ले येथे भरवस्तीत असलेल्या एका भंगारअड्ड्यावर भंगारातील एक पेट्रोल टँकर कापताना त्याच्या एका कंपार्टमेंटचा भयावह स्फोट होऊन १ जण ठार झाला, तर तेथील दोघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला बांबोळीच्या ‘गोमेकॉ’ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भंगारअड्डा मालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा ठपका ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. त्यामुळे सार्‍या परिसरात घबराट माजली. लोक सैरावैरा पळत सुटले. सदर भंगारअड्डा अमन उल्ला याच्या मालकीचा आहे. तेथे भंगारासाठी आणलेल्या एक टँकरचे पत्रे गॅसकटरने कापून काढत असताना अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, तेथे काम करणारा गिलू पवार (३५, सांगली - महाराष्ट्र) नामक कामगार टँकरवरून सुमारे ५० मीटर दूर उडाला आणि जागीच ठार झाला. विमलेश (५०) व राकेश कुमार (२३) हे उत्तरप्रदेशातील दोघे कामगार गंभीर जखमी झाले. त्यात विमलेश जास्त होरपळल्याने त्याला बांबोळीच्या ‘गोमेकॉ’त उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राकेश कुमारवर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत.
हा भंगारअड्डा भरवस्तीत आहे. त्यामुळे स्फोटानंतर तेथे घबराट माजली. स्फोटानंतर ते तिघेही होरपळलेल्या व रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडले होते. मडगाव पोलिसांना व अग्निशामक दलाला याची माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना हॉस्पिसियोत दाखल केले व नंतर स्फोटाचा पंचनामा केला.
आमदार दामू नाईक, पालिका मुख्याधिकारी प्रसन्न आचार्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी या स्फोटाची पुढील चौकशी सुरू केली आहे.
भरवस्तीत असलेल्या भंगारअड्ड्यांत आता अशा प्रकारचे टँकर कापण्याची कामे चालतात. त्याकडे संबंधित अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. त्यातूनच असे भयंकर अपघात घडतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आज टँकर कापताना जो स्फोट झाला त्या टँकरच्या तिन्ही कंपार्टमेंटना छिद्रे पाडून त्यातील वायूला वाट मोकळी करून देण्यात आली होती. तथापि, त्याचा चोरकप्पा तसाच राहून गेला व नेमका तोच स्फोटाचे कारण ठरला. सदर टँकर मळीची वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता; पण परत गोव्याबाहेर जाताना दारू नेल्याच्या कारणावरून पकडला गेला होता व मोले नाक्यावर तसाच पडून राहिल्यावर त्याचा लिलाव पुकारला गेला. या भंगारवाल्याने तो घेतला व आणून तसाच वर्षभर राहिल्यावर तो कापण्याचे काम हाती घेतले असता सदर स्फोट झाला. त्यानंतर धातू कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाला अशी अफवा सर्वत्र पसरली; पण नंतर तो स्फोट गॅसचा नव्हे तर टाकीचा असल्याचे दिसून आले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

मयेतील आठवणी
ताज्या करणारी घटना
केळबायवाडा - मये येथे ८ एप्रिल रोजी वेल्डिंग करताना अशाच प्रकारे एका जीपवरील केरोसीन टाकीचा स्फोट होऊन कुंदन मोहन मयेकर हा (वय ३२) वेल्डर ठार झाला होता. तसेच वाहनचालक दादासाहेब राणे जखमी झाला होता हे वाचकांना आठवत असेलच. फातोर्डा स्फोट दुर्घटनेमुळे मयेतील अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.

.. तर सरकार पाडू!

कॉंग्रेसमधील दबावगट पुन्हा सक्रीय

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
विदेशी चलन तस्करी प्रकरणाची गंभीर दखल कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतल्याने आपले मंत्रिपद वाचवण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी जोरदार ‘लॉबींग’ चालवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. चर्चिल आलेमाव व इतर काही आमदारांना सोबत घेऊन बाबूश यांनी आपल्या विरोधातील कारवाई टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले असून बाबूशच्या मंत्रिपदाला हात लावाल तर सरकार पाडू, अशी गर्भित धमकीच या गटाने मुख्यमंत्री दिगंबर यांच्यापर्यंत पद्धतशीरपणे पोचवल्याची खबर आहे.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याविरुद्ध ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई कस्टम्सने तक्रार नोंदवल्याने दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्यात भाजपने या विषयावरून रान उठवले आहे. या विषयी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी जगमीतसिंग ब्रार हे आज गोव्यात दाखल होणार होते; पण त्यांची भेट लांबणीवर पडल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. दरम्यान, बाबूश यांचे मंत्रिपद काढून घेण्यात येऊ नये यासाठी कॉंग्रेसच्या काही मंत्री व आमदारांनी एक गट स्थापन करून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर दबाव टाकण्याचे सत्र आरंभले आहे. बाबूश यांच्या मंत्रिपदाला हात लावल्यास सरकार गडगडेल, असाच संदेश त्यांनी श्रेष्ठींपर्यंत पोचवून बाबूश यांना पाठीशी घालण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आज त्यासंबंधी पणजीत एका बड्या हॉटेलात या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचीही माहिती मिळाली आहे.

जुझेंचा पाय खोलात!

मुरगाव पालिकेकडूनही पोलिस तक्रार

वास्को, दि. १४ (प्रतिनिधी)
महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी मुरगाव नगरपालिकेची जागा बेकायदा पद्धतीने आपल्या तसेच आपल्या तीन भावांच्या नावे केल्याचे प्रकरण आता अधिकच रंगू लागले असून आज या प्रकरणी मुरगावच्या नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांनी जुझेंविरोधात वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली आहे.
काल संध्याकाळी मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत डिसोझा यांच्यावर सदर घोटाळा प्रकरणाबाबत तक्रार नोंद करण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला होता. त्यानुसार, आज त्यांच्यासह त्यांच्यासह त्यांचे बंधू पास्कॉल, क्लेमेन्त व जुझे निक्लाव यांच्याविरुद्ध तक्रार नोंद करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी वास्कोचे आमदार तथा राज्याचे महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी खारीवाडा येथील मुरगााव पालिकेची १०२ चौरस मीटर जागा आपल्या तसेच इतर तीन बंधूंच्या नावावर केल्याचे प्रकरण उघडकीस येताच हा विषय चर्चेचा ठरला होता. काल पालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती व जुझेंविरुद्ध पोलिस तक्रार तसेच त्यांचे बंधू नगरसेवक पास्कॉल व पत्नी नॅनी यांना अपात्र करण्याचा ठराव बहुमताने संमत केला होता. आज या ठरावाची अंशतः अंमलबजावणी करण्यात आली.
जुझेंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत महसूल खात्यातर्फे घोटाळा करण्यात आल्याचे नमूद करून डिसोझा यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. लेखी तक्रारीसोबत कालच्या ठरावाची प्रतही जोडण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी संपूर्ण चौकशी करूनच पुढील पावले उचलण्यात येतील, असे वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन निगळे यांनी सांगितले.

मलेरिया सर्वेक्षकप्रश्‍नी सोमवारी निर्णय

मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन, तरीही उपोषण सुरूच

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
सेवेत कायम करावे म्हणून गेल्या ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांना अखेर आज शुक्रवारी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर पाचारण केले व त्यांना सेवेत कायम करण्याबाबत सोमवारी बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनांचा पूर्वानुभव असलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांनी जोपर्यंत या संदर्भात लेखी आदेश हातात मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, हा पवित्रा कायम ठेवला आहे.
आरोग्य खात्यात गेली १२ ते १५ वर्षे मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणारे ५९ कर्मचारी आरोग्य संचालनालयासमोर ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकारने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. आज आठव्या दिवशी मात्र मुख्यमंत्र्यांना या कर्मचार्‍यांना आपल्या बंगल्यावर चर्चेसाठी पाचारण केले व त्यांच्या मागणीविषयी सोमवारी निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या कर्मचार्‍यांची दखल का घेतली नाही असे पत्रकारांनी विचारता, सदर कर्मचारी उपोषणाला का बसलेत हेच आपल्याला ठाऊक नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यापूर्वीच्या आश्‍वासनाची आठवण करून देताच, सोपस्कार पूर्ण होण्यास अवधी लागतोच, अशी सबब त्यांनी सांगितली.
उपोषण सुरूच राहणार
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ऍड. सुभाष सावंत, सुदेश कळंगुटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सोमवारी या प्रकरणी निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिलेले असले तरी लेखी आदेश मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असे मलेरिया कर्मचारी संघटनेच प्रमुख प्रेमदास गावकर यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांची धमकी?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर चाललेल्या कुजबुजीनुसार, मुख्यमंत्री आज या कर्मचार्‍यांची आरोग्य संचालनालयाजवळ भेट घेणार होते. मात्र, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी तसे केल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी धमकी दिली. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांनी या कर्मचार्‍यांची आपल्या बंगल्यावर भेट घेण्याचा निर्णय घेतला.

आज बसेस ‘बंद!’

सरकार - बसमालक संघर्ष तीव्र

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
राज्यातील खाजगी बसमालकांच्या मागण्या पूर्ण करण्यास वाहतूक खाते तथा सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या बसमालकांनी उद्या दि. १५ रोजी बसेस बंद ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारने ‘एस्मा’ लागू केलेला असला तरी तो झुगारण्याचा निर्णय बसमालकांनी केल्याने लोकांचे अतोनात हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बसमालकांच्या मागण्यांबाबत आपणास कोणतीही कल्पना नसून या बाबतीत वाहतूकमंत्री व वाहतूक संचालक निर्णय घेतील, अशी ताठर भूमिका मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतल्याने सरकार आणि बसमालक यांच्यातील संघर्ष आज आणखीनच धारदार झाला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा खाजगी बसमालकांनी तीव्र निषेध नोंदवला असून त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोपही केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर झाले होते, असे सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानेच उद्या पुकारलेला ‘बंद’ होणारच, असे ते म्हणाले. आज तिसर्‍या दिवशी ताम्हणकर व इतर बसमालकांचे उपोषण सुरूच राहिले.
हिंसक वळणाची शक्यता
दरम्यान, खाजगी बसमालक संघटनेने पुकारलेल्या या ‘बंद’ला सर्वच बसमालकांनी पाठिंबा दिलेला नाही. मेरशी व इतर भागांतील काही बसमालकांनी या ‘बंद’ला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या मालकांतच संघर्ष उत्पन्न झाला असून त्याची परिणती आज सुदीप ताम्हणकर यांच्या बसच्या इंजिनमध्ये साखर घालण्यात झाली. या प्रकारामुळे उद्याच्या बंदला हिंसक वळण लागण्याची शक्यता असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

बसमालकांच्या मागण्या अनाठायी - अरुण देसाई

खाजगी बसमालकांच्या जादातर मागण्या या अनाठायी असल्याची प्रतिक्रिया उद्याच्या ‘बंद’संदर्भात बोलताना वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी व्यक्त केली. बसमालकांच्या १५ मागण्यांसंदर्भात त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या ५० टक्के सवलतीबाबत तोडगा काढणे शक्य नाही. जर काहीजण बनावट ओळखपत्रे वापरत असतील तर ती वाहकांनी तपासावीत. खाजगी बसमालकांची कदंबकडून सतावणूक होते हे अर्धसत्य आहे. प्रत्येक बसस्थानकावर बस संघटनेला कार्यालयासाठी जागा देणे शक्यच नाही. जर राष्ट्रीयीकरण केलेल्या मार्गांवर खाजगी बसेसना परवाने दिले तर राष्ट्रीयीकरणाचे प्रयोजनच काय, असा सवाल त्यांनी केला.
खाजगी बसेसवर जाहिरातींना परवानगी देण्याबाबतच्या मागणीवर विचार सुरू आहे, असे सांगतानाच अध्यक्षालाच बस अर्थसाहाय्य समितीवर का घ्यावे याचे स्पष्टीकरण संघटनेने द्यावे असे ते म्हणाले.
वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आहेच; मात्र खाजगी बसमालकांनी नियम पाळावेत, दूरच्या मार्गावरील बसेसना पणजी, वास्को व मडगाव या शहरांत जाण्यास परवानगी द्यावी किंवा नाही हा निर्णय वाहतूक खात्याच्या नव्हे तर जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षेत येतो, रस्ता वाहतूक प्राधिकरणावर संघटनेच्या सदस्याला जागा द्यावी ही मागणी पूर्ण झालेली असून फोंड्याचे व्यंकटेश नाईक हे या समितीवर आहेत, सध्या तरी कुठलेही नवे बसस्थानक बांधण्यात येत नसल्याने नव्या बसस्थानक समितीवर संघटनेला स्थान द्यावे ही मागणी अप्रस्तुत आहे, असे ते पुढे म्हणाले. बसमालकांना तिकीट यंत्र घेण्यासाठी अर्थसाहाय्य दिल्यानंतरही ते तिकिटे देणार याची शाश्‍वती काय, असा सवाल त्यांनी केला.
जुन्या बसेसना अर्थसाहाय्य मिळावे या मागणीबाबत योजना सुरू असून पंधरा वर्षे झालेल्या बसेसना ती लागू आहे. बसेसचा दर भरमसाठ वाढला असता तरच बस खरेदीच्या अर्थसाहाय्यात २ लाखावरून ३.५० एवढी वाढ करावी ही मागणी रास्त ठरली असती, विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सवलतीमुळे होणारे नुकसान समाजकल्याण खात्यातर्फे भरून द्यावे या मागणीला कोणताही कायदेशीर आधार नाही, असा खुलासा करतानाच प्रवासी कर लवकर न घेता नंतर घ्यावा या मागणीबाबत विचार विनिमय होऊ शकतो, असे ते म्हणाले.
बसमालकांनी केलेल्या मागण्यांचे स्वरूप असे असून यांपैकी अतिमहत्त्वाची कोणती व ज्यामुळे गोव्यातील सर्व बसेस बंद ठेवाव्या लागाव्यात अशी मागणी कोणती, हे लोकांनीच ठरवावे असेही ते शेवटी म्हणाले.

तुये भगवती देवस्थानचा आजपासून रौप्यमहोत्सव

पेडणे, दि. १४ (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील तुये गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती पंचायतन देवस्थानचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन १५ ते १७ एप्रिलपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या १५ रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री ८ वा. भजनाचा कार्यक्रम होईल. १६ रोजी सकाळी गणपती पूजा, कुंभाभिषेक होम, महापूजा व रात्री ९ वा. ओंकार स्पोर्टस् ऍण्ड कल्चरल संघातर्फे भरतनाट्यमचा कार्यक्रम होईल. १७ रोजी सकाळी गणपती पूजा, कलश स्थापना, नवचंडी होम, कुंकुमार्चन, महाप्रसाद व रात्री हौशी नाट्यमंडळ, गावकरवाडातर्फे ‘गगनात घुमली शिवगाथा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
श्री देवी भगवतीच्या सर्व महाजन, भक्तगणांनी या उत्सवाला उपस्थिती लावून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी केले आहे.

डिचोलीत खनिज वाहतूक रोखली!

अपघात थोडक्यात टळला - आज उपजिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक
डिचोली, दि. १४ (प्रतिनिधी)
डिचोली हमरस्त्यावरून भरवेगाने खनिज मालाची वाहतूक करणार्‍या एका ट्रकाखाली सापडता सापडता तिथे उभा असलेला पादचारी थोडक्यात वाचला. मात्र या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील खनिजवाहू ट्रकच रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला. सातत्याने होणार्‍या या खनिज वाहतुकीमुळे येथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे जमलेल्या नागरिकांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी भरधाव वेगाने येणार्‍या खनिजवाहू ट्रकाखाली एक इसम येणार होता, अशी माहिती समीर वायंगणकर यांनी दिली. त्यामुळेच संतापलेले लोक एकत्र आले व त्यांनी सर्व ट्रकच रोखून धरले. दरम्यान, तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी यात हस्तक्षेप करत ट्रकचालकांचीच बाजू घेतल्याचे व जमलेल्या लोकांना पांगवल्याचे ऍड. अजितसिंह राणे यांनी सांगितले. डिचोलीतून खनिज वाहतुकीचा विषय सध्या न्यायालयप्रविष्ट असतानाही ही वाहतूक सरकारच्या व पोलिसांच्या पाठबळावर निर्धोकपणे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वी, आम्ही चार वेळा ही धोकादायक वाहतूक रोखली. आमच्यावर न्यायालयात खटलेही सुरू आहेत. मात्र, जनतेच्या जिवाशीच खेळ चालला असल्याने आता गप्प राहणे शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया गोकुळदास हरवळकर यांनी व्यक्त केली.
तर पुन्हा आंदोलन ः पाटणेकर
दरम्यान, यावेळी घटनास्थळी दाखल झालेले आमदार राजेश पाटणेकर यांनी सदर वाहतुकीवर नियंत्रण आणले गेले नाही तर पुन्हा जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी उपजिल्हाधिकार्‍यांशी फोनवरून संपर्क साधला असता, सदर वाहतूक पूर्णपणे बेकायदा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा म्हणून उद्या दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला आमदार राजेश पाटणेकर, ऍड. राणे व अन्य नागरिक उपस्थित राहणार आहेत.

मच्छी व्यावसायिकांचा आजपासून वास्को ‘बंद’

वास्को, दि. १४(प्रतिनिधी)ःखारीवाडा येथील ६६ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आल्यानंतर आता येथील अन्य घरांवर तरी कारवाई होऊ नये यासाठी गुरुवार मध्यरात्रीपासून येथे ‘बंद’ पुकारण्यात आला आहे. आज रात्री १२ वाजल्यानंतर येथे असलेले सर्व मच्छीमार ट्रॉलर, नौका तसेच मासळी मार्केट ‘बंद’ होणार असून या घरांवरील कारवाई जोपर्यंत टाळली जात नाही तोपर्यंत हा ‘बंद’ पाळण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स’ समितीच्या झेंड्याखाली हा ‘बंद पुकारण्यात आला असून मुरगाव तालुक्यातील सुमारे ३५० मच्छीमार ट्रॉलर, नौका तसेच येथील मासळी मार्केटातील व्यवसाय करणारे सर्वजण यात सहभागी होणार आहेत. ‘गोवा फिशिंग बोट ओनर्स’ संघटनेचे अध्यक्ष सायमन परेरा यांनी सांगितले की, या ‘बंद’मध्ये मुरगावातील फक्त मच्छी व्यवसायात असलेले लोकच सहभागी होणार आहेत. सर्व ट्रॉलर व नौकांवर ‘बंद’च्या दरम्यान काळे झेंडे फडकवण्यात येणार अशी माहितीही मिळाली आहे.

Thursday 14 April, 2011

मद्य घोटाळ्याचे सूत्रधार अबकारी अधिकारीच

• चौकशी अहवालाचा निष्कर्ष
• माजी अबकारी आयुक्तांना ‘क्लीनचीट’


पणजी, दि.१३ (प्रतिनिधी)
अबकारी खात्यातीलच काही अधिकारी मद्याच्या आयात-निर्यात प्रक्रियेत गौडबंगाल करून बेकायदा व्यवहारासाठी या खात्याचा वापर करीत आहेत,असा निष्कर्ष माजी वित्त सचिव राजीव यदुवंशी यांनी आपल्या चौकशी अहवालात काढला आहे. श्री. यदुवंशी यांच्याकडून माजी अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांना ‘क्लीनचीट’ दिली खरी पण या घोटाळ्याची सूत्रे अबकारी आयुक्त मुख्यालयातूनच हलविली जात होती, हे स्पष्ट करून त्यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या आरोपांनाही पुष्टी दिली आहे.
श्री. पर्रीकर यांनी अबकारी खात्यातील कथित घोटाळ्याचा पर्दाफाश १७ डिसेंबर २००९ रोजी केला होता. या घोटाळ्याची कागदपत्रेच उघड करून या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’ किंवा स्वतंत्र चौकशी आयोगाद्वारे करावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. वित्तमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही चौकशी वित्त सचिवांमार्फत करण्याचे आश्‍वासन दिले होते. माजी वित्त सचिव श्री. यदुवंशी यांनी यासंबंधीचा चौकशी अहवाल सरकारला सुपूर्द केला आहे. दरम्यान, पर्रीकर यांनी माहिती हक्क कायद्याद्वारे मिळवलेली माहिती व अबकारी खात्याकडून देण्यात आलेली माहिती यात तफावत असल्याच्या आरोपांबाबत माजी अबकारी आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणात इतर राज्यांतून मद्य निर्यातीसाठी मिळवलेले अनेक परवाने रद्द करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. पर्रीकरांनी उल्लेख केलेल्या ‘आशा इंडो लंका वायन्स ऍण्ड स्पिरिट्स प्रा. ली’ ही कंपनी गेली पाच वर्षे बंद आहे व तिथे कोणत्याही प्रकारचे मद्य उत्पादन होत नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्याची निर्यात झाल्याचा आरोपही फेटाळून लावताना त्याची कोणतीही नोंद अबकारी तपास नाक्यावर नसल्याचे म्हटले आहे. मात्र तपास नाका चुकवून इतर मार्गांद्वारे वाहतूक होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली नाही.
मद्य निर्यात परवान्यांची विश्‍वासार्हता तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य अबकारी खात्याकडे वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. या चौकशीवेळी अबकारी आयुक्तांकडून जम्मू काश्मीरहून मद्य निर्यात करण्यासाठी बनावट परवाने दिल्याचे आढळून आले आहे. या परवान्यांवर आपल्या सहीचा गैरवापर केल्याचा दावा माजी अबकारी आयुक्त श्री. जॅकीस यांनी केला आहे. यासंबंधी जम्मू आणि काश्मीर अबकारी खात्याला राज्य अबकारी कार्यालयातून पत्रे फॅक्स करण्यात आल्याचेही उघड झाल्याने श्री. जॅकीस यांनी तात्काळ उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार नोंद केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावरून बेकायदा मद्य निर्यातदार व अबकारी अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीर सरकारकडून काही प्रमाणात या चौकशीसाठी प्रतिसाद देण्यात आला पण पंजाब सरकारकडून मात्र कोणतेच सहकार्य मिळाले नसल्याचेही या अहवालात नमूद झाले आहे.
दरम्यान, या अहवालात शेवटी माजी वित्त सचिवांनी अबकारी खात्यातील प्रक्रियेतच आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याची तसेच अबकारी कायद्यात दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे. एकीकडे माजी अबकारी आयुक्तांना ‘क्लीनचिट’ देतानाच या घोटाळ्याची सूत्रे अबकारी कार्यालयातूनच हलविली जात होती, असा विपर्यस्त श्री. यदुवंशी यांनी केल्याने या घोटाळ्याबाबत कुणालाही जबाबदार न ठरवता केवळ शिफारशी करून हा घोटाळा पुढे कसा काय रोखता येईल, याकडेच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. श्री. पर्रीकर यांच्या आरोपांना या अहवालात पुष्टी मिळाली आहेच पण त्याचे खापर कुणावरही न फोडता दोषींना मोकळे सोडण्याचाच प्रयत्न या अहवालात झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

भ्रष्टाचारी सरकारने राजीनामा द्यावा - श्रीपाद नाईक

मोन्सेरातविरोधात भाजपचे पणजीत धरणे

पणजी, दि.१३ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांसह सर्व कॉंग्रेसजनांना शिक्षणमंत्री भ्रष्ट असल्याची जाणीव आहे. मात्र सरकार कोसळून आपण सत्ताभ्रष्ट होऊ या भीतीपोटी सर्वजण गप्प राहून भ्रष्टाचारी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना पाठीशी घालत आहेत. ही गोष्ट गोव्याच्या हितासाठी अयोग्य व लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडालेल्या कामत सरकारने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी भाजप नेते, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी आज येथे बोलताना केली.
विदेशी चलन प्रकरणी कस्टमच्या जाळ्यात सापडलेल्या शिक्षणमंत्री मोन्सेरात यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने गोवाभर धरणे व निषेध कार्यक्रम आयोजीत केला आहे. त्या अंतर्गत तिसवाडी तालुका धरणे कार्यक्रमात खासदार नाईक बोलत होते. या प्रसंगी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रदेश अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर, पणजी भाजप मंंडळ अध्यक्ष पुंडलीक राऊत देसाई, सांताक्रुझचे अनिल होबळे, प्रमोद कामत, हेमंत गोलतकर, शैलेश पै, सांतआंद्रेचे सुरेश बोरकर, सोमनाथ पाटील, कुंभारजुव्याचे प्रेमानंद सावंंत, सिद्धेेश नाईक तसेच ताळगाव पणजी मंडळाचे पदाधिकारी आणि पणजीच्या नगरसेविका वैदेही नाईक, दीक्षा माईणकर, शीतल नाईक, शुभदा धोंड, प्रतिमा होबळे, नगरसेवक शेखर डेगवेकर व शुभम चोडणकर आदी मान्यवर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
कॉंग्रेसाय स्वाहा म्हणण्याची वेळ
या प्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते श्री. पर्रीकर म्हणाले की, कामत सरकारच्या कारकिर्दीत घडलेली भ्रष्टाचारी प्रकरणे व त्यावर मुख्यमंत्री घालत असलेले पांघरूण पाहता लोकांनी या सरकारला स्वाह , कॉंग्रेसाय स्वाहा म्हणण्याची वेळ आली आहे. यावेळी श्री. पर्रीकर यांनी शिक्षणमंत्री व कॉंग्रेस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी यावेळी शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली.
या प्रसंगी प्रा. पार्सेकर, वैदेही नाईक, प्रा. पर्वतकर, अनिल होबळे, ज्योती मसूरकर, दीपक म्हापसेकर, मिनीन डिक्रुझ आदींची भाषणे झाली.

असंवेदनशीेल सरकारला मांडवीत बुडवाः फोन्सेका

• मलेरिया कर्मचार्‍यांकडे सरकारचे दुर्लक्षच
• मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्याच्या बंगल्यावर धडक देणार

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
गेले वर्षभर सर्व सामान्य कष्टकरी लोकांची राज्यातील आंदोलने पाहता गोव्यात सरकार अस्तित्वात आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा या असंवेदनशील सरकारला मांडवीत बुडवण्याची गरज आहे, अशी टीका आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी आज (दि.१३) केली.
गेले सात दिवस आपल्या न्याय्य हक्कासाठी आरोग्य संचालनालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांची आज श्री. फोन्सेका यांनी भेट घेतली व त्यांना आयटकचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. या वेळी त्यांनी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांसह कॉंग्रेसच्या लोकविरोधी धोरणावर कडाडून टीका केली.
कर्मचार्‍यांना कायम करा ः मामी
सत्ताधारी पक्षातील एकमेव महिला आमदार असलेल्या विक्टोरिया फर्नांडिस यांनी या कर्मचार्‍यांची आज भेट घेतली. १५ वर्षे सेवा करणार्‍यांना सेवेत कायम करणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगून आपण मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांशी याबाबत बोलू असे आश्‍वासन दिले.
गेली पंधरा वर्षे मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणार्‍या ५९ कर्मचार्‍यांनी दि.७ पासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाची सरकारने जरासुद्धा दखल न घेतल्यामुळे समाजातील विविध स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेले सात दिवस उपोषण करणार्‍या या कर्मचार्‍यांतील अनेकांची प्रकृती खालावली असून त्यांच्या जिवाचे बरेवाईट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर तसे घडले तर त्याची जबाबदारी सरकारवर राहील असा इशारा प्रेमदास गावकर यांनी दिला असून दोनापावला येथे आरोग्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषण सुरू करण्यात येईल व मागण्या मान्य होईपर्यंत किंवा मरेपर्यंत हे उपोषण तेथेच सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

म्हापसा जिल्हा इस्पितळ ३१ मेपर्यंत सुरू करा

गोवा खंडपीठाचीा सरकारला शेवटची मुदत

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
म्हापसा जिल्हा इस्पितळ येत्या ३१ मे २०११ पर्यंत सुरू करण्यात यावे असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिला. यापुढे सरकारला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून ही शेवटची मुदत असेल असेही मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व ए. धर्माधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
सदर इस्पितळाची काय स्थिती आहे याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने न्यायालयात सादर केला होता. तर आज सरकारतर्फे अर्ज करून इस्पितळ सुरू करण्यास आणखी मुदतवाढ द्यावी अशी लेखी विनंती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला केली होती. इस्पितळात ट्रामा, आयसीयू आणि पॅडिएट्रिक विभाग सुरू केला जाणार असल्याचे सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे हे इस्पितळ ‘पीपीपी’ तत्त्वावर चालवायला दिले जाणार आहे, मात्र अद्याप कोणताही कंपनी तयार झालेली नाही. त्यामुळे निविदेतील काही नियम शिथिल करून ४ जानेवारी २०११ रोजी नव्याने निविदा मागवण्यात आली असल्याचीही माहिती सरकारने न्यायालयाला दिली आहे. यासाठी सल्लागार म्हणून सरकारने ‘आयसीआर’ या कंपनीची नियुक्ती केली असल्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी न्यायालयाला सांगितले.

जुझे फिलिप व बंधूविरोधात जमीन बळकावल्याची तक्रार

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा आणि त्यांच्या बंधूंनी भ्रष्टाचार करून सरकारी जमीन बळकावल्याने त्यांच्याविरुद्ध दक्षता विभागात तक्रार करण्यात आली आहे. सुमारे १०२ चौरस मीटर जागा बेकायदा बळकावली असल्याचा दावा करून प्रदीप काकोडकर, डॉ. केतन गोवेकर व ऍड. अतिश मांद्रेकर यांनी ही तक्रार केली आहे. तसेच, या तक्रारीची नोंद न केल्यास न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे मंत्री जुझे डिसोझा आणि त्यांच्या बंधूवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १३(१)सी आणि १३(१)डी, तसेच २१८, ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ व १२०(ब) कलमानुसार गुन्हा नोंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटल्यानुसार महसूल मंत्री जुझे फिलिप, क्लिमेंटी डिसोझा, जुझे निक्लांव डिसोझा यांनी मामलेदार, किनारी नियमन प्राधिकरण, मुरगाव पालिका आणि अन्य सरकारी अधिकार्‍यांच्या मदतीने १०२ चौरस मीटरची मोक्याची जागा बळकावली आहे. सदर जागा ‘सीआरझेड’ भागात येत असतानाही बनावट दाखले करून ती ‘सीआरझेड’मध्ये येत नसल्याचे दाखवण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
त्यामुळे या तक्रारीवर दक्षता विभागाने या प्रकारची चौकशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीला फटका बसला आहे. कलम १५४(१)नुसार माहिती मिळताच त्या तक्रारीची नोंद घेऊन चौकशी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे तक्रारीची दखल घेऊन चौकशी न केल्यास न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीची एकप्रत भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या पोलिस अधीक्षकांनाही पाठवण्यात आली आहे.

खाण वाहतूकीविरोधात ‘रणरागिणीं’चे रणशिंग

• १८ महिला संघटना एकत्र
• सरकारला १० दिवसांची मुदत

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
बेदरकार खनिज वाहतुकीविरोधात आत्तापर्यंत पुरुषांनी केलेल्या आंदोलनांची दखल घेण्यास सरकारी यंत्रणा निष्क्रिय ठरल्याने आता या आंदोलनाची सूत्रे महिलांनी आपल्या हातात घेण्याचे ठरवले आहे. एकवोट सोसायटीच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या दक्षिण गोव्यातील सुमारे १८ महिला संघटनांच्या रणरागिणींनी खनिज वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सरकारला दहा दिवसांची मुदत देऊन एका नव्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
राज्य सरकारने दक्षिण गोव्यातील विविध खाण प्रभावित क्षेत्रातील खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दहा दिवसांत ठोस उपाययोजना आखली नाही तर महिला संघटना रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखेल व त्यामुळे उद्भवणार्‍या परिणामांना सरकार जबाबदार राहील, असा इशारा संघटनेच्या नेत्या सुवर्णा तेंडुलकर यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्य सचिव, वाहतूक संचालक, पोलिस खाते व दाबाळ-किर्लपाल पंचायतीला देण्यात आले आहे. सांगे तालुक्यातील दाबाळ ते कापशे या भागातील परिसरातील लोकांना खनिज वाहतुकीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खनिज ट्रकांमुळे वाहतुकीची कोंडी हा तर नित्याचाच प्रकार ठरला असून त्यामुळे येथील नागरिकांचे जगणे हैराण झाल्याचेही श्रीमती तेंडुलकर यांनी म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते संध्याकाळी ६ या काळात खनिज वाहतूक करण्यास मान्यता आहे. या वेळेच्या नियोजनानुसार सकाळी ८ वाजता बेफामपणे खनिज वाहतूक केली जाते. खनिज ट्रकचालक एकमेकांना मागे टाकण्याच्या शर्यतीत जनतेच्या जिवाशीच खेळ करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुपारच्या वेळेला रस्त्याच्या दुतर्फा खनिज ट्रक पार्क करून ठेवले जातात व त्यामुळे इतर वाहतुकीलाही रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनते, असेही श्रीमती तेंडुलकर यांनी म्हटले आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम विद्यार्थी, रुग्ण, लग्नाची वर्‍हाडे आदींवर होतो. एखाद्याच्या अंत्ययात्रेच्या वेळीही रस्त्यावरून चालत जाणे शक्य होत नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

२९,६०,७५० रुपये दंड बसमालकांकडून वसूल

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
राज्यातील खाजगी बसमालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल दि.१२ पासून जुन्ता हाउससमोर उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि. १५ पासून बसेस बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. वाहतूक खात्याने बस मालकांच्या मागण्या अमान्य करून बंद मोडून काढण्याची तयारी चालवली आहे. या संघर्षात वाहतूक खात्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍या खाजगी बसमालकांकडून ऑक्टोबर २०१० ते मार्च २०११ पर्यंत तब्बल २९, ६०, ७५० रुपये एवढा दंड वसूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ऑक्टोबर महिन्यात ८,१९,९०० रु., नोव्हेंबर महिन्यात ५,१९,४५० रु., डिसेंबरात ७,५७,६५० रु., जानेवारीत ५,१६,०५० रु., फेब्रुवारीत २,०५,४०० रु.तर मार्च महिन्यात १,४२,३०० रु. एवढा दंड वसूल केल्याची माहिती मिळाली आहे.

Wednesday 13 April, 2011

पैंगीणीत दोन मंदिरे फोडली!

नरसिंह, नवदुर्गा मंदिरांतून ५ लाखांचा ऐवज लंपास

काणकोण दि. १२ (प्रतिनिधी)
ऐन रामनवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला पैंगीण - महालवाडा येथील जवळजवळ असलेल्या दोन प्रसिद्ध देवस्थानांत चोरट्यांनी दोन धाडसी चोर्‍या करून काणकोण तालुक्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. येथील नरसिंह देवस्थानातील ३,०५,३०० रुपयांचा तर नवदुर्गा देवस्थानातील २,००,००० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी हातोहात पळवला आहे.
काणकोण पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीच्या या घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या. मंगळवारी सकाळी हे प्रकार उघडकीस आल्यानंतर उपअधीक्षक रोहिदास पत्रे, निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी श्‍वानपथकासह घटनास्थळी भेट देऊन तपास केला. मात्र चोरांचा कोणताही सुगावा त्यांना रात्री उशिरापर्यंत लागलेला नव्हता.
सविस्तर माहितीनुसार, पैंगीण बाजारापासून अडीच ते तीन किलोमीटरवर असलेल्या महालवाडा या ठिकाणी नरसिंह देवस्थान आहे. हल्लीच फेब्रुवारी महिन्यात पर्तगाळ स्वामी महाराजांच्या हस्ते या मंदिरात विधिवत या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रात्रौ ३.३० च्या दरम्यान नेहमीप्रमाणे काणकोण पोलिस गस्तीवर असता त्यांना या देवळाचे दरवाजे उघडे दिसले. त्वरित पोलिसांनी जवळच असलेल्या घरातील महाजन फ. य. प्रभुगावकर यांना रात्रौ ४ वाजता उठवून सदर घटनेची माहिती दिली. लगेच सर्व समिती सदस्यांना कळविण्यात आले. या देवळाच्या दोन दरवाजांना असलेली दोन्ही कुलुपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला व गर्भकुडीचे कुलूप तोडून देवतांचे दोन मुखवटे, उत्सवमूर्तीची प्रभावळ बाहेर आणून प्रतिमा निखळली, उत्सवमूर्तीचे चांदीचे मुखवटे, पितळीची आरती, दोन माळा व रोख रुपये ४,००० असा ऐवज चोरट्यांनी पळवला, अशी माहिती महाजन उदय प्रभुदेसाई यांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी तेथून साधारण एक किलोमीटरवर असलेल्या नवदुर्गा देवालयाचीही पाहणी केली असता तिथेही चोरट्यांनी हात दाखवल्याचे त्यांना दिसून आले. या ठिकाणी देवीचे सर्व सोन्याचे अलंकार, मुखवटे आदी मिळून साधारण सहा लाख रुपयांची चोरी झाल्याचे महाजनांचे म्हणणे आहे. मात्र काणकोण पोलिसांनी नरसिंह देवस्थानात चांदी व तांब्याच्या वस्तू मिळून ३,०५,००० तर नवदुर्गा देवस्थानात आठ बांगड्या, सोनसाखळी, हार व दोन मुकुट मिळून रु. २,००,००० ची चोरी झाल्याचे सांगितले. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत या देवस्थानांत काही भाविक उपस्थित होते. त्यामुळे या चोर्‍या रात्री १२.३० ते ३च्या दरम्यान झाल्या असाव्यात असा पोलिसांचा कयास आहे. चोरट्यांनी गाडीतून पळ काढला असावा व त्यामुळेच श्‍वानपथकाला त्यांचा माग लागला नाही, असे निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी सांगितले.
गेल्या आठ एप्रिल रोजी पैंगीण येथीलच परशुराम देवस्थानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.तेव्हा चोरांनी देवालयाच्या दोन दरवाजांची कुलुपे तोडली होती. मात्र गर्भकुडीचे टाळे तोडण्यात त्यांना अपयश आले होते. त्यावेळी दुधाचा व्यवसाय करणारा एक नागरिक तेथे पोहोचल्याने चोरांनी पलायन केले होते. चोर बहुधा पळून जाण्यास सोपे जावे म्हणून दोन दारांची कुलुपे तोडत असावे, असा कयास गोविंद प्रभुगावकर यांचे म्हणणे आहे.४

दोन अपघातांत दोघे ठार

म्हापसा व कुडचडे, दि. १२ (प्रतिनिधी)
राज्यात आज दि. १२ रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत दोघांना आपले प्राण गमवावे लागले. शिरसई येथील खाण जेटीवरून मुख्य रस्त्याकडे येणार्‍या ट्रकाने रस्त्याशेजारी फोनवर बोलत थांबलेल्या कैलासनगर - अस्नोडा येथील युवकाला चिरडले तर थोरलेमळ - काले येथे कदंब बसला जोरदार धडक दिल्याने चिरेखाणीवर काम करणारा दुचाकीस्वार ठार झाला.
शिरसईत खनिज वाहतुकीचा बळी
शिरसई भागात अनियंत्रित पद्धतीने होत असलेल्या खनिज वाहतुकीने आज एक बळी घेतला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिरसई येथील खाण जेटीवरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी झपकन वळलेल्या जीए ०३ टी ६४९९ या क्रमांकाच्या ट्रकाने तेथेच रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसून फोनवर बोलत असलेल्या कैलासनगर - अस्नोडा येथील राधेश के. चल्लप्पन (२६) या युवकाला ठोकरले. त्यानंतर ट्रकाचे मागील चाक अंगावरून गेल्याने तो चिरडला जाऊन जागीच ठार झाला.
या प्रकरणाची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक तुळशीदास धावस्कर घटनास्थळी पोहोचले. अपघाताचा पंचनामा करून त्यांनी राधेश या मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळीला पाठवून दिला. या प्रकरणी केरळ येथील महंमद रेहमान मापी या ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
मयत राधेश के. चल्लप्पन याचे कुटुंब मूळ मणिपूर येथील असून त्याचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यातच स्थायिक झाले आहेत. राधेश याचा जन्मही गोव्यातच झाला होता. या दुर्घटनेमुळे अस्नोडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनियंत्रित खनिज वाहतुकीबद्दल संतप्त प्रतिक्रियाही नोंदवल्या जात आहेत.
कालेत एक ठार, एक गंभीर
दरम्यान, थोरलेमळ - काले येथे आज दुपारी भरवेगाने धावणार्‍या दुचाकीने कदंब बसला समोरून जोरदार धडक दिल्याने मूळ विजापूर व सध्या काले येथील चिरेखाणीवर काम करणारा लक्ष्मण नामक कामगार जागीच ठार झाला तर मागे बसलेला मल्लेश हा गंभीर जखमी झाला आहे.
आज दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. कालेहून सावर्डेला जाणार्‍या जीए ०१ एक्स ०४७९ क्रमांकाच्या कदंबला येथील वळणावर जीए ०२ क्यू ३२४७ या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीचालक लक्ष्मण याचे डोके बसवर धडकल्याने काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला तर मागे बसलेला मल्लेश हा सरळ जाऊन बसच्या समोरील काचेवर आपटला व दूर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही धडक एवढी जबरदस्त होती की टायर फुटल्याचा मोठा आवाज आला व दुचाकीचा चक्काचूर झाला. आवाजाने आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. गंभीर अवस्थेतील मल्लेशला आधी कुडचडे आरोग्यकेंद्रात व नंतर बांबोळीला हालवण्यात आले आहे. कुडचडे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याच रस्त्यावरून खनिज वाहतूक होत असल्याने तिथे गतिरोधकांची मागणी ग्रामस्थांनी केली होती. तसेच सदर वळण अरुंद असल्याने त्याचे रुंदीकरण केले जावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

..तर शुक्रवारपासून बसेस ‘बंद’!

खाजगी बसमालकांचे उपोषण सुरू

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)
गेले वर्षभर वारंवार विनवण्या करूनही सरकार मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ करत असल्याने खाजगी बसमालक संघटनेने आज दि. १२ पासून तीन दिवसांच्या उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. मलेरिया सर्वेक्षकांचे दि. ७ रोजी सुरू झालेले उपोषण अद्यापही सुरूच असल्याने आता राजधानीत यामुळे दुसर्‍या उपोषणास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांची सरकारने दखल न घेतल्यास दि. १५ पासून खाजगी बसमालकांचा बेमुदत संप सुरू होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
खाजगी बसमालक संघटनेने आपल्या मागण्यांसंदर्भात सरकारला ५ रोजी निवेदन सादर केले होते. परंतु, सरकारने त्याची दखल न घेतल्याने या बसमालकांनी आजपासून तीन दिवसांच्या उपोषणास सुरुवात केली. दरम्यान, या उपोषणाचीही दखल न घेतल्यास दि. १५ पासून खाजगी बसमालक बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांना तिकीटदर सवलत, कदंबकडून छळणूक, संघटनेसाठी प्रत्येक बसस्थानकावर कार्यालय, बसेसवरील जाहिराती, अनुदान समितीवर संघटनेच्या अध्यक्षांची नेमणूक, वाहतूक धोरण, पणजी - मडगाव -आणि वास्को शहरांत बसेस नेण्यासाठी असलेले बंधन, संघटनेच्या एखाद्या सदस्याची रस्ता रहदारी प्राधिकरणावर नेमणूक, तिकीट मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत आदी संदर्भातील खाजगी बसमालक संघटनेच्या एकूण १५ मागण्या आहेत. परंतु, सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. वारंवार आश्‍वासने देऊन बसमालकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे हा आंदोलनाचा मार्ग पत्करण्यावाचून पर्याय उरला नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आज सुमारे पन्नास बसमालक उपोषणात सहभागी झाले होते. सरचिटणीस ताम्हणकर हे संघटनेच्या मागण्यांसाठी स्वतंत्र उपोषण करत आहेत तर इतर बसमालक साखळी उपोषणाला बसले आहेत.

नेपाळी इसमाकडून लाखाचे ड्रग्ज जप्त

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)
मडगाव बसस्थानकावर अमली पदार्थ देण्यासाठी आलेल्या ईश्‍वर ईची बुद्धा (४६)या नेपाळी इसमाला सोमवारी रात्री १० वाजता अमली पदार्थ विरोधी पथकाने मुद्देमालासकट ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ११ हजार ५०० रुपये किमतीचा १.११५ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, एक व्यक्ती गोव्यात चरस देण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मडगाव बसस्थानकावर सापळा रचण्यात आला. रात्री बस स्थानकात संशयास्पदरीत्या फिरताना सदर व्यक्ती दिसल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील बॅगेत चरस आढळून आला. मडगाव भागातील एका व्यक्तीला हा चरस देण्यासाठी आपण आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
ईश्‍वर झाशीहून गोव्यात आला होता. इथे त्याच्याकडून हा चरस कोण घेणार होता, याची चौकशी पोलिस करीत आहेत. सदर छापा अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपअधीक्षक नरेश म्हामल आणि उपनिरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताकांत नायक यांनी टाकला. यात पोलिस शिपाई सचिन सावंत, सुशांत पागी आणि चंदन अर्धरोट्टी यांनी सहभाग घेतला. या विषयीचा पुढील तपास उपनिरीक्षक नायक करीत आहेत.

माधव कामत अहवालाची त्वरित अंमलबजावणी करा

भारतीय भाषा सुरक्षा मंचाची आग्रही मागणी
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)
राज्य सरकारने पूर्वप्राथमिक स्तरावरील शिक्षणाचे धोरण अद्याप निश्‍चित केलेले नाही. त्यामुळे या विषयीचे धोरण निश्‍चित करून सरकारने माधव कामत समिती अहवालाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी आज भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या अध्यक्ष शशिकला काकोडकर यांनी केली. आज सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रा. सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, नरेंद्र आजगावकर व नागेश करमली उपस्थित होते.
भारतीय भाषांच्या समर्थनात दि. ६ एप्रिल रोजी आझाद मैदानावर झालेल्या महामेळाव्यातून मंचाचा शक्तिप्रदर्शन करण्याचा हेतू नव्हता तर, भारतीय भाषांतून आणि मातृभाषेतून पूर्वप्राथमिक तसेच प्राथमिक स्तरावर मुलांचे शिक्षण होणे का गरजेचे आहे, हे पटवून देण्याचा उद्देश होता, असे शशिकला काकोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. इंग्रजीतून गरीब लोकांचेही शिक्षण झाले पाहिजे, असा युक्तिवाद करणार्‍या डायसोसन सोसायटीने गेल्या २० वर्षांत ख्रिश्‍चन समाजातील गरीब लोकांचा का उद्धार केला नाही, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे, असे १९६८च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्पष्टपणे म्हटलेले आहे. पूर्वप्राथमिक स्तरावर इंग्रजी भाषेतून शिक्षण झाल्यास अराष्ट्रीयीकरण होण्याची व संस्कृतीचा र्‍हास होण्याची भीती भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, असे यावेळी श्री. भाटीकर यांनी सांगितले.
गोव्यातील बहुसंख्य लोकांना मातृभाषेतूनच शिक्षण हवे आहे. त्यामुळे इंग्रजीची मागणी केवळ खुन्नसापोटीच पुढे रेटली जात आहे. त्यामुळे यापुढे राज्यात कोणतेही सरकार आले तरी त्या सरकारला मातृभाषेला हात लावण्याचे धाडस होणार नाही असा दरारा निर्माण केला पाहिजे, असे श्री. वेलिंगकर यावेळी म्हणाले. तालुकावार समित्यांच्या माध्यमातून या संदर्भात जागृती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सरकारने माधव कामत समितीचा अहवाल स्वीकारला. परंतु, त्याची अंमलबजावणी केली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. चर्चिल आलेमाव यांचे त्यांच्या मतदारसंघातील संख्याबळ घटले आहे व त्यामुळे ते बेताल बडबड करू लागले आहेत, अशी टीका स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी यावेळी केली.

‘दाबोळी’च्या धावपट्टीचे दुरुस्तीकाम सुरू असल्याने १९ विमानांवर वेळ बदलण्याची पाळी

वास्को, दि. १२(प्रतिनिधी)
येथील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीचे दुरुस्ती काम सुरू असल्याने प्रामुख्याने दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत काही ‘नेव्हिगेशनल लाईटस्’ बंद ठेवले जात आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांपर्यंत दररोज सुमारे १९ विमानांना आपली वाहतुकीची वेळ बदलणे अनिवार्य बनले असून एक प्रकारे ही वेगळीच ‘हवाई कसरत’ ठरली आहे.
५ एप्रिलपासून सुरू झालेल्या या कामानंतर दुरुस्तीच्या वेळेत सदर ‘लाइटस्’ बंद असतानाही काही वैमानिक आपल्या अनुभवाच्या बळावर विमाने दाबोळीच्या धावपट्टीवर उतरवत असल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या लक्षात आले. त्यामुळे या गंभीर प्रकाराची त्यांनी कडक दखल घेतली. त्यानंतर आजपासून सकाळी ८.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत तेथे विमान उतरवण्याचे बंद करण्यात आल्याची माहिती दाबोळी विमानतळ सूत्रांनी दिली. यासंदर्भात चार विमान कंपन्यांवर नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. दाबोळी विमानतळावरील तसेच नौदल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ एप्रिल पासून येथील धावपट्टीच्या ‘डोंबेल’ भागाच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आले आहे. ५ जूनपर्यंत सदर काम पूर्ण होणार आहे. हे काम ‘मिलिटरी इंजिनीअरींग सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे. सकाळी ८.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० अशी या दुरुस्ती कामाची वेळ आहे. यादरम्यान उड्डाणपट्टीवर असलेले काही नेव्हिगेशनल लाईटस् बंद ठेवावे लागत आहेत. साहजिकच या काळात दाबोळीवर विमान उतरवणे खूपच कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. दाबोळी विमानतळावरील धावपट्टी सकाळी ८.३० ते १ वाजेपर्यंत विमाने उतरवण्यासाठी बंद असल्याने सदर वेळेत तेथे कुठलाच त्रास होत नाही. मात्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५.३० हा वेळ घाईगडबडीचा असल्याने गेल्या काही दिवसांत याचा त्रास दिसून आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुपारी ३ ते ५.३० या दुरुस्तीच्या वेळेत खर्‍या अर्थाने बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले जात असले तरी नौदल सूत्रांच्या माहितीनुसार तांत्रिक कारणामुळे सदर वेळेत बदल करणे कठीण आहे. या स्थितीतही काही वैमानिकांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर दाबोळीवर विमाने उतरवली असली तरी एखाद्या मानवी चुकीने जर दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे.

दुर्घटना घडली तर...
दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीचे दुरुस्तीकाम सुरू असतानाही आपल्या अनुभवाच्या जोरावर काही वैमानिकांनी तेथे विमाने उतरवल्याचे दिसून आले आहे. मात्र हे प्रकार म्हणजे दुर्घटनेला खुले आमंत्रण ठरू शकतात. त्यामुळे जर एखादी गंभीर अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तथापि, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

शिवोलीत एकाचा नदीत बुडून मृत्यू

म्हापसा, दि. १२ (प्रतिनिधी)
घुबलावाडा -ओशेल, शिवोली येथील प्रभाकर धारगळकर यांना शापोरा नदीत बुडून मृत्यू आला. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, घुबलावाडा - शिवोली येथील प्रभाकर धारगळकर सोमवारी रात्री घरी ९.३० च्या सुमारास जेवले व त्यानंतर ते नदीकिनारी नैसर्गिक विधीसाठी गेले. त्यावेळी तोल जाऊन ते नदीच्या पाण्यात पडले. आज मंगळवारी सकाळी त्यांचे प्रेत शापोरा नदीत तरंगताना दिसले. या घटनेची माहिती हणजूण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

‘अपरांत’ कामगारांचा अखेर विजय, संप मागे

कुडचडे, दि. १२ (प्रतिनिधी)
कष्टी येथील अपरांत आयर्न स्टील कंपनीमधील कंत्राटदारांच्या कामगारांचा विजय झाला असून कंपनी व कंत्राटदारांनी अखेर या कामगारांपुढे शरणागती पत्करली आहे. मागणीनुसार, त्यांना आता प्रतिदिनी २०० रुपये पगार देण्याचे कंपनी व कंत्राटदारांनी मान्य करत अन्य मागण्यांवर महिन्याभरात तोडगा काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
आज कामगार लवादासमक्ष या संदर्भात करार झाल्यानंतर गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेला हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.
गेल्या काही काळापासून २४ तास कंपनीच्या गेटबाहेर ठाण मांडून कोणत्याही दडपणाला न जुमानता या कामगारांनी संप सुरूच ठेवला होता. देण्यात येणार्‍या १३५ रुपयांच्या मानधनात वाढ करावी, सुट्टी, ‘ओ.टी.’, कपड्यांचा पुरवठा, ८ तास काम व अन्य काही मागण्या कामगारांनी कंपनी व कंत्राटदारांसमोर ठेवल्या होत्या. यातील वाढीव पगाराची मागणी मान्य झाल्याने महागाईच्या काळात थोडा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष बाबू शिंगाडी यांनी सांगितले. सदर संप तात्पुरता थांबविण्यात आला असून कामगारांच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी संबंधितांना एका महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. राहिलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा कामगार संपावर जाणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी आनंद बेतकीकर यांनी यावेळी सांगितले.
‘गोवादूत’चे अभिनंदन
दरम्यान, कामगारांनी संप सुरू केल्यापासून ते संप मिटेपर्यंत यासंबंधी सतत बातम्या प्रसिद्ध करून सरकार व कंपनी व्यवस्थापनाला जाग आणल्याबद्दल आणि कोणत्याही दडपशाहीला न जुमानता केवळ कामगारवर्गाच्या बाजूने उभा राहिला याबद्दल या कामगारांनी ‘दै. गोवादूत’चे खास अभिनंदन केले आहे.

Tuesday 12 April, 2011

बाबूश हटाव..!

भाजपतर्फे विविध तालुक्यांत धरणे

वास्को, दि. ११ (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना विदेशी चलन तस्करी प्रकरणी मुंबई कस्टम्स अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडूनही कामत सरकार त्यांची पाठराखण करत असल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी भाजपतर्फे राज्यातील विविध तालुक्यांत धरणे धरण्यात आले. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी लाभलेल्या बाबूश यांना मंत्रिमंडळातून तात्काळ डच्चू दिला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज पेडणे, केपे, मुरगाव व काणकोण या तालुक्यांत हे आंदोलन छेडले गेले.
सध्या विदेशी चलन तस्करी प्रकरणात अडकलेले बाबूश मोन्सेरात यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी व एकूण विवादास्पद आचरण पाहता त्यांना शिक्षणमंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांना या पदावरून त्वरित बडतर्फ करावे, म्हणून विरोधी भाजप आमदारांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात अभूतपूर्व गदारोळ माजवला होता. प्रदेश भाजपनेही विविध प्रसंगी बाबूश यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. दरम्यान, आजपासून भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणी आपली मोहीम अधिकच तीव्र केली असून विविध तालुक्यांत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मुरगावात तीव्र निषेध
बाबूशप्रकरणी मुरगावातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आज धरणे धरून कामत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी अशा चारही मतदारसंघांतील भाजप कार्यकर्त्यांनी मुरगाव नगरपालिकेच्या इमारतीबाहेर धरणे धरले. यावेळी उपस्थित भाजपचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, जयंत जाधव, नगरसेवक कृष्णा (दाजी) साळकर, नगरसेविका सारिका पालकर, नगरसेवक राजेश रेडकर तसेच इतर भाजप नेत्यांनी कामत सरकारातील शिक्षणमंत्र्यांसोबतच अन्य भ्रष्टाचारी मंत्र्यांवर सडकून टीका केली. बाबूशकडे यांच्याकडे नेमके किती प्रमाणात विदेशी चलन सापडले व त्यांचा हवाला प्रकरणात सहभाग आहे काय, याची चौकशी ‘सीबीआय’ मार्फतच व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाबूश यांची पाठराखण करून मुख्यमंत्री गोव्यातील जनतेला चुकीचा संदेश देत आहेत, असाही आरोप यावेळी करण्यात आला.
सकाळी दहा वाजता सदर धरणे आंदोलन सुरू झाले. यावेळी बाबूश व कामत सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात प्रशांत नार्वेकर, दिगंबर आमोणकर, किरण नाईक, समीर वाळके, सचिन चौगुले, उल्का गावस, ऍड विद्या शेट, नगरसेविका सुमिता उजगावकर, चंद्रकांत गावस यांचा सहभाग होता. मुरगाव नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांनीही येथे उपस्थिती लावली. संध्याकाळी साडे पाच वाजता धरण्याची सांगता करण्यात आली.

तोतया पोलिसांचा राज्यात धुमाकूळ

म्हापसा व पणजीत महिलांना लुबाडले

म्हापसा व पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)
‘राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला असून अंगावर मौल्यवान दागिने घालून फिरणे धोक्याचे आहे. आम्ही पोलिस असून तुमचे दागिने व्यवस्थित बांधून देतो’, अशी बतावणी करत महिलांना अंगावरील दागिने उतरवण्यास भाग पाडून ते हातोहात लंपास करणार्‍या तोतया पोलिसांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे. आज दि. ११ रोजी या बतावणीच्या आधारे म्हापशात दोन ठिकाणी तर पणजीत एके ठिकाणी त्यांनी तिघा महिलांना लाखो रुपयांना गंडा घातला.

पणजीत महिलेला लुटले
सान्तिनेज - पणजी येथे आज सकाळी ४५ वर्षीय शकुंतला नाईक या महिलेला दोघा तोतया पोलिसांनी ५५ हजार रुपयांना लुटले. पणजीत चोरांचा वावर वाढलेला असल्याचे सांगत त्यांनी तिच्या अंगावरील २ पाटल्या व एक अंगठी काढून घेतली. तसेच, ते दागिने बांधून देत असल्याचे भासवून त्या दोघांनी येथून पलायन केले. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यावर सदर महिलेने पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली.
सकाळी ९च्या दरम्यान शकुंतला नाईक रस्त्याने जात असता एक तरुण त्यांच्याकडे आला आणि त्यांना साहेब बोलावत असल्याचे सांगून दुसर्‍या तरुणाकडे घेऊन गेला. त्याने तिला अंगावरील दागिने काढण्यास सांगितले व ते एका कागदात बांधून तिच्याकडे असलेल्या पिशवीत ठेवले. पुढे जाऊन तिने पिशवीत पाहिले असता त्यात दागिने नसल्याचे तिच्या लक्षात आले. सदर तोतया पोलिस कोकणी व हिंदी भाषेतून बोलत होते, अशी माहिती मिळाली आहे. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रदीप वेळीप करीत आहेत.

म्हापशात दोघांना गंडवले
दरम्यान, पणजीत घडलेल्या प्रकाराचीच हुबेहूब पुनरावृत्ती आज म्हापशात दोन ठिकाणी घडली. येथील कवळेकर टॉवरकडून चालत येणार्‍या ऊर्मीला विजय नाईक यांना वाटेत अडवून दोघा युवकांनी तिच्याकडील सुमारे ५५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. सकाळी ११.१५ वाजता हा प्रकार घडला. आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांनी सौ. नाईक यांना अंगावरील ३० हजारांचे मंगळसूत्र, १० हजारांची सोनसाखळी, १५ हजारांची सोन्याची बांगडी काढण्यास सांगितले. हे नग कागदात बांधून देण्याचा बहाणा करत त्यांनी दुसरेच पुडके त्यांच्या बॅगेत टाकले. पुढे पोलिस स्टेशनजवळ जाऊन सौ. नाईक यांनी दागिने पाहिले असता आत एक लोखंडी चकती व एक दगड सापडला. त्यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली.
असाच प्रकार सकाळी १०.३० वाजता डांगी कॉलनीतील शांताबाई च्यारी (४५) यांच्या बाबतीत घडला. सदर महिलेला २० ते २५ वयोगटातील दोघा युवकांनी वाटेत रोखले व शहरात भुरटे चोर फिरत असल्याचे सांगून त्यांच्याकडील २० हजारांचे मंगळसूत्र, १० हजारांची सोनसाखळी व १५ हजारांची बांगडी मिळून ४५ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. हे दागिने कागदात गुंडाळत असल्याचे भासवत त्यांनी शिताफीने दगड असलेले पुडके त्यांच्या हवाली केला. पुढे जाऊन शांताबाई यांनी हे पुडके उघडून बघितले असता आपण लुबाडले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची तक्रार पोलिस स्थानकात नोंद केली आहे. या प्रकरणांचा तपास म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संदीप केसरकर करीत आहेत.

तो मृतदेह जनार्दनचाच!

मोले खूनप्रकरणी राजू कोकरे यांचा दावा

फोंडा व डिचोली, दि. ११ (प्रतिनिधी)
बरकटे - मोले येथे रविवार १० एप्रिल २०११ रोजी खून करून सुमो जीपमध्ये जाळण्यात आलेल्या अज्ञाताच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र सदर गाडीत आढळून आलेला मृतदेह आपल्या भावाचाच असल्याचा दावा जनार्दन कोकरे याचा भाऊ राजू कोकरे यांनी केला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचा संशय व्यक्त करून राजू कोकरे यांनी त्या बाबतीत अनेक संदर्भही पत्रकारांशी बोलताना उघड केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
जीपमध्ये पूर्णपणे जळलेल्या स्थितीत असलेला मृतदेह हा गेल्या शनिवारपासून बेपत्ता असलेल्या जनार्दन कोकरे याचाच असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून केला जात असला तरी त्यावर पोलिसांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे ह्या जाळण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुळे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी दिली आहे.
मृतदेह जाळण्यात आलेली टाटा सुमो जीप गाडी (जीए ०४ सी ०१८३) ही पैरा - मये येथील जनार्दन विठू कोकरे याच्या मालकीची आहे. या जीपगाडीत मागील सीटवर जळलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. ह्या मृतदेहाचे मुंडके आगीत जळल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. मृतदेह जळलेल्या स्थितीत असल्याने शवविच्छेदन अहवाल पोलिसांना उशिरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता.
जनार्दन कोकरे हा गेल्या शनिवार ९ रोजी वास्को येथून भाडे घेऊन बेळगावला जाणार होता, अशी माहिती जनार्दन कोकरे याच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे जनार्दन कोकरे याच्या भावाला घटनास्थळी नेऊन मृतदेहाची ओळख पटविण्याची विनंती पोलिसांनी केली. मृतदेह पूर्णपणे जळलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटविणे कठीण बनले आहे.
‘खून पूर्ववैमनस्यातूनच’
दरम्यान, जनार्दन याचा भाऊ राजू कोकरे यांनी पत्रकारांसमोर केलेल्या दाव्याप्रमाणे पूर्ववैमनस्यातूनच हा खून घडला आहे. जनार्दनला काही महिन्यांपासून परदेशातून धमकीवजा फोन येत होते. हल्लीच त्याचे एका शेजार्‍याशी जमिनीच्या वादातून भांडणही झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराच्या मागील बाजूस कुणी अज्ञाताने आगही लावली होती. आपल्याला येणार्‍या धमकीच्या फोनविषयी जनार्दन याने आपल्या एका मित्राला कळवले होते व या संदर्भात लेखी तक्रारही त्याने तयार करून ठेवली होती, असे राजू कोकरे यांनी सांगितले. त्यामुळे या धमकीच्या फोनची, मागीलदारी लावलेल्या आगीची व अन्य संबंधित प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनोज म्हार्दोळकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

मलेरिया कर्मचार्‍यांना कायम कराच - पर्रीकर

कुटुंबीयांच्या सहभागामुळे आंदोलन गंभीर वळणावर

- पाचव्या दिवशी तणाव
- आरोग्य संचालकांना घेराव
- अनेक संघटनांचा पाठिंबा


पणजी, दि.११ (प्रतिनिधी)
मलेरिया सर्वेक्षकांचे आंदोलन हे सत्यासाठी आहे. दहा ते पंधरा वर्षे काम कंत्राटी पद्धतीवर काम केलेल्या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आजपर्यंत या कर्मचार्‍यांवर झाला तेवढा अन्याय बस्स झाला. आता त्यांना सेवेत कायम कराच, असे आवाहन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केले.
गेली दहा ते पंधरा वर्षे आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आरोग्य संचालनालयासमोर दि. ७ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी पाचव्या दिवशी या कर्मचार्‍यांचे कुटुंबीयही लहान लहान मुलांसह या उपोषणात सहभागी झाल्यामुळे या ठिकाणी बराच तणाव निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज या कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांचीही भेट घेतली. या भेटीत, कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले असल्याची माहिती आरोग्य संचालकांनी दिली असल्याचे श्री. पर्रीकर यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. या संदर्भात आजच मुख्य सचिवांशी बोलून सर्व कर्मचार्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिले.

विविध संघटनांचा पाठिंबा
दरम्यान, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या मलेरिया कर्मचार्‍यांना गोव्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. यात शिवसेना, सवेरा, क्रांतीसेना, खाजगी बस संघटना आदींचा समावेश आहे. या संघटनांचे नेते आज सदर ठिकाणी उपस्थित होते. मलेरिया कर्मचार्‍यांचे कायदा सल्लागार ऍड. सुभाष सावंत यांनी यावेळी संचालकांनी सुचवलेल्या काही जणांना कायम करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला व सर्वांना एकत्रितरीत्या सेवेत कायम करण्याची मागणी केली. दरम्यान, आज संध्याकाळी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. भाजप प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर हेही या वेळी उपस्थित होते.

मरण आले तरी बेहत्तर...!
जोपर्यंत सर्व ५९ कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे लेखी पत्र हातात पडत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील. या दरम्यान, एखाद्याला आपले प्राण गमवावे लागले तरी बेहत्तर, असा कडक इशारा या वेळी या कर्मचार्‍यांचे प्रमुख प्रेमदास गावकर यांनी दिला.

‘पैसे वाटून घ्या...’
आरोग्यमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे सोपस्कार करण्याची सूचना आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई यांना दिली होती. मात्र त्यांनी काहीही हालचाल केली नाही. उलट आज, ‘१२ जणांना सेवेत कायम करतो व इतरांचे नंतर पाहूया; तोपर्यंत पैसे वाटून घ्या’ अशी संतापजनक सूचना केली. अशा असंवेदनशील संचालिकेची पदावरून तात्काळ उचलबांगडी करा, अशी मागणी या वेळी श्री. गावकर यांनी केली.
कंत्राटाचा करार वाढवला
दरम्यान, गेल्या ३१ मार्च रोजी या कर्मचार्‍यांचे कंत्राट संपले होते.
ते वाढवण्यात आले नव्हते. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या हे कर्मचारी गेले दहा दिवस बेकारच होते. आता आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांचे कंत्राट वाढवण्यात आले असून महिना ३५०० रुपये मिळणारा पगार आता महिना ६६०० रुपये असा वाढवण्यात आला आहे. मात्र आपल्याला पगारवाढ नको तर कायम नोकरीच हवी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दि. १४ पर्यंत न्याय न मिळाल्यास आरोग्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच धडक देणार असल्याचे श्री. गावकर यांनी सांगितले.

खोतोडे - गवाणेतील संतप्त नागरिकांनी खनिजवाहू ट्रक रोखले

वाळपई, दि. ११ (प्रतिनिधी)
गवाणे - सत्तरीतील टीसी क्र. ३१/५५ या बेकायदा खाणीच्या विरोधात सरकारला वारंवार निवेदने सादर करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट सदर ठिकाणी खनिज उत्खनन होतच असून त्याची वाहतूकही सुरू असल्याने येथील जवळजवळ दीडशे संतप्त नागरिकांनी सोमवारी खनिज वाहतूक करणारे सुमारे ७० ट्रक खोतोडे पंचायतीजवळ रोखून धरले.
दरम्यान, या बेकायदा खनिज वाहतुकीसंदर्भात वाळपई पोलिसांत सकाळीच तक्रार नोंदवल्यानंतर तिथे पोलिस फौजफाट्यासह पोहोचलेल्या निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी घटनेचा कोणताही पंचनामा न करता व खनिजाची तपासणी न करता अडवलेले ट्रक मुक्त केल्याने येथील नागरिकांनी त्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. सदर प्रकार हा खनिज चोरीचाच प्रकार असल्याने तो खाण खात्याच्या अखत्यारीत येतो. त्या विषयी खाण खात्याला आधीच अवगत करण्यात आले होते. मात्र, याची कोणतीही दखल न घेता निरीक्षक वायंगणकर सदर ट्रक कसे मुक्त करू शकतात, असा सवाल राजेश गावकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी ट्रक सोडल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खाण खात्याचे दीपक मयेकर, श्री. कामत व अन्य सर्वेक्षक घटनास्थळी पोहोचले. जमलेल्या लोकांनी विलंबाचे कारण विचारता, आपल्या गाडीला येताना अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. हा सर्व बनाव असून हे खाण खात्याचे व पोलिसांचे ‘सेटिंग’ आहे, अशी प्रतिक्रिया विश्‍वेश परोब यांनी व्यक्त केली. दरम्यान, या खाणीला वनखात्याचा परवाना नाही व जवळपास ५३,१५० चौरस मीटर जागेत हे बेकायदा उत्खनन केल्याचा अहवाल तलाठ्यांनी मामलेदारांना गेल्या वर्षीच दिला आहे. मात्र तरीही ही खाण सुरू असल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष धुमसत असून नागरिकांनी आजच्या बेजबाबदार कारवाईबद्दल निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या विरोधात डिचोली उपजिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार नोंदवली आहे. या संदर्भात नागरिकांनी जनहित याचिकाही दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आज नागरिकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात सखाराम गावकर, विश्‍वेश परोब, रणजीत राणे, गॅब्रिएल डिकॉस्टा, राजेश गावकर, सगुण गावकर, विश्‍वनाथ घोलेकर, गजानन घोलेकर तसेच असंख्य खाण विरोधकांचा समावेश होता.

शिरगाववासीयांचे आता बाबा रामदेवांना साकडे!

अण्णा हजारे यांनाही आमंत्रित करणार
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)
श्री देवी लईराईचे आदिस्थान असलेल्या शिरगाव गावचे रक्षण करण्यासाठी आता थेट भारत स्वाभिमानचे अध्वर्यू बाबा रामदेव यांनाच साकडे घालण्याचा निर्णय शिरगाव बचाव समितीने घेतला आहे. राळेगणसिद्धी गावात शेतीची क्रांती घडवून आणलेले व सध्या देशात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून दिलेले अण्णा हजारे यांनाही शिरगावला भेट देण्याचे आमंत्रण दिले जाईल, अशी माहिती समितीने दिली आहे.
कोमुनिदाद तथा सामूहिक जमिनीच्या संरक्षणार्थ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निवाड्यामुळे शिरगावातील लोकांत चैतन्य पसरले आहे. खाण उद्योगामुळे अखेरची घटका मोजणारा हा गाव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्याची तयारी समितीने चालवली आहे. अलीकडेच भारत स्वाभिमानतर्फे गोव्यात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बाबा रामदेव यांनी गोव्यातील खाण उद्योगाच्या गंभीर परिणामांची दखल घेतली होती. गोवा तसेच इतर राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरगावची याच खाण उद्योगामुळे झालेली दैना सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यासाठी बाबा रामदेव यांची मदत घेण्याचा विचार समितीने चालवला असून त्याबाबत बाबा रामदेव यांना अवगत करून शिरगाववासीयांना मदतीचा हात देण्याचे आवाहन त्यांना केले जाईल, अशी माहितीही समितीने दिली आहे.
शिरगावात लाखो चौरस मीटर कोमुनिदाद जमिनीवर खाण उद्योजकांनी अतिक्रमण केले आहे. राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने तसेच गावातील काही लोकांना पैशांचे आमिष दाखवून खाण उद्योजक गेली साठ वर्षे शिरगावचे शोषण करीत आहेत. या खाण उद्योगाविरोधात लढा देण्यासाठी उभे राहिलेल्या शिरगाववासीयांची हेळसांड सुरू असून त्यांना लक्ष्य बनवण्याचेही प्रकार सुरू आहेत. शिरगावातील खाण उद्योग हा देखील सरकारी भ्रष्टाचाराचाच परिपाक आहे. कधीकाळी शेतीप्रधान व नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या या गावच्या दुरवस्थेचे दर्शन अण्णा हजारे यांना घडवून आणण्याचेही प्रयत्न सुरू असून ते विविध राज्यांचा जेव्हा दौरा करतील तेव्हा त्यांना या गावाला भेट देण्याचे आमंत्रण समिती देणार आहे. गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी मंडळाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. माधव गाडगीळ तसेच केंद्र सरकारने बेकायदा खाणींबाबत चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगासमोरही शिरगावातील बेसुमार खाणींचे प्रकरण सादर केले जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

भाजपतर्फे गोमंतकीयांना रामनवमीच्या शुभेच्छा

पणजी. दि. ११
भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक आणि विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गोमंतकीय जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात शांती व सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रभू रामचंद्रांची शिकवण व विचार आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

Monday 11 April, 2011

शिरगावातील खाणी बंद होणार?

• सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निवाड्याची
कार्यवाही करण्याची शिरगाववासीयांची मागणी

• मुख्य सचिव व महसूलमंत्र्यांना निवेदन

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
विविध राज्यांत गावकरी, सामूहिक किंवा कोमुनिदाद जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निवाड्याचा आधार घेऊन शिरगावासीयांनी आपला गाव वाचवण्यासाठी निर्णायक लढा देण्याचा चंग बांधला आहे. शिरगाव कोमुनिदाद जमिनींवर खाण उद्योगाकडून झालेल्या अतिक्रमणाविरोधात सरकारने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शिरगाव कोमुनिदादच्या काही सदस्यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना करून या लढाईचा शंखनाद केला आहे.
याप्रकरणी ८ एप्रिल रोजी सादर केलेल्या या निवेदनांत सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेऊन न्याय देण्याची विनंती शिरगाव कोमुनिदादच्या घटकांनी सरकारला केली आहे. शिरगाव कोमुनिदादच्या मालकीची सुमारे १९ लाख चौरसमीटर जागा येथील तीन खाण कंपनींनी आपल्या घशात घातली आहे व गेली ६० वर्षे खनिज उत्खनन करून हा गाव पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे, असे या सदस्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. पोर्तुगीज काळात सदर जमीन कोमुनिदाद संहितेच्या परिशिष्ट १६ व १७ अंतर्गत कलम ५४९, ५५०, ५५१ व ५५२ या अंतर्गत शिरगाव कोमुनिदादच्या नावे नोंद आहे. ही जमीन जुन्या कडेस्ट्रल सर्वे क्रमांक ९५ अंतर्गत शिरगाव ग्राम आराखड्यात नोंद आहे. राज्य सरकारने मुक्तीनंतर हाती घेतलेल्या नव्या सर्वेक्षणात याच जमिनीचा ६/०, ८४/०, ९३/१, ९४/०, ८२/०, ८३/०, ७७/१, ७७/२ आदी सर्वे क्रमांकात अंतर्भाव करण्यात आला. या जमिनीच्या जुन्या दस्तऐवजांचा अभ्यास केला असता त्यात मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचेही लक्षात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. पुरातन काळापासून या सर्व जमिनींवर कोमुनिदादचाच हक्क होता व या जमिनीचे संरक्षण व वापरही कोमुनिदादच्या घटकांकडून होत होता. या जमिनीच्या उत्पन्नावरच येथील मुख्य मंदिर व सेवेकर्‍यांचा खर्च करण्यात येत होता. ही जमीन शिरगाववासीयांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते व या जमिनींवरच येथील लोकांची रोजीरोटी निर्भर होती.
दरम्यान, पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्यूएल वासालो डिसिल्वा यांनी ही जमीन ‘मेसर्स चौगुले ऍण्ड कंपनी प्रा. लि’, ‘शिरगाव मायन्स’,‘मेसर्स राजाराम बांदेकर (शिरगाव) मायन्स प्रा. लि’ व ‘मेसर्स धेंपो मायनिंग कॉर्पोरेशन प्रा. लि’ या खाण कंपनींना लिझद्वारे बहाल केली. हा लीझ करार तयार करताना त्यात नेमकी कोणती जमीन समावेश करण्यात आली किंवा सर्वे क्रमांकांचा उल्लेख झाला नव्हता, असेही या लोकांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार १९९० साली खाण कंपनी, तत्कालीन सत्ताधारी नेते व प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने गावातील सुमारे ७५ टक्के जमीन नव्या सर्वे क्रमांकानुसार टीसी-४/४९, टीसी-५/४९ व टीसी-१५/४१ यानुसार खाण कंपनींच्या नावे करण्यात आली. या खाण ‘लीझ’मध्ये संपूर्ण गावाचाच अंतर्भाव झाला आहे. येथील लोकांची घरे, शेती, धार्मिक स्थळे आदींचा समावेश या लीझमध्ये होतो. ही सगळी जमीन ‘तोमाकांव’ या पोर्तुगीजकालीन दस्तऐवजात शिरगाव कोमुनिदादच्या सर्वे क्रमांक ९५ अंतर्गत येते.
या लीझ कराराच्या साहाय्याने येथे सुरू असलेल्या खाण कंपन्यांनी संपूर्ण शिरगाव गाव उद्ध्वस्त केला आहे. २००६ पासून कधी काळी कृषिप्रधान म्हणून गणल्या जाणार्‍या या गावातील शेती खनिज मातीने भरून गेल्याने इथला गरीब शेतकरी निराधार बनला आहे.
शिरगाव पंचायत, शिरगाव शेतकरी संघटना व कोमुनिदाद संघटनेच्या काही सदस्यांना हाताशी धरून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या हातावर काही पैसा ठेवून खाण उद्योजकांनी या गावचे लचके तोडले आहेत. या अन्यायाबाबत गेली कित्येक वर्षे सरकार दरबारी धाव घेतलेल्या शिरगाववासीयांची मुस्कटदाबीच सुरू आहे. शिरगावच्या अस्तित्वाचा हा लढा सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निवाडा एक शेवटचा आशेचा किरण ठरला असून या निवाड्याचा आधार घेऊन सरकारने शिरगावातील खाण उद्योगाला त्वरित हद्दपार करावे, अशी मागणी या लोकांनी केली आहे.

मुख्य सचिव अडचणीत
सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी २०११ रोजी जगपाल सिंगविरुद्ध पंजाब सरकार या प्रकरणी दिलेल्या या ऐतिहासिक निवाड्यात कोमुनिदाद, गावकरी तथा ग्रामपंचायत जमिनींचे संरक्षण करण्यासंबंधी कडक आदेश दिले आहेत. या जमिनींचा वापर केवळ संबंधित गावकर्‍यांसाठीच व्हावा. या जमिनींत बांधकाम करावयास परवानगी दिली असेल तर तीदेखील मागे घेण्यात यावी, असेही या निवाड्यात बजावले आहे. गोव्यात या निवाड्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कोमुनिदाद जमिनींवर अतिक्रमणे झाली आहेत. सरकार एकीकडे ही बांधकामे कायदेशीर करण्याच्या तयारीत असतानाच हा निवाडा घोषित झाल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अशा अतिक्रमणांबाबतचा अहवाल तयार करून त्यासंबंधी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे सक्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या निवाड्याचा आधार घेऊन शिरगाववासीयांनी आपली पहिली तक्रार नोंदवली आहे. येत्या ३ मे २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यात गोव्याचे मुख्य सचिव कोणता अहवाल सादर करतात हे पाहावे लागणार आहे.

बाबूश विदेशी चलन तस्करी प्रकरणी भाजपचे आजपासून रणशिंग

प्रत्येक तालुक्यात निषेध धरणे व सही मोहीम

पणजी, दि.१० (प्रतिनिधी)
विदेशी चलन तस्करी प्रकरणी मुंबई कस्टम अधिकार्‍यांच्या कचाट्यात सापडलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांची राज्य सरकार पाठराखण करीत असल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे उद्या ११ पासून निषेध धरणे व सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
बाबूश मोन्सेरात यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी व एकूण आचरण पाहता त्यांना शिक्षणमंत्रीपदावर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार राहत नाही व त्यामुळे त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश भाजप तथा विधिमंडळ गटाने केली आहे. बाबूश यांच्याकडे नेमके किती प्रमाणात विदेशी चलन सापडले व त्यांचा हवाला प्रकरणांत सहभाग आहे काय, याची चौकशी ‘सीबीआय’मार्फत व्हावी, असे भाजपच्या गोवा प्रभारी तथा राष्ट्रीय अध्यक्ष आरती मेहरा यांनी म्हटले आहे.
राज्य मंत्रिमंडळातील काही नेते वारंवार विदेश दौरे का करतात व त्यांचे विदेशात नेमके कोणते धंदे सुरू आहेत याचीही माहिती जनतेसमोर यायला हवी, असा आग्रहही भाजपने धरला आहे. उद्या ११ रोजी पेडणे, मुरगाव, काणकोण, केपे तर १३ रोजी बार्देश, सत्तरी, डिचोली, तिसवाडी, फोंडा, सांगे व सासष्टी तालुक्यांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निषेध धरणे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या दरम्यान, भाजप युवा मोर्चातर्फे सह्यांची मोहीमही राबवली जाणार आहे. या धरणे कार्यक्रमात भाजप नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गुन्हेगारांना पाठीशी घालीत आहेत व अशा गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या नेत्याला शिक्षणमंत्रीपदावर ठेवून ते राज्यातील भावी पिढीच्या भवितव्याशीच खेळत आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

बाबूश यांची दिल्लीत श्रेष्ठींसमोर जबानी

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
मुंबई कस्टम अधिकार्‍यांच्या कचाट्यात बेहिशेबी विदेशी चलनासहित सापडलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर आपली जबानी दिल्याची माहिती मिळाली आहे. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमीतसिंग ब्रार यांच्यासमोर बाबूश यांनी २ एप्रिल रोजी घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची इत्थंभूत माहिती ठेवल्याचे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.×
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना विदेशी चलन तस्करी प्रकरणी कस्टम अधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्याचे प्रकरण सध्या बरेच गाजत आहे. गोव्यात विरोधी भाजपकडून याप्रकरणी जोरदार आवाज उठवण्यात आला. भाजपकडून चार दिवस विधानसभेचे कामकाजही रोखण्यात आले. दिल्लीतही भाजपने याविषयी आवाज उठवल्याने त्याची गंभीर दखल घेऊन कॉंग्रेस श्रेष्ठींनी बाबूश यांना दिल्लीत आज पाचारण केले. यावेळी बाबूश यांनी श्री. ब्रार यांची भेट घेतली व त्यांना घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे चर्चा केली जाणार आहे. गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांची भेट घेऊन त्यांचेही मत जाणून घेतले जाईल. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेही याप्रकरणी अहवाल मागितला असून या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही श्री. ब्रार यांनी सांगितले.

बेशरम सरकार, निर्दयी आरोग्यमंत्री!

• चौथ्या दिवशीही मलेरिया सर्वेक्षकांकडे सरकारची पाठ
• आजपासून बायकामुलांसह उपोषण


पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
गेले चार दिवस आरोग्य संचालनालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या मलेरिया सर्वेक्षकांची विचारपूस करून त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी काहीच पुढाकार न घेतलेल्या सरकारच्या बेशरमपणाचा आज सर्व थरांतून जाहीर निषेध करण्यात आला. उपोषणकर्त्या दोन कर्मचार्‍यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना तात्काळ ‘गोमेकॉ’त दाखल करण्यात आले आहे. उद्या ११ रोजीपासून या कर्मचार्‍यांच्या पत्नी व मुलेही या उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याने हे आंदोलन सरकारला चांगलेच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या उपोषणकर्त्यांची विरोध पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
हे कर्मचारी गेली पंधरा वर्षे अल्प वेतनावर आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करत आहेत. सेवेत नियमित करण्याबाबत त्यांची मागणी रास्त आहे व यासाठी त्यांनी आत्तापर्यंत अनेकवेळा आंदोलनेही केली आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी वेळोवेळी त्यांना दिलेली आश्‍वासने पोकळ ठरली आहेत व त्यामुळेच सरकार त्यांच्या आयुष्याशी खेळ करीत असल्याचा आरोप करून त्यांनी आता अखेरच्या न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ‘आम आदमी’चे गुणगान गाणारे व देवदर्शनात व्यस्त राहणारे मुख्यमंत्री एवढे बेशरम कसे काय असू शकतात, असा सवाल उपस्थित होत असून आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचा निर्दयीपणाही यानिमित्ताने उघड झाला आहे, अशी टीकाही सर्व थरातून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री आपली खुर्ची सांभाळण्यात गर्क तर आरोग्यमंत्री नेहमीप्रमाणे ‘आउट ऑफ स्टेशन’ आहेत. अशावेळी त्यांनी जनतेला रस्त्यावरच सोडून दिले आहे काय, असा खणखणीत सवाल या कर्मचार्‍यांनी आज प्रसारमाध्यमाशी बोलताना केला आहे.
बायका, मुलेही उपोषणाला बसणार
सरकार गेली पंधरा वर्षे सातत्याने करीत असलेल्या अन्यायाला सामोरे जाताना जीव मेटाकुटीला आला आहे. आमरण उपोषणाच्या या आंदोलनात आता बायका व मुलांनाही सहभागी करून घेणार असल्याचे प्रेमदास गावकर यांनी सांगितले. सरकारच्या निष्ठुरपणाला व निर्दयीपणाला आता कोणत्या पद्धतीने तोंड देणार हाच प्रश्‍न आहे. गोव्यातील समस्त जनतेला या गरीब कर्मचार्‍यांच्या मदतीला धावून येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दैवाच्या बळावरच आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान आहोत, असे सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष देवालाही आपल्या बाजूनेच ओढले आहे अन्यथा निदान देवालातरी या कर्मचार्‍यांची दया आली असती, असा टोलाही यावेळी त्यांनी हाणला. आज चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या कर्मचार्‍यांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. या कर्मचार्‍यांबाबत सरकारच्या बेपर्वाई व बेजबाबदारपणाचा निषेध करून त्यांनी याप्रकरणी सरकारला जाब विचारणार असल्याचेही सांगितले. आज विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी या कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.

काणकोणातील पहिल्या महिला मूर्तिकार हिराबाई बाळ्ळे

पणजी, दि. १०
दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कला जोपासून लोकांना मूर्ती वेळेवर देण्याचे दिलेले आश्‍वासन जपणार्‍या काणकोण- सादोळशे येथील काणकोण तालुक्यातील पहिल्या महिला मूर्तिकार म्हणजे हिराबाई बाळ्ळे.
गोवा ही कलाकारांची खाण असल्याचे देशातील अनेक विद्वानांनी सांगितले आहे. तसेच प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात येणारा वक्ता किंवा प्रमुख पाहुणा गोवा ही कलाकारांची खाण आहे असे उच्चारल्याशिवाय राहत नाही. याचे कारणही तसेच आहे. गोव्याच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात जर गेल्यास कलाकार सापडतातच. मग ते संगीत, नाटक, चित्रकारी, शिल्पकला, हस्तकला वा अन्य कुठल्याही कलेतील मातब्बर असो. यातील काही कलाकारांना जगप्रसिद्धी मिळाली तर काही जण पडद्याआडच राहिले. परंतु जे पडद्याआड राहिले त्या कलाकारांनी आपल्यातील कला ही आपली साधना मानून ती अखेरच्या श्‍वासापर्यंत जोपासलेली आहे. अशीच एक महिला म्हणजे काणकोण तालुक्यातील हिराबाई बाळ्ळे.
वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत त्यांनी गणपती, सरस्वती आणि इतर विविध प्रकारच्या चिकण मातीच्या मूर्ती करण्याचे काम करून आपल्यातील मूर्तिकार कलेची साधना केली आहे. माती कुटणे, मूर्ती करणे आणि त्या रंगवणे ही सर्व कामे त्या करत होत्या. अतिशय हळव्या मनाच्या आणि मितभाषी असलेल्या हिराबाई यांच्यातील कसलेला कलाकार आजही त्यांच्या डोळ्यातून अनुभवायला मिळतो. कालांतराने पती आणि वयात आलेल्या दोन मुलांचे आकस्मिक निधन झाले आणि काळाने त्यांचा आधारच त्यांच्यापासून हिरावून घेतला. जणू उतरत्या वयातही दिवसेंदिवस त्यांच्यातील कला फुलत असल्याचे काळालाही बघवले नसावे. हिराबाईंचे पती मूर्तिकार. गणेश चतुर्थीला काही दिवस असतानाच त्यांचे निधन झाले. अशावेळी हिराबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही न डगमगता मूर्तींचे उर्वरित काम पूर्ण करत लोकांना वेळेवर मूर्ती दिल्या. अशावेळी त्यांनी नमते घेतले नाही की समाजाच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त करून आपल्या कलासाधनेत खंड पडू दिला नाही. मात्र यासाठी त्यांना समाजाचीही मदत झाली यात शंकाच नाही. पतीचे निधन झाल्यानंतरही कायमस्वरूपी असलेल्या ग्राहकांना त्यांनी मूर्ती तयार करून दिल्या. ग्राहक म्हणजे काही भरमसाठ पैसे मोजणारे नव्हेत तर ज्याला जसे वाट्टेल तसे पैसे देणारे. तरीही त्यांनी कला ही आपली साधना मानून त्यात खंड पडू द्यायचा नाही म्हणून काम केले. वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत त्यांनी मूर्ती करणे चालूच ठेवले.
उतरत्या वयात अवजड कामांसाठी मुलांची मदत मिळत असे. दोन मुलांच्या आधाराने कलेची जोपासना सुरूच ठेवली परंतु काळाने त्यांच्यावर दुसरा महाभयंकर घाव घातला आणि अवघ्या तेरा दिवसांच्या काळात दोन्ही मुलगे गेले. नंतर मात्र त्यांची अवस्था पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे झाली. ‘मन म्हणते घे गगन भरारी पण पंखच नसल्याने जोर नाही’ अशी. तरीही त्या तशा अवस्थेत एक दोन वर्षे धडपडत होत्या. परंतु आता त्यांचे वय ८० च्या घरात पोहोचल्याने अवजड काम नाही जमत, परंतु त्यांचे हात आणि मन मात्र अजूनही विविध मूर्त्यांना आकार देण्यास आणि त्यांच्यावर रंग चढवण्यास तळमळत आहेत.
त्यांच्या कलेच्या साधनेबद्दल त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, काळ झपाट्याने गेला. शरीर थकले तरी मनोबलावर सर्व काही तोलून धरले असते. परंतु काळाने माझ्या मनावर एवढे प्रहार केले की त्याच्यातून सावरणे आता जमत नाही. म्हणून काम बंद करावे लागले. विवाहाअगोदर मूर्ती करण्याची आवड होतीच. परंतु विवाहानंतर पतींच्या सहकार्याने मूर्ती करण्याचे शास्त्र शिकले. याचे कारण म्हणजे आमच्या घरात विविध मातीच्या मूर्ती करणे हाच मुख्य व्यवसाय होता. तो सुद्धा माझ्या विवाहापूर्वी योगायोगानेच सुरू झाला होता. त्याचा नंतर मलाच जास्त फायदा झाला. कारण माझीही बालपणापासूनच मूर्ती बनवणे हीच आवड होती. त्यामुळे मी या व्यवसायात चांगलीच रमू लागले. पण नंतर मात्र काळ करत असलेल्या आघातांनाच दोन हात करताना अधिक वेळ गेला आणि जे साधायचे होते ते अर्धवट राहिले. आजही खूप करावेसे वाटते पण नाही जमले.
त्यांच्या तोंडातून बाहेर पडणार्‍या शब्दांपेक्षा त्यांचे डोळेच खूप काही सांगून जात होते. अशा या कलेच्या महान साधकाला शतशः प्रणाम. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखकर जाओ हीच ईश्‍वर चरणी प्रार्थना.

शिक्षणपद्धती हेच सर्व समस्यांचे मूळ - कांबळे

गोमंत विद्यानिकेतनचा वर्धापनदिन
मडगाव, दि. १०(प्रतिनिधी)
देश स्वतंत्र होऊन पन्नास वर्षे उलटूनही ब्रिटिशकालीन शिक्षणपद्धती देशात चालू आहे व आजच्या सर्व समस्यांचे तेच कारण आहे. ब्रिटिशांनी येथून जाते वेळी भारताविषयी काही भाकिते लिहून ठेवली होती व त्यात शिक्षणविषयक भाकितात स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिकांनी आपणासाठी कोणती शिक्षणपद्धती हवी ती निश्‍चित करावी असे नमूद केले होते. पण अजूनही ती पद्धती आलेली नाही व स्वतंत्र भारतात आपण गुलामगिरीचेच जिणे जगत आहोत असे परखड विचार सकाळ वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक उत्तमराव कांबळे यांनी आज (दि.१०) येथे व्यक्त केले.
येथील गोमंत विद्या निकेतनच्या ९९ व्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यानिकेतनचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यात कविश्रेष्ठ दा. अ. कारे स्मृती गोमंतदेवी पुरस्कार कविश्रेष्ठ ग्रेस यांना, केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार डॉ. आशा सावर्डेकर यांना तर सावित्रीबाई दलाल स्मृती स्वयंसिद्धा पुरस्कार वंदना बोरकर व काशिनाथ दामोदर नायक स्मृती पुरस्कार माशे काणकोण येथील निराकार शिक्षणसंस्थेला प्रदान करण्यात आला.
डॉ. अशोक मणगुतकर व श्रीमती सुनंदा नाईक यांना विद्या निकेतनचे साहित्य पुरस्कार कवी ग्रेस यांच्या हस्ते प्रदान केले गेले. शाल व श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मानपत्र अशा स्वरूपातील ते पुरस्कार होते. मानपत्रांचे वाचन विनय कामत, मयुरा नायक, लक्ष्मण परब व सीताराम टेंगसे यांनी केले.
पुढे बोलताना श्री. कांबळे यांनी आजची स्पर्धा ही जीवघेणी असली तरी ती विषम लोकांची असल्याचे प्रतिपादिले. त्यात जिंकणार्‍यांनी कायम जिंकायचे व हरणार्‍याने सतत हरायचे अशी व्यवस्था आहे. पण त्यात आपले शिक्षण, आपले शिक्षक यांना कुठेच स्थान नाही. ब्रिटिशांनी भारताला जरी स्वातंत्र्य दिले तरी गुलामगिरीची मनोवृत्ती कायम राहील अशीच व्यवस्था केल्याचे श्री. कांबळे यांनी उदाहरणासह सांगितले. त्यांनी आज गुणवत्तेला नव्हे तर एसएमएसवर सारी स्पर्धा कशी चालते ते सांगताना समाजाच्या गतीने पुस्तके व शाळा तसेच शिक्षकांनी आपली कार्यपद्धती बदलण्याची व ती बदलताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास होण्याची गरज प्रतिपादन केली. त्यांनी जागतिकीकरण वस्तूंचे नव्हे तर माणसांचे होऊ लागले आहे असे सांगून बदलत्या समाजव्यवस्थेत वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आज आपल्या हातून झालेल्या थोर व्यक्तींच्या सत्कारामुळे आपण धन्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
कविवर्य ग्रेस यांनी आत्माहुंकाराचा शोध प्रत्येकाने घ्यावा. तो घेतला तर आत्मज्ञान प्राप्त होईल. आज तो कुठेच जाणवत नाही. आपण तो का गमावला याचा विचार प्रत्येकाने केला तर त्यातच त्याचे उत्तर सापडेल, अक्षरे पुसण्याने नव्हे, असे सांगितले.
डॉ. आशा सावर्डेकर यांनी सत्काराला उत्तर देताना हा केवळ आपला एकटीचा नव्हे तर सर्व सहकार्‍यांचा सत्कार असल्याचे सांगितले. तर वंदना बोरकर यांनी हा पुरस्कार उत्साह दुणावणारा व पाठीवर समाधानाची थाप देणारा असल्याचे सांगितले. प्रशांत नाईक यांनी निराकार संस्थेचा पुरस्कार स्वीकारताना त्याचे सारे श्रेय सहकार्‍यांना दिले. त्यांनी गोव्यात सध्या चालू असलेल्या स्थानिक भाषा रक्षण आंदोलनात गोमंत विद्यानिकेतनने दक्षिण गोव्याचे नेतृत्व करावे अशी विनंती केली.
प्रथम संस्थेचे अध्यक्ष अशोक कारे यांनी स्वागत केले व विद्यानिकेतनच्या, सभागृहाचे नूतनीकरण येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात ‘स्मरुनी गोमंतदेवी’ प्रार्थनेने झाली. सूत्रसंचालन देवकी नायक यांनी केले. यावेळी श्री कांबळे यांना स्मृतिभेट देण्यात आली तर उद्योगपती सुरेश कारे यांना दत्ता नायक यांनी पुष्पगुच्छ प्रदान केला.
उपस्थितांत माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेेकर यांचा समावेश होता.

डॉ. विजयेंद्र कामत विद्यापीठचे कुलसचिव

उद्या कार्यभार स्वीकारणार
पणजी, दि. १०
गोवा विद्यापीठाच्या कुलसचिव (रजिस्ट्रार) या पदावर डॉ. विजयेंद्र कामत यांची नियुक्ती निश्‍चित झाली असून येत्या १२ रोजी ते आपल्या नव्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
गोव्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. एस. सिद्धू यांनी सदर नियुक्तीला मान्यता दिली आहे. सध्या डॉ. कामत हे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. २५ वर्षांपासून ते ज्ञानार्जनाचे अखंड कार्य करत असून त्यांनी जपानमधील तोहोकू विद्यापीठात संशोधन केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्या त्यांनी पटकावल्या आहेत. तसेच जपान, अमेरिका, इंग्लंड आदी देशांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी शोधनिबंधांचे वाचन केले आहे. ऑरगॅनिक केमिस्ट्री हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय होय. त्यांनी अधिव्याख्याता या नात्याने गोवा विद्यापीठात आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा आरंभ केला. रसायनशास्त्र या विषयातील त्यांचा अधिकार वादातीत आहे. विद्यापीठाची परीक्षा पद्धत सुलभ करण्याकामी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी चळवळीतही त्यांनी महाविद्यालयीन जीवनात सक्रिय भाग घेतला होता. राज्यातील शिक्षणक्षेत्रात डॉ. कामत यांच्याकडे अतिशय आदराने पाहिले जाते.

मोले येथे एकाचा खून करून जाळले

फोंडा,दि. १० (प्रतिनिधी)
बरकड्डे मोले येथे एका इसमाचा खून करून मृतदेह सुमो जीप वाहनात जाळण्यात आला आहे. या घटनेची माहिती कुळे पोलिसांना आज सकाळी ७.२५ वा. मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सुमो जीपगाडी (जीए ०४ सी ०१८३) जळत होती. त्यात एक मृतदेह जळत होता. ही जीपगाडी पैरा मये येथील जनार्दन कोंकरे यांच्या मालकीची आहे. पोलिसांनी यानंतर जीपमालकाच्या घरी संपर्क साधला असता ही जीपगाडी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वा. वास्को येथून भाडे घेऊन बेळगावला निघाली होती. १० एप्रिल रोजी दुपारी १२ वा. परत येणार होती. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. जीपमालकाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज म्हार्दोळकर अधिक तपास करत आहेत.

Sunday 10 April, 2011

‘फेमा’ कायद्याअंतर्गत बाबूशविरोधात तक्रार नोंद!

कस्टम्सने फास आवळला - विदेशवारीवरही बंदी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे सापडलेल्या मर्यादेपेक्षा जास्त विदेशी चलनाबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत व त्यामुळेच आज त्यांच्या विरोधात कस्टम्स व ‘फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट’ कायदा (फेमा) अंतर्गत तक्रार नोंद करण्यात आली. बाबूश यांचा जप्त केलेला पासपोर्ट परत करण्यासही मुंबई कस्टम्सने नकार दर्शवीत त्यांच्यावर विदेशवारी करण्यासही बंदी टाकल्याने त्यांच्या भोवतालचा फास आता अधिकच आवळला गेला आहे.
काल शुक्रवारी बाबूश यांची झाडाझडती घेतल्यानंतर मुंबई कस्टम्सने आजही त्यांची सुमारे सहा तास जबानी नोंदवून घेतली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणी बाबूश यांना अटक करण्यास कस्टम्स खात्याकडे आवश्यक पुरावे असतानाही केवळ राजकीय दबावापोटी त्यांची अटक टाळली जात असल्याचेही समजते. बाबूश यांच्याकडे सापडलेल्या बेहिशेबी चलनाबाबत त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे मिळू शकली नाहीत. हा पैसा ते नेमके कोणत्या कामासाठी नेत होते याचेही समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत व त्याचमुळे त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार नोंद करून घेण्यात आली आहे. बाबूश यांच्याकडे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणी मागितलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी या चलनाबाबत आपल्याकडे कायदेशीर कागदपत्रे असल्याचे सांगितले होते. परंतु, आज कस्टम्स अधिकार्‍यांसमोर मात्र ही कागदपत्रे सादर करण्यात ते अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री कामत साफ तोंडघशी पडले आहेत.

बाबूश यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा : मेहरा

हवाला प्रकरणी बाबूशची सीबीआय चौकशी करा : मेहरा
भाजपचे अकराही तालुक्यांत उद्यापासून निषेध धरणे
पणजी,द. ९ (प्रतिनिधी): विमानातून प्रवास करताना किती प्रमाणात चलन न्यायचे याबाबत आपण अनभिज्ञ होतो व यापूर्वी आपण अशाच पद्धतीने पैसा नेल्याचे स्वतःच जाहीर केलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांची हवाला प्रकरणी ‘सीबीआय’ चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी आरती मेहरा यांनी केली. आधीच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व बेहिशेबी विदेशी चलन तस्करी प्रकरणी कस्टम्सच्या ताब्यात अडकलेल्या बाबूश यांना शिक्षणमंत्रिपदावर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही व त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी व्हावी यासाठी भाजप अकराही तालुक्यात निषेध धरणे आयोजित करणार असल्याचेही त्यांनी घोषित केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की भाजपतर्फे ११ व १३ रोजी सर्व अकराही तालुक्यांत निषेध धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात ११ रोजी पेडणे, मुरगाव, काणकोण व केपे तालुक्यांचा समावेश आहे. १३ रोजी बार्देश, सत्तरी, डिचोली, तिसवाडी, फोंडा, सांगे व सासष्टी या तालुक्यांत हे आंदोलन केले जाईल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही धरणे धरण्यात येतील.
इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केलेल्या या नेत्याकडे शिक्षण मंत्रिपद बहाल करून सरकारने भावी पिढीसमोर कोणता आदर्श ठेवला आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. मुंबई विमानतळावर त्यांच्याकडे सापडलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांच्याकडून ‘फेमा’ व कस्टम्स कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ६० लाख रुपये घेऊन जाताना विमानतळावर अटक करण्यात आली होती. यावेळी कस्टम्स अधिकार्‍यांनी तात्काळ त्यांच्याकडे सापडलेल्या चलनाची विस्तृत माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघड केली होती. आता बाबूश यांच्याबाबत कस्टम्स अधिकारी नेमकी माहिती का लपवतात, असा सवाल करून केंद्रीय वित्त मंत्रालयाने या प्रकरणी अधिकृत वक्तव्य करण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. आपण या प्रकरणी केंद्रीय गृह तथा वित्तमंत्र्यांना पत्र पाठवले आहे व त्यांना बाबूश यांच्याकडे नेमकी किती चलन सापडले याची माहिती जनतेसमोर ठेवण्याची विनंती केल्याचेही त्या म्हणाल्या. भाजप या विषयी राष्ट्रीय पातळीवरही आवाज उठवेल, असे स्पष्ट संकेतही त्यांनी यावेळी दिले.
बाबूश यांना कस्टम्स कायदा १९६२ अंतर्गत कलम ११३ नुसार तात्काळ अटक होणे गरजेचे होते. पण केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई टाळली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याचे शिक्षणमंत्रीच अशा बेशरम कृतीत सापडल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणेच उचित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अण्णांच्या आंदोलनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा
संसदेत विरोधी भाजपने सरकारच्या अनेक भ्रष्ट कारभारांचा भांडाफोड केला आहे. हा लढा चालूच राहणार आहे. अण्णा हजारे यांनी जन लोकपाल विधेयकासाठी चालवलेले आंदोलन पूर्णपणे समर्थनीय आहे व भाजपने सुरुवातीपासूनच त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
१९ व २० रोजी गाभा समितीची बैठक
गोव्यातील पुढील विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी १९ व २० रोजी पक्षाच्या गाभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी व लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे हजर राहणार आहेत. भाजपने पुढील निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे युती करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय या बैठकीत होईल. पुढील विधानसभा निवडणुकीत कुणाशी युती करावी अथवा कोणती रणनीती आखावी हे ठरवण्यात येईल, असेही श्रीमती मेहरा यांनी स्पष्ट केले.

अण्णांनी उपोषण सोडले! मसुदा समितीची अधिसूचना जारी

नवी दिल्ली, दि. ९ : सुप्रसिद्ध गांधीवादी व सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेले आमरण उपोषण आज पाचव्या दिवशी सकाळी १०.४५ च्या सुमारास परकर पोलके घातलेल्या एका लहानशा गोड मुलीच्या हातून लिंबाचा रस घेत सोडले. अण्णांच्या या उपोषणाने केंद्र सरकार चांगलेच घामाघूम झाले होते. अखेर अण्णांनी उपोषण मागे घेतल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर जंतरमंतर तसेच देशातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला व घोषणा दिल्या. देशातील विविध शहरांमध्ये ढोल ताशाच्या तालावर नाचून, ङ्गटाके ङ्गोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
आमच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याने तसेच जन लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार व जनप्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्याची अधिसूचना सरकारने जारी केल्यानंतर आपण हे उपोषण समाप्त करीत आहोत, असे अण्णांनी घोषित केले. परंतु, याचबरोबर हेेही स्पष्ट केले की भ्रष्टाचाराविरुद्धचा आमचा हा लढा यापुढेही जारीच राहील; इतकेच नव्हे तर आता आम्ही निवडणूक सुधारणांसंदर्भात सरकारचे लक्ष वेधू, असे ते म्हणाले. १५ ऑगस्टपर्यंत जर लोकपाल विधेयक मंजूर झाले नाही तर आम्ही पुन्हा आमचा लढा सुरू करू. विधेयक मंजूर झाले तर पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही १५ ऑगस्टला दिल्लीत लाल किल्ल्याजवळ येऊ, असेही ते म्हणाले.
अण्णांनी आपले उपोषण सोडण्यापूर्वी उपोषणस्थळी उपोषणावर बसलेल्या महिला कार्यकर्त्यांना तसेच ३०० वर उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देेऊन त्यांचे उपोषण समाप्त केले आणि नंतर ‘हा जनशक्तीचा विजय आहे’, असे म्हणत स्वत: एका छोट्या मुलीच्या हातून लिंबूपाणी घेत उपोषण सोडले. यावेळी मंचावर स्वामी अग्निवेश, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मेधा पाटकर आदी सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते.
आज सकाळी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, जन लोकपाल हे ऐतिहासिक विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात आमचे सरकार मांडणार आहे. लोकपाल विधेयकाच्या मुद्यावर सरकार व जनप्रतिनिधी एकत्र येणे हा लोकशाहीसाठी शुभशकुनच आहे. उपोषण समाप्त करण्यास हजारे मान्य झाले याचा मला आनंद वाटतो, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
मसुदा समितीची अधिसूचना जारी
कायदा व न्याय मंत्रालयाकडून मसुदा समिती स्थापनेची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यात असे म्हटले आहे की, जन लोकपाल विधेयक तयार करण्याची जबाबदारी संयुक्त मसुदा समितीवर सोपविण्यात येत आहे. या समितीत सरकारचे पाच मंत्री व पाच जनप्रतिनिधी मिळून दहा जण असतील. यात अण्णांचाही समावेश असेल. संयुक्त मसुदा समिती लवकरच प्रस्तावित लोकपाल विधेयकासंदर्भात काम करण्यास सुरुवात करेल. ३० जूनपर्यंत या समितीला आपले काम संपवायचे आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली असून शांती भूषण या समितीचे सहअध्यक्ष आहेत. समितीत सरकारच्या वतीने कपिल सिब्बल, चिदम्बरम्, वीरप्पा मोईली व सलमान खुर्शीद या मंत्र्यांचा समावेश आहे, तर समितीत शांती भूषण यांच्यासह अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण व संतोष हेगडे हे जनप्रतिनिधी राहणार आहेत. याबाबत आज सकाळी अध्यादेश काढण्यात आला. त्याची प्रत सरकारच्या वतीने स्वामी अग्निवेश यांच्याकडे देण्यात आली. अण्णांनी ही प्रत बघितली व त्यानंतरच अण्णा व त्यांच्या समर्थकांनी उपोषण समाप्त केले.
मसुदा समितीतील सदस्य
सरकारी प्रतिनिधी
प्रणव मुखर्जी (अध्यक्ष)
पी. चिदम्बरम
विरप्पा मोईली
कपिल सिब्बल
सलमान खुर्शीद

जनप्रतिनिधी
शांती भूषण (सहअध्यक्ष)
अण्णा हजारे
संतोष हेगडे
अरविंद केजरीवाल
प्रशांत भूषण

डोंगराचा भाग कोसळून दवर्लीत कामगार ठार

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): झरीवाडा - दवर्ली येथे बंगल्याच्या कामासाठी डोंगरकापणी सुरू असताना तो अचानक कोसळल्याने त्या खाली दोन कामगार गाडले गेले. त्यात महम्मद ताजुद्दीन (३५) हा जागच्या जागीच ठार झाला तर अग्निशामक दलाने महम्मद शकील (२७) याला वाचविण्यात यश मिळविले. त्याला उपचारासाठी हॉस्पिसियोमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ९.३० वा. घडली. बंगल्याचे मालक व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे प्राणहानी होण्याची ही घटना घडली असून मायणा - कुडतरी पोलिसांनी मालकासहित आणखी दोघांना अटक केली आहे.
आज सकाळी गौस बी जाफर सय्यद यांच्या बंगल्याच्या कामासाठी जमीन सपाट करण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने चालू होते. तो भाग डोंगराळ असल्याने व त्यातही ती माती भुसभुशीत असल्याने डोंगर कापताना वरचा कडा कोसळला व त्याखाली महम्मद शकील व महम्मद ताजुद्दीन हे गाडले गेले. तरीही त्यावर आणखी माती कोसळू लागली. तात्काळ मडगावच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी जेसीबी व इतर वस्तूंनी गाडलेल्यांना माती दूर सारून काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत श्‍वास कोंडून महम्मद ताजुद्दीन ठार झाला होता तर महम्मद शकील अखेरचा श्‍वास घेत होता. तात्काळ उपाययोजना झाल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यानंतर त्यांना हॉस्पिसियोमध्ये उपचारासाठी दाखल केले.
हे वृत्त मायणा - कुडतरी पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली व जखमीला उपचारासाठी रवाना केले. तर दुसर्‍याचा मृतदेह हॉस्पिसियोत नेला. बंगल्याचे मालक गौस बी जाफर सय्यद यांनी डोंगर कापताना तो कोसळू नये म्हणून कोणतीच काळजी घेतली नव्हती व त्याचे दोन ठेकेदार शेख महम्मद मन्सूर व अब्दुल सुबान शेख यांनी निष्काळजीपणा केला व या निष्काळजीपणामुळे गरीब कामगाराचे प्राण गेले. त्यासाठी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. डोंगर कापण्याचा परवाना होता की नाही हे समजू शकले नाही. पोलिस तपास करीत आहेत.

गोमंत विद्या निकेतनच्या शताब्दीनिमित्त भव्य कार्यक्रम

पणजी, दि. ९ (सांस्कृतिक प्रतिनिधी): मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन ही संस्था १००व्या वर्षात पदार्पण करत असून त्या निमित्ताने दि. २३, २४ व २५ एप्रिल रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष अशोक कारे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत शताब्दी समारंभ समितीचे अध्यक्ष सुरेश कारे, कार्यकारी अध्यक्ष दत्ता नाईक आणि संस्थेचे खजिनदार राजेश के. नाईक उपस्थित होते.
संस्थेचा वर्धापनदिन ४ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साजरा झाला. परंतु, संस्थेच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याने येत्या २३ पासून शताब्दी समारंभ साजरा करण्यात येणार आहे. १९१२ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच काशिनाथ नाईक, केशव नाईक, अच्युत नाईक व इतर काही मोजक्या युवकांनी सारस्वत ब्राह्मण समाज या संस्थेची स्थापना करून वाचनालयाची सुरुवात केली होती. कालांतराने या संस्थेची भरभराट होत गेली आणि ती केवळ एका विशिष्ट समाजाची न राहता समस्त गोमंतकीयांची झाली म्हणून या संस्थेचे गोमंत विद्या निकेतन असे नामकरण करण्यात आले, अशी माहिती श्री. कारे यांनी यावेळी दिली. आज ही संस्था १०० व्या वर्षात पदार्पण करत असून याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. कारण एखादी संस्था स्थापन करणे हे सोपे असते; परंतु ती १०० वर्षे टिकवणे हे मोठे आव्हान असते. गोव्यात अशा अनेक संस्था स्थापन झाल्या. परंतु, त्या काळाच्या ओघात नाहीशा झाल्या. काही मोजक्याच संस्था ज्या टिकून राहिल्या त्यातीलच एक म्हणजे गोमंत विद्या निकेतन असेही ते म्हणाले.
समाजप्रबोधन, समाज संघटन व सामाजिक परिवर्तन ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून स्थापन केलेल्या या संस्थेचे आज सुसज्ज असे वाचनालय आहे. त्यात सुमारे ४ हजारांहून अधिक पुस्तके असून काही दुर्मीळ पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. आजही दर दिवशी सुमारे ५०० वाचक या वाचनालयात येतात. शिवाय बाल विभाग वेगळा असून लहान वाचकांना याचा मोठा फायदा होतो आहे. केवळ वाचनालयच नव्हे तर समाजसुधारकांना आमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित करणे, गोमंतकीय समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर करून तो एकसंध बनविण्यासाठी प्रयत्न करणे यांसारखे उपक्रम संस्था राबवत आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे आणि वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने साहित्यसम्राट न. चिं. केळकर, डॉ. चिंतामणराव देशमुख, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती बी. लॅटीन यांच्यापासून डॉ. यू. आर. अनंतमूर्ती, सत्यदेव दुबे, विनय हर्डीकर यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर येथे येऊन गेले असल्याचे सुरेश कारे यांनी यावेळी सांगितले. गोव्यातील गोमंतक मराठी अकादमी आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळ स्थापन करण्यात या संस्थेचा मोठा सहभाग आहे. मराठी विज्ञान परिषद, गोवा विभाग, सिने मॅजिक, अनाहतनाद, काव्य मैफल, आस्वाद अशा विविध उपक्रमांतून वैज्ञानिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि इतर कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात, असेही संस्थेच्या कार्याविषयी माहिती देताना सुरेश कारे यांनी सांगितले.
यावेळी दत्ता नाईक यांनी शताब्दी कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदन निलेकणी उपस्थित राहणार असून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नरेंद्र जाधव यांसारखे अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. शताब्दीच्या निमित्ताने ‘शतकातील गोमंतक’ हा गोव्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर सर्व क्षेत्रांचा चिकित्सक व तटस्थपणे आढावा घेणारा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच ‘२१ व्या शतकातील नैतिकता ः मर्यादा आणि आव्हाने’, ‘गोवा काल आज आणि उद्या’ या विषयांवर नामवंत विचारवंतांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे. तसेच वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचे प्रदशर्र्न आणि गोव्यातील मोजक्याच ज्या संस्थानी १०० वर्षे पूर्ण केली आहेत त्या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शताब्दी समारंभाच्या निमित्ताने वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.